Sunday, December 31, 2023

श्री जंबुकेश्वरर

 तामिळनाडू राज्यातल्या तिरुचिरापल्ली ह्या जिल्ह्यातल्या थिरुवनैकोविल गावामध्ये हे मंदिर वसलं आहे. हे पंचभूत स्थळांपैकी एक आहे. पंचमहाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतीक आहे. तसेच हे आथार स्थळांपैकी पण एक आहे ज्यामध्ये हे मंदिर स्वाधिष्ठान चक्राचे प्रतीक आहे. ६३ नायनमारांनी ज्या मंदिरांची स्तुती आपल्या काव्यांमध्ये केली आहे त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे.


मुलवर (मुख्य देवता): श्री जंबुकेश्वरर

उत्सव मूर्ती: श्री चंद्रशेखर, श्री सोमस्कंदर 

देवी: श्री अखिलांडेश्वरी

क्षेत्र वृक्ष: सफेद जांभूळ


हे मंदिर साधारण १७०० वर्ष जुनं आहे आणि येथील शिवलिंग स्वयंभू आहे. ह्या मंदिरातल्या इतर देवता - भगवान शिवांच्या गाभाऱ्यामागे श्री महासरस्वती देवी (वीणे शिवाय), श्री चंद्र त्यांच्या पत्नी श्री कृत्तिका आणि श्री रोहिणी समवेत, श्री पंचमुखी विनायक, श्री शनिदेव त्यांच्या पत्नी श्री ज्येष्ठादेवींसमवेत. 


जंबू तीर्थाच्या काठावर श्री कुबेरांनी पुजलेलं शिव लिंग आहे ज्याला कुबेर लिंग म्हणतात. ह्या लिंगावर जून-जुलै च्या पौर्णिमेला केळी, आंबा, फणस ह्या फळांचा अभिषेक केला जातो. येथील स्थळ पुराणानुसार आडी ह्या तामिळ महिन्यामध्ये श्री पार्वती देवींनी इथे तपश्चर्या केली. श्री पार्वती देवी दिवसाच्या विविध प्रहारांमध्ये विविध रूपांमध्ये आशीर्वाद देतात. सकाळी श्री महालक्ष्मीच्या रूपांत, दुपारी श्री पार्वती देवींच्या रूपांत तर संध्याकाळी श्री सरस्वती देवींच्या रूपांत आशीर्वाद देतात. श्री जम्बुकेश्वरर लिंगाच्या खाली एक पाण्याचा झरा आहे. ह्या झऱ्यातलं पाणी कितीही काढलं तरी ते आपोआप परत भरलं जातं. 


क्षेत्र पुराण: 

येथील क्षेत्र पुराणानुसार ह्या स्थळाशी अनेक आख्यायिका निगडित आहेत. 


एकदा भगवान शिव जेव्हा कैलास पर्वतावर ध्यानस्थ होते, श्री पार्वती देवींच्या मनात विचार आला कि मी इथे समोर असताना भगवान शिवांनी ध्यानस्थ का रहावं? त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात भगवान शिवांना थोडंसं चिडवलं. पण भगवान शिव ह्यामुळे क्रोधीत झाले आणि त्यांनी श्री पार्वती देवींना ह्या पापाचं क्षालन करण्यासाठी भूलोकावर जन्म घेण्याचा शाप दिला. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्यांना आश्वासन दिलं ते भूलोकावर येऊन त्यांना ज्ञानोपदेश करतील आणि ह्या पापापासून मुक्ती देतील. श्री पार्वती देवी कावेरी नदीच्या काठावर आल्या आणि त्यांना इथे पाण्यामध्ये एक शिव लिंग दिसलं. थिरुवनैकवळ हि ती जागा आहे जिथे त्यांनी पाण्यामध्ये शिव लिंगाची (अप्पू लिंग) स्थापना करून तपश्चर्या केली. भगवान शिव श्री पार्वती देवींचे गुरु झाले आणि त्यांनी श्री पार्वती देवींना ज्ञानोपदेश केला. ह्यातून हाच बोध होतो कि ज्ञान प्राप्तीसाठी गुरु असणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणलं तर स्वतः आदि पराशक्ती असलेल्या श्री पार्वती देवींना गुरूंची काय आवश्यकता. पण जगाला गुरूंचं महत्व समजविण्यासाठी म्हणून त्यांनी ही लीला केली असावी. ह्या मंदिरामधले शिवाचार्य (म्हणजेच शिव पुजारी) अभिनय करून श्री पार्वती देवी भगवान शिवाची आराधना करत आहेत असं दृश्य सादर करतात.


शिव लिंगाच्या खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याला हेम तीर्थ (पाताळ गंगा) असं म्हणतात. ह्या तीर्थातील पाणी लिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरले जाते. श्री पार्वती देवींनी पण भगवान शिवांची आराधना करण्यासाठी ह्या तीर्थातील पाण्याचा वापर केला असा समज आहे.


ह्या ठिकाणी श्री पार्वती देवींना एक कुमारिका तपश्चर्या करीत आहे आणि आपल्या गुरूंकडून ज्ञान मिळविण्यासाठी वाट बघत आहे अशा रूपात चित्रित केलं आहे.


अजून एका आख्यायिकेनुसार माल्यवान आणि पुष्पदंत नावाचे दोन शिव गण होते. त्यांच्या मध्ये सतत वाद घडायचे. एकदा असाच त्यांच्यामध्ये चाललेला वाद विकोपाला गेलेला असताना माल्यवानाने पुष्पदंताला पुढच्या जन्मी हत्तीचा जन्म प्राप्त होण्याचा शाप दिला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुष्पदंताने माल्यवानाला पुढच्या जन्मी कोळीचा (कीडा) जन्म प्राप्त होण्याचा शाप दिला. त्या शापांचे परिणाम म्हणून पुढच्या जन्मी ते दोघेही ह्या स्थळी हत्ती आणि कोळ्याच्या रूपात जन्माला आले. मात्र त्यांनी आपली शिवभक्ती कायम ठेवली. हत्ती कावेरी नदीतून पाणी आणून अभिषेक करायचा तर कोळी शिव लिंगाभोवती जाळं विणायचा जेणे करून जम्बुच्या झाडाची वाळलेली पाने शिव लिंगावर पडू नयेत. दर दिवशी हे जाळं बघून हत्तीला वाटायचं की शिव लिंगावर धूळ साठली आहे म्हणून तो त्यावर पाणी ओतून स्वच्छ करायचा तर कोळी परत ते जाळं विणायचा. एके दिवशी हत्तीचं हे वर्तन सहन न होऊन कोळी हत्तीच्या कानात शिरून त्याला चावला ज्यामुळे हत्ती मरण पावला. पण ह्यामध्ये तो कोळी पण मरण पावला. पण त्यांची भक्ती बघून भगवान शिव मात्र त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दोघांना शापमुक्त केले. इथे हत्तीने भगवान शिवांची भक्ती केली म्हणून ह्या स्थळाला म्हणून ह्या स्थळाला थिरुआनैका (थिरु म्हणजे पवित्र किंवा माननीय, आनै म्हणजे हत्ती आणि का (काडू) म्हणजे वन). कालांतराने ह्याचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव थिरुवनैकवळ आणि थिरुवनैकोविल असे झाले. पुढच्या जन्मी तो कोळी मनुष्य जन्म पावून एक राजा झाला. आपल्या पूर्वजन्मीच्या हत्तीबद्दल असलेल्या स्पर्धात्मक भावनेमुळे त्याने जी मंदिरे बांधली त्या मंदिरांच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराची उंची इतकी कमी ठेवली कि त्यातून हत्ती आत जाता कामा नये. ह्या प्रवेशद्वारांची उंची ४ फूट आहे तर रुंदी २.५ फूट आहे. शिवाय ह्या मंदिरांचे प्रवेशद्वार पण असे बांधले कि पायऱ्या चढून जायला लागतात ज्यामुळे हत्ती प्रवेश करू शकणार नाही. ह्या मंदिरांच्या शैलीला माडक्कोवील असं म्हणतात. 


श्री पार्वती देवींचे इथे श्री अखिलांडेश्वरी असे नाव आहे. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची देवालये एकमेकांसमोर आहेत. अशा मंदिरांना उपासना स्थळे असं म्हणतात. ह्या मंदिरांमध्ये थिरुकल्याण (भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह सोहळा) साजरा होत नाही कारण इथे श्री पार्वती देवी ह्या भगवान शिवांच्या शिष्या आहेत.    


आदि शंकराचार्यांनी श्री अखिलांडेश्वरी देवींच्या समोर श्री प्रसन्न गणपती ह्यांची मूर्ती स्थापन केली आहे. त्याचबरोबर त्यांनी श्री अखिलांडेश्वरी देवींच्या कानात श्री चक्र रुपातले डूल स्थापन केले. ह्यामुळे श्री अखिलांडेश्वरी ह्यांचा क्रोध शांत झाला असा समज आहे. श्री पार्वती देवी आणि श्री प्रसन्न गणपती ह्यांची देवालयांचा आकार ॐ ह्या प्रणव मंत्रासारखा आहे. 


इथलं एकपद त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू आणि शिव) ह्यांचं चित्र चेन्नईजवळील थिरुवोत्तीयुर ह्या गावात असलेल्या त्यागग्रज मंदिरातल्या चित्रासारखंच आहे. 


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:


मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव

पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव

वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव

मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Monday, December 25, 2023

श्री एकांबरेश्वरर कोविल

तामिळनाडू मधील कांचीपुरम शहरात हे मंदिर स्थित आहे. पंच भूत स्थळांपैकी हे पहिलं मंदिर आहे आणि पंचमहाभूतांपैकी हे पृथ्वी तत्व दर्शवतं. श्रेष्ठ शिवभक्त नायनमारांनी ज्या शिव मंदिरांची स्तुती गायिली आहे त्या २७६ शिव मंदिरांपैकी, ज्यांना एकत्रित पाडळ पेथ्र स्थळे असं म्हणतात, त्या मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये श्री विष्णूंची पण सन्निधी असल्याकारणाने हे श्री विष्णूंच्या १०८ दिव्यदेश मंदिरांपैकी पण एक मंदिर मानलं जातं. तसेच हे पंच मायनं स्थळांपैकी पण आहे. 


मुलवर: श्री एकांबरेश्वरर, श्री एकांबर नादर

देवी: श्री कामाक्षी (श्री ऎळवर कुळाली)

क्षेत्र वृक्ष: आम्र वृक्ष

पवित्र तीर्थ: शिव गंगा तीर्थ


ह्या मंदिराच्या आवारात साधारण ३५०० वर्षे जुनं आंब्याचं झाड आहे. एकं म्हणजे एक आणि अंबर म्हणजे आंबा. म्हणून इथल्या शिवलिंगाचं  श्री एकांबर नादर असं नाव आहे. 


ह्या मंदिराचा आवारा जवळ जवळ २५ एकर वर पसरलेला आहे. हे भव्य मंदिरांपैकी एक समजलं जातं. ह्या मंदिराला ४ गोपुरं आणि १ राजगोपुर आहे. राजगोपुर ११ स्तरांचं असून साधारण १९५ फूट उंच आहे. 


पल्लव राजांनी बांधलेलं हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. कालांतराने चोळा आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अगदी अलीकडे ब्रिटिश राजवटीमध्ये वल्लाळ पचईयप्पा मुदलियार ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या मंदिराच्या आवारात त्यांचा पुतळा आहे. ह्या मंदिराच्या आवारात अनेक मंडप आहेत. त्यातील एका मंडपामध्ये १००० स्तंभ आहेत. ह्या मंडपाला आयिरं (१०००) काल (स्तंभ) मंडप असं म्हणतात. ह्या मंडपाच्या भिंतींना लागून १००८ शिव लिंग स्थापित केली आहेत. येथील कंपाई तीर्थाच्या खाली भूमिगत नदी आहे असा समज आहे. ह्या मंदिराच्या आवारात चार अंगणे आहेत. त्यातील चौथ्या अंगणात श्री गणपती मंदिर आहे आणि एक तलाव आहे. तर तिसऱ्या अंगणामध्ये छोटी छोटी मंदिरे आहेत. पृथ्वी लिंग असं नाव असलेल्या गाभाऱ्यातील शिव लिंगाच्या बाजूला भगवान शिवांचं चित्र आहे. ह्या आणि कांचीपुरम मधल्या इतर शिव मंदिरांमध्ये श्री पार्वती देवींचं स्वतंत्र मंदिर नाही कारण कांचीपुरममध्ये श्री पार्वती देवी श्री राजराजेश्वरी म्हणून राज्य करते. 


मंदिराच्या आवारात एका छोट्या मंदिरात श्री विष्णूंची उभी मूर्ती आहे. ह्या मूर्तीला निल्ल थिंगल थुंडथन असं नाव आहे. इथे श्री विष्णूंची वामन मूर्ती म्हणून पूजा केली जाते. 


येथील क्षेत्र वृक्षाच्या चार शाखांना चार प्रकारचे आंबे येतात. ह्या चार प्रकारच्या आंब्यांना चार वेगळ्या चवी आहेत (कडू, आंबट, गोड आणि खारट). 


आतील परिक्रमेमध्ये १० स्तंभ आहेत. ह्यातील प्रत्येकस्तंभावर काठीने हलकासा वार केल्यास संगीताचा एक स्वर ऐकू येतो. प्रत्येक स्तंभामधून एक असे एकूण १० स्वर ऐकावयास येतात. 


क्षेत्र वृक्षाच्या खाली श्री पार्वती देवी आणि श्री शिवांची मूर्ती बघावयास मिळते. 


इतर मुर्त्या:

श्री ब्रह्मदेवाने पुजीयेले श्री वल्लकंबर, श्री विष्णूंनी पुजीयेले श्री कल्लकंबर, श्री इंद्रदेवांनी पुजीयेले श्री नल्लकंबर, श्री विकट चक्र विनायक, श्री षण्मुख, १०८ शिव लिंगे, ६३ नायनमार, श्री मार्कंडेय ऋषी, श्री भिक्षाटनर, श्री नटराज, प्रलयापासून रक्षण करणारी देवी आणि नवग्रहांच्या मुर्त्या. इथे श्री गणेश मोरावर बसले आहेत अशी एक अत्यंत दुर्मिळ मूर्ती पाहावयास मिळते. 


येथील श्री विष्णूंच्या मंदिराविषयी माहिती:

येथील श्री विष्णूंच्या मूर्तीला श्री चंद्र-चूड-पेरुमल असं नाव आहे. हि मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. श्री महालक्ष्मींचे नाव श्री निल्ल-थिंगल-थिंड-थयार (तामिळ मध्ये नेर-ओरुदर-इल्लवल्ली-नचियार). इथे दैनंदिन पूजा एक शैव पुजारी करतो. मंदिरामधल्या तलावाला चंद्र-पुष्करिणी असे नाव आहे. गाभाऱ्याच्या वरती असलेल्या गोपुराला पुरुष-सूक्त-विमान असे म्हणले जाते.


