Thursday, July 30, 2020

दर्भारण्येश्वरर मंदिर थिरुनळ्ळारू, शनि ग्रहाचे मंदिर




हे मंदिर पॉंडिचेरी मधल्या कारैकाल जिल्ह्यातल्या थिरुनळ्ळारू गावात आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे जरी शिव मंदिर असलं तरी नवग्रहांपैकी शनि स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 


मुख्य दैवत: दर्भारण्येश्वरर, थिरुनळ्ळार-इश्वरर्

देवी: प्राणांबिका, भोगमार्ता - पुण्मुलैयाल, प्राणेश्वरी

क्षेत्र वृक्ष: दर्भ

पवित्र तीर्थ: नळ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. अन्न तीर्थ आणि गंगा तीर्थ ही तीर्थे नळविनायक मंदिराच्या जवळ असलेल्या एका विहिरी मध्ये आहेत. ह्या शिवाय इथे अष्ट दिक्पालांपैकी  प्रत्येक दिक्पालाचं एक अशी आठ तीर्थे आहेत. 


वैशिष्ठ्य: पुराणांमध्ये उल्लेखल्याप्रमाणे हे स्वयंभू शिवलिंग दर्भ गवतामध्ये सापडलं हे दर्शवणाऱ्या दर्भ गवताच्या खुणा ह्या शिवलिंगावर दिसतात. 


हे स्थळ सप्त विडंग स्थळांपैकी एक आहे. ५१ शक्तीपीठांपैकी पण हे एक पीठ समजलं जातं.


आख्यायिका

पुराणांनुसार, सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली. 


शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यां लिंगांची तपश्चर्या केली. 


ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नळ्ळार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नळ्ळेश्वर आहे.  


अजून एका पुराणांतील आख्यायिकेनुसार पुत्रप्राप्तीसाठी भगवान विष्णूंनी इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांची उपासना केली आणि त्यांना मन्मथ हा पुत्र झाला. ह्याची परतफेड म्हणून भगवान विष्णूंनी इथे सोमस्कंद मूर्तीची (भगवान शिव आणि माता पार्वती आणि त्यांच्यामध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय) स्थापना केली. पुढे काही काळानंतर भगवान विष्णूंनी ही मूर्ती इंद्र देवाला दिली. इंद्रदेवाने ह्या मूर्तीची उपासना केल्याने त्याला जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री ह्यांची प्राप्ती झाली. इंद्रदेवाने नंतर ह्या मूर्तीच्या अजून सहा प्रतिकृती केल्या आणि त्या सर्व त्याने मुचगंद राजाला दिल्या. मुचगंद राजाने त्याला मिळालेल्या सात मुर्त्यांची सात ठिकाणी स्थापना केली आणि ह्या सर्व सात स्थळांना सप्तविडंग असं संबोधलं जातं. हे सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाला त्यागराज विडंग असं पण संबोधलं जातं.


ह्या मंदिरातील इतर देवस्थाने:

मुख्य देवस्थानाच्या दक्षिण दिशेला मेंढपाळ, त्याची पत्नी आणि लेखापाल (अकाउंटंट) ह्यांच्या मुर्त्या आहेत. आख्यायीका अशी आहे की मंदिराला दूध पुरविण्याच्या हिशोबावरून लेखापालाने मेंढपाळाला फसविले. गावाच्या राजाकडून मेंढपाळाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालाचा आपल्या त्रिशुळाने वध केला. भगवान शिवांनी लेखापालावर फेकलेल्या त्रिशुळाला मार्ग देण्यासाठी नंदी आणि बलीपीठ थोडे बाजूला झाले. म्हणूनच नंदी आणि बलीपीठ हे आजही शिवलिंगाच्या सरळ रेषेमध्ये नाहीये. 


आख