Friday, May 19, 2017

Vighneshwar - fourth incarnation of Lord Vinayaka

अवतार चौथा - विघ्नेश्वर - अध्याय ११ व १२ - श्री विनायक विजय

या अध्यायात विनायकाने विघ्नासुराचा पराभव केला. त्याने प्रार्थना केल्याने देवाने विघ्नराज हे धारण केले. मूषक हे वाहन आरोहणासाठी घेतल्याने "मूषकवाहन" नांव पडले.

चतुर्भुज, पाश, अंकुश, परशु, कमल ही आयुधे धारण केलेला, मूषकावर आरूढ झालेला असे विनायकाचे या अवतारात स्वरूप आहे.

पूर्वी हिमालयात सौभरी नांवाचे ऋषी रहात होते. त्यांच्या भार्येचे नांव सुशीलमति. ते दोघेही कंदमुळे व शेतातील एकेक दाणा जमवून त्यावर उदरनिर्वाह करीत. एके दिवशी एक गंधर्व त्यांच्या पर्णकुटीत आला. ऋषीपत्नी सुशीलमतिला पाहून तो मोहित झाला व तिला आपल्याबरोबर चलण्याविषयी बोलू लागला. सुशीलमतिने क्रोधाने म्हटले "माझा हात सोड नाहीतर मी तुला शाप देईन". तेवढ्यात सौभरीं ऋषीही तेथे आले व क्रोधीत होऊन "तू मूषकरूप होशील" असा शाप दिला. गंधर्वाने शापवाणी ऐकताच तो घाबरला व उ:शाप मागू लागला. ऋषींना दया आली व त्याला उ:शाप दिला "तू पार्श्वाश्रमाजवळ राहशील व जेव्हां परमात्मा विनायक अवतार घेईल तेव्हां नित्य त्यांच्या चरणाजवळ वास करशील!". उ:शाप मिळवून गंधर्वाने प्रयाण केले व ऋषी भार्येसह आश्रमात परतले.

एकदा स्वर्गात नारद इंद्राला भेटायला इंद्रसभेत आले. त्यांनी इंद्राला सांगितले "भूतलावर अभिनंदन नावाचा राजा आहे. त्याने ब्राह्मणांना यज्ञयागात इंद्राला हविर्भाग देऊ नका असे सांगितले आहे." हे ऐकताच इंद्राला राग आला व त्याने काळशक्तीला आवाहन केले. तिच्या साहाय्याने त्याने विघ्नदैत्य निर्माण केला. विघ्नदैत्याने भूतलावर यज्ञयागाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. ब्राह्मण त्रासले व सर्व मिळून जगन्नाथाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली. स्तुती केली. ते ऐकून देव प्रकट झाला व वरेण्य राजाच्या घरी अवतार घेऊन मी विघ्नदैत्याचा नाश करीन असे त्याने सांगितले" अशी अभयवाणी ऐकताच ब्राह्मण निश्चिन्त झाले.

विनायकाने वरेण्यराजाच्या घरी पुष्पिका राणीच्या पोटी जन्म घेतला. जन्मताच गजवदन असलेली व चतुर्भुज, सुनयन असलेली बालमूर्ती पाहताच पुष्पिका राणी घाबरली व तिने रडत रडत राजाला बोलावले. असे विचित्र बालक पाहताच राजाही घाबरला व त्याने बालकाला अरिष्ट समजून सैनिकांना सरोवरात सोडून देण्यास सांगितले. सैनिकांनी बालकास पाण्यात सोडून दिले. दुसरे दिवशी पार्श्वमुनी तळ्यावर स्नानास गेले असतांना त्यांना ते विचित्र बालक दिसले.  पार्श्वमुनी प्रथम भयचकीत झाले पण नंतर सावध होऊन स्वतःशीच विचार करू लागले "कुणी अभाग्याने अरिष्ट समजून हे बालक या सरोवरात सोडून दिले खरे, पण मला मात्र हे जपतपाचे फळ द्यायला आलेले सुखदायक बालक वाटते आहे. असं वाटत आहे की अधर्माचा नाश करून धर्मस्थापनेसाठी परमात्म्यानेच अवतार घेतला आहे." ऋषींनी बालक आश्रमात नेऊन आपल्या पत्नीला दीपवत्सेला दाखवला. ती म्हणाली "हा बालक सूर्यासारखा तेजस्वी आहे. आपल्या तपाचे फळ देण्यासाठी प्रत्यक्ष विनायकच अवतरला आहे." पुत्रजन्माचा सोहळाच त्या दोघांनी अनुभवला.