मुख्य मंदिराची महती:

इथले शिव लिंग स्वयंभू आहे. हे लिंग मातीचे आहे. श्री कामाक्षी देवीने ह्या लिंगाची आराधना केली. श्री कामाक्षी देवीने ह्या लिंगाला आलिंगन दिल्याचे चिन्ह दिसते. गाभाऱ्याच्या समोर पश्चिमाभिमुख स्फटिक लिंग आहे ज्याच्या समोर स्फटिक नंदी आहे. थै ह्या तामिळ महिन्याच्या सप्तमीला म्हणजेच रथ-सप्तमीला सूर्याची किरणे ह्या लिंगावर पडतात. इथल्या आंब्याच्या झाडाला चार फांद्या आहेत. प्रत्येक फांदी एक वेद असे चार फांद्या चार वेद दर्शवतात. श्री शिवांची उत्सव मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये काचेच्या आवरणामध्ये आहे. ५००८ रुद्राक्षांनी बनवलेल्या मंडपामध्ये हि मूर्ती आहे. ह्या रुद्राक्षांमधून श्री शिवांच्या हजारो प्रतिमा प्रतिबिंबित होतात. ह्या शिवाय इथे प्रभू रामचंद्रांनी ब्रह्महत्येच्या दोषाचे निरसन करण्यासाठी पुजीयेले सहस्र लिंग (१००८) आणि अष्टोत्तर लिंग (१०८) बघावयास मिळतात. येथील श्री गणेशांना श्री विकट-चक्र-विनायक असे नाव आहे तर श्री मुरुग ह्यांचे श्री मावदी-सुंदरर असे नाव आहे. 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री पार्वतीदेवींनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या हाताने श्री शिवांचे डोळे मिटले. ज्यावेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यावेळी दोषनिरसनासाठी श्री शिवांकडे उपाय विचारला. श्री शिवांनी श्री पार्वतीदेवींना पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री पार्वती देवी कांचीपुरमजवळ मांकाडू (आंब्याच्या वनात) मध्ये  आल्या आणि एका आंब्याच्या झाडाखाली मातीचे शिव लिंग तयार करून तिथे तपश्चर्या चालू केली. एका अग्निकुंडात उभं राहून त्यांनी तपश्चर्या चालू केली. ह्या अग्निकुंडाच्या बाजूला अजून चार अग्निकुंडे होती. ह्या पांच अग्निकुंडांना एकत्रित पंचाग्नी कुंड असं म्हणतात. श्री पार्वतीदेवींची परीक्षा घेण्यासाठी श्री शिवांनी गंगानदीला पूर आणून तिला श्री पार्वतीदेवींच्या दिशेने पाठवले जेणेकरून त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येईल. त्या पुराच्या पाण्यात शिव लिंग वाहून जाईल ह्या चिंतेने श्री पार्वतीदेवींनी त्या लिंगाला आलिंगन देऊन घट्ट धरून ठेवलं. ह्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि दोषापासून मुक्त केलं आणि परत श्री पार्वतीदेवींशी विवाह केला. 


अजून एका आख्यायिकेनुसार शैव संत सुंदरर ह्यांना त्यांच्या डाव्या डोळ्याची गेलेली दृष्टी परत प्राप्त झाली. श्री अनंथथाई नावाच्या भगवान शिवांच्या एक दासी पृथ्वीवर भगवान शिवांची भक्ती करत होत्या. एका तीर्थयात्रेमध्ये श्री सुंदरर ह्यांची श्री अनंथथाइंची भेट झाली. श्री सुंदरर ह्यांनी त्यांच्याबरोबर विवाह केला आणि वचन दिलं कि ते त्यांना कधीही सोडून जाणार नाहीत. पण श्री सुंदरर ह्यांनी ते वचन मोडलं आणि त्यामूळे त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. एका तीर्थयात्रेमध्ये ते ह्या स्थळी आले आणि त्यांनी भगवान शिवांकडे आपल्या चुकीची क्षमायाचना केली. भगवान शिवांनी ती मान्य केली आणि त्यांना त्यांची दृष्टी परत मिळवून दिली. 


आंब्याच्या झाडाखाली भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहाचे दृश्य चित्रित केले आहे. ह्या दृश्यातले भगवान शिव हे नवरदेव रूपात आहेत. ह्या आंब्याच्या झाडाला वेद-मारं असं म्हणतात. 


नील-थुन्डु-पेरुमल: समुद्रमंथनामध्ये वासुकी नाग हा दोर बनला होता. मंथन चालू असताना त्याच्या तोंडातून गरम विषारी वायू बाहेर पडत होते. भगवान विष्णूंवर ह्या वायूचा प्रभाव पडून ते अस्वस्थ झाले. ह्या अस्वस्थतेपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिवांच्या शिरावरील चंद्रकोरीच्या शीतल किरणांनी भगवान विष्णूंना स्वस्थता प्राप्त झाली. म्हणून इथे भगवान विष्णूंना नील-थुन्डु-पेरुमल असे नाव आहे. 


एकदा श्री पार्वती देवींना भगवान शिवांनी श्रीकाळी देवीसारखा काळा वर्ण प्राप्त होण्याचा शाप दिला. ह्या शापाचं निरसन करण्यासाठी श्री पार्वती देवींनी वेगवती नदीच्या काठाशी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करण्यास आरंभ केला. त्यांची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी त्यांच्यावर ज्वाळांचा वर्षाव केला. श्री पार्वती देवींनी आपल्या भावाची म्हणजेच भगवान विष्णूंची मदत घेतली. भगवान विष्णूंनी भगवान शिवांच्या शिरावरील शीतल चंद्रकोर आणून ह्या ज्वाळांना शांत केलं. त्यानंतर भगवान शिवांनी श्री गंगा नदीला श्री पार्वती देवींच्या दिशेने फिरवलं. श्री पार्वती देवींनी श्री गंगा देवींना आपण भगिनी असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे श्री गंगा देवींनी त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणला नाही. त्यानंतर श्री पार्वती देवींनी मातीचं  शिव लिंग तयार करून त्याची आराधना केली. ह्या आराधनेवर प्रसन्न होऊन ह्या आंब्याच्या झाडाखाली भगवान शिवांनी त्यांच्याशी पुनर्मीलन केले. म्हणून ह्या स्थळी भगवान शिवांचे श्री एकांबरेश्वर (आंब्याच्या झाडाचे स्वामी) असे नाव आहे. 


६३ नायनमारांपैकी थिरु कुरिप्पू थोंड नायनमार हे ह्या मंदिराजवळ राहायचे.ते व्यवसायाने धोबी होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शिव तिथे एका शैव ब्राह्मणाच्या रूपात प्रगट झाले. त्यांनी त्या धोब्याला काही कपडे देऊन ते सूर्यास्ताच्या आत धुण्यास सांगितले. त्याचवेळेस त्यांनी त्यादिवशीची संध्याकाळ खूप ढगाळ बनवली ज्यामुळे सूर्यास्त झाल्याचा भास झाला. आपण आपले वचन पूर्ण करू शकलो नाही ह्या भावनेने त्या धोब्याने आपले शिर एका दगडावर आपटले. त्याच्या ह्या कृत्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्या धोब्याला आपली मूळ रूपात दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला. 


प्रार्थना: 


१. हे सिद्ध स्थळ आहे. इथे वरदान प्राप्त होतं ह्या समजुतीने भक्त दर्शन घेण्यास येतात. 

२. मनःशांती प्राप्त करण्यास पण इथे भक्त दर्शनास येतात. 

३. ह्या ठिकाणी भगवान शिव हे नवरदेवाच्या रूपात आहेत म्हणून इथे बरेच भक्त विवाह संपन्न करण्यास येतात. 


सण:


पंगूनी (मार्च-एप्रिल): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव ज्याची सांगता कल्याणोत्सवाने होते. पाचव्या दिवशी श्री एकांबरेश्वर ह्यांची मूर्ती रुपेरी रथातून मिरवली जाते. सकाळी श्री नंदिदेवांची मिरवणूक निघते तर संध्याकाळी श्री रावणेश्वर ह्यांची मिरवणूक निघते. सहाव्या दिवशी सकाळी ६३ नायनमारांची मिरवणूक निघते आणि संध्याकाळी परत श्री एकांबरेश्वरांची रुपेरी रथातून मिरवणूक निघते. नवव्या दिवशी रौप्य मावदि नावाची पूजा आंब्याच्या झाडाखाली केली जाते. 


प्रत्येक सप्ताहामधल्या सोमवारी आणि शुक्रवारी पूजा केली जाते. 


प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, कृतिका नक्षत्र, चतुर्थी आणि प्रदोषकाळी पूजा केली जाते. 


तामिळ आणि इंग्लिश नववर्ष दिन, दिवाळी आणि संक्रांतीच्या दिवशी विशेष अभिषेक केले जातात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Monday, December 18, 2023

पंच भूत स्थळे

ज्या स्थानांमध्ये शिव लिंगाची आराधना अधिक फलदायी होते त्या स्थानांमध्ये पंच भूत स्थळे हि अग्रगण्य मानली जातात. 

सृष्टी हि पंच महाभूतांनी बनलेली आहे. पंच महाभूते म्हणजे सृष्टीमधले पांच मूळ घटक - पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पंच भूत स्थळे म्हणजे ह्या प्रत्येक स्थळामध्ये त्या त्या घटकाच्या रूपात शिव लिंग प्रकट झाले आहे किंवा ह्या प्रत्येक स्थळामधील शिवलिंगामध्ये ते ते घटक निहित आहे.


ह्या पांच स्थळांपैकी चार स्थळे तामिळ नाडूमध्ये आहेत तर एक आंध्रप्रदेश मध्ये आहे. खालील कोष्टकामध्ये ह्या पांच स्थळांची माहिती दिली आहे.



घटक 

शिव लिंग 

मंदिर (भगवान शिवांचे नाव) 

श्री पार्वती देवीचे नाव 

ठिकाण 

पृथ्वी 

पृथ्वी लिंग 

श्री एकांबरेश्वरर 

श्री कामाक्षी

कांचीपुरम, तामिळनाडू 

जल 

अप्पू (जंबू) लिंग 

श्री जम्बुकेश्वरर

श्री अखिलांडेश्वरी 

थिरुवनैकवळ (त्रिची जवळ), तमिळनाडू   

अग्नी

अग्नी लिंग 

श्री अरुणाचलेश्वरर 

श्री उन्नमलै देवी 

थिरुवन्नमलै, तामिळनाडू

वायू 

वायू लिंग 

श्री काळहस्तीश्वरर 

श्री जननप्रसन्नाम्बा 

श्री काळहस्ती (श्री तिरुपती जवळ), आंध्र प्रदेश 

आकाश 

आकाश लिंग

श्री थील्लैनटराज

श्री शिवकामी 

चिदंबरम,   तामिळनाडू 


ह्या प्रत्येक स्थळाबद्दल थोडी अधिक माहिती 


कांचीपुरम:

येथील शिव लिंग पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. येथे  भगवान शिवांचे श्री एकांबरेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री कामाक्षी देवी असे नाव आहे. पुराणांमध्ये अशी कथा आहे कि श्री पार्वती देवीने येथे एका आंब्याच्या झाडाखाली मातीचे (पृथ्वीचे) लिंग तयार करून त्याची पूजा केली. अजून एका स्थलपुराणानुसार पृथ्वी लिंग तामिळनाडूमधल्या थिरुवरुर ह्या जागेत आहे.


थिरुवनैकवळ:

येथील शिव लिंग जल तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री जम्बुकेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री अखिलांडेश्वरी देवी असे नाव आहे. येथील गाभाऱ्यामध्ये जमिनीखाली एक पाण्याचा झरा आहे. अशी आख्यायिका आहे की श्री पार्वती देवींना त्यांच्या अयोग्य वर्तनातून प्राप्त झालेल्या पापाचे निरसन करण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना येथे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेनुसार श्री पार्वती देवीं येथे जंबू वनात आल्या. त्यांना एका श्वेत जंबू झाडाखाली कावेरी नदी दिसली आणि त्या पाण्याने त्यांनी शिव लिंग तयार करून तेथे शिव लिंगाची आराधना केली. हे ठिकाण तामिळनाडू मधल्या त्रिची शहराजवळ आहे. 