विनायक त्या आश्रमातच वाढू लागला. इकडे सौभरीऋषींच्या शापाने तो गंधर्व तत्काळ मूषक झाला व पार्श्वमुनींच्या आश्रमात येऊन गुप्त रूपाने राहिला. त्याने आपल्या दातांनी जागोजागी खणले. यज्ञवेदिकेत बिळे केली. कुरतडून वृक्षही पाडले. यज्ञपात्रे चावून चावून खराब केली. या उपद्रवांनी पार्श्वमुनी त्रस्त झाले. विनायक जवळच खेळत होता. त्याने जवळच्या पाशाने मूषकाला जवळ ओढून आणले. मूषकाने विनायकाला मिळालेल्या शापाबद्दल व उ:शापाबद्दलही सांगितले व त्याच्या चरणांजवळ जागा मागितली. विनायकाने मूषकाला आनंदाने आपले वाहन म्हणून स्वीकारले व त्याच्यावर आरूढ झाला. पार्श्वमुनी विनायकाच्या या लीलेने आश्चर्यचकित झाले. विनायकाने विघ्नासुराचा वध करून, अधर्माचा नाश करून, धर्मस्थापनेचे कार्य करून देवांना सुखी करीन असे आश्वासन दिले.

पृथ्वीवरचे ब्राह्मण, ऋषी विघ्नासुराच्या त्रासाने भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने "पार्श्वमुनींच्या आश्रमातील विनायक या विघ्नासुराचा वध करील" असे सांगितले.

सर्व ब्राह्मण ऋषी विनायकाच्या दर्शनाकरिता व पार्श्वमुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. सर्व वेदतुल्य ऋषी, ब्राह्मण एकत्र आलेले पाहून पार्श्वमुनींना आनंद झाला. त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे कारण विचारले. तितक्यात विनायकही तेथे आला. ऋषींनी येण्याचे कारण सांगितले व विघ्नासुराचा नाश करण्यास विनायकास विनविले. चतुर्भुज विनायक मूर्ती चारही हातात आयुधे घेऊन, मूषकावर आरूढ होऊन ब्राह्मणांसमवेत निघाली.

विनायकाने ब्राह्मणांना युद्ध पाहण्यास सांगून विघ्नासुरावर आपला अंकुश सोडला. तो अंकुश त्याच्या कंठाला लागून तो विनायकाजवळ खेचला गेला. त्याचे अक्राळविक्राळ रूप, भयानक दात-दाढा, लोंबणारी लांब लाल जिव्हा पाहून ऋषी चकीतच झाले.

तोच विघ्नासुराने जलरूप होऊन सर्व त्रैलोक्य व्यापले. विनायकाने ते सर्व जल प्राशन केले. विघ्नासुराने पक्ष्याचे रूप घेतले तर विनायकाने त्याच्यावर कमल सोडले. विघ्नासुराने अग्नीचे रूप घेऊन ब्रह्माण्ड जाळण्यास सुरुवात केली तो विनायकाने मेघ वर्षवून अग्नीस शांत केले. विघ्नासुराने वायूचे रूप घेऊन मेघांना पळवून लावले तर विनायकाने वायूस अडवण्यासाठी पर्वत निर्माण केले. दैत्य वज्ररूप झाला व त्याने सर्व पर्वतांचे चूर्ण केले. विनायकाने निर्वाणशक्ती सोडली. ती भक्षिण्यासाठी दैत्याने आपले मुख पसरले. ती सूर्यासारखी तेजस्वी क्रूर शक्ती पाहून दैत्याने आपले नेत्र झाकले व त्याचा सर्व गर्व उतरला. तो विनायकास शरण आला व त्याची स्तुती करू लागला. त्याची क्षमा मागू लागला. दैत्याची स्तुती ऐकून विनायकास संतोष झाला. तो म्हणाला "तूला मी ठार मारणार होतो, पण तू शरण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो. परंतु माझे एक वचन तुला पाळले पाहिजे. जेथे जेथे माझे नामस्मरण चालू असेल, भक्तिभावाने पूजा होत असेल ते स्थान तू तत्काळ सोडले पाहिजेस" विघ्नासुराने मान्य करून विनायकास मागणे मागितले "तुझ्या नावाच्या आधी माझे नांव आले पाहिजे" विनायकाने त्याचे मागणे मान्य केले व विनायक "विघ्नेश्वर" या नांवाने ओळखला जाऊ लागला.

हे वर्तमान ऐकताच राजा वरेण्यही आपल्या पत्नीसह तेथे आला. विनायकाने त्यासही अनेक वर दिले. विघ्नेश्वराच्या नावाने विनायकाचा सर्वजण जयजयकार करीत असतानाच विनायक अंतर्धान पावला.

असा हा विनायकाचा विघ्नेश्वर अवतार अध्याय समाप्त! 

No comments:

Post a Comment