थिरुवन्नमलै:

येथील शिव लिंग अग्नी तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री अरुणाचलेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री जननप्रसन्नाम्बा देवी असे नाव आहे. पुराणांनुसार भगवान शिव येथे एका अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांना ह्या स्तंभाचा उगम आणि अंत मिळाला नाही. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी अग्निस्तंभाच्या रूपातून पर्वत रूपात स्थित झाले. ह्या पर्वतालाच शिव लिंग मानले जाते. येथे भगवान शिव अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले म्हणून ह्या स्थळाला अरुणाचलम असे नाव आहे तर भगवान शिवांना श्री अरुणाचलेश्वरर असे नाव आहे. आणि शिव लिंगाला अग्नी लिंग असे म्हणतात. 


श्री काळहस्ती:

येथील शिव लिंग वायू तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री काळहस्तीश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री उन्नमलै देवी असे नाव आहे. येथे तीन कट्टर शिवभक्तांनी तपश्चर्या केली. १) कोळी (श्री), २) सर्प (काळ) आणि ३) हत्ती (हस्ती). ह्या तिघांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं की त्यांची नावे येथील वायूलिंगाच्या नावामध्ये निहित होतील. म्हणून येथील शिवलिंगाला श्रीकाळहस्तीश्वरर असे नाव आहे. ह्या क्षेत्राच्या महती दर्शवणाऱ्या बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हे स्थळ राहू-केतूंचे क्षेत्र समजले जाते कारण येथे पुजार्चना केल्यामुळे राहू, केतू आणि सर्प दोषांचे निवारण होते असा समज आहे. 


चिदंबरम:

येथील शिव लिंग आकाश तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री थील्लैनटराज असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री शिवकामी देवी असे नाव आहे. शिव पुराणानुसार भगवान शिव ह्या स्थळी असलेल्या थील्लैवनामध्ये श्री मोहिनी रूपात असलेल्या श्री विष्णूंबरोबर विहार करत होते. ह्यामुळे ह्या वनात तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना त्यांच्या तपश्चर्येमध्ये बाधा होत होती. त्यांनी विविध मायावी विधी करून ह्या दोघांना तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये काही यश आले नाही. भगवान शिवांनी त्या ऋषींना आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे कंठाभोवती सर्प आणि चेहऱ्यावर स्मितहास्य अशा रूपात दर्शन दिलं आणि अपस्मार (अंधःकार दर्शवणारा राक्षस) राक्षसाच्या शरीरावर आनंद तांडव नृत्य केलं. म्हणून येथे भगवान शिवांना श्री थील्लैनटराज असं नाव आहे. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, December 7, 2023

Saptasthanam Temples around Kumbhakonam

From this week we are starting to post information about Saptasthana temples around Kumbhakonam. Earlier in 2022 we posted Religious significance of Kumbhakonam and also Puranik importance of Kumbhakonam where we attempted to describe significance of Kumbhakonam. 

As mentioned in those articles - According to an old saying a sin committed in a kshetra can be nullified by visiting and praying at another punya kshetra. A sin committed in a punya kshetra can be washed off by visiting and worshiping at Varanasi. A sin committed in Varanasi can only be washed at Kumbhakonam. But sin committed in Kumbhakonam can be washed off in Kumbhakonam itself. It means that at other places, to wash off sins, we have to go to other places whereas Kumbhakonam is only place where sins committed here can be washed off only at Kumbhakonam. This indicates the greatness of Kumbhakonam.

We also mentioned in those articles a list of seven Shiva temples around Kumbhakonam collectively known as Saptasthana Shiva temples around Kumbhakonam. In upcoming weeks we will posting information about each of these seven temples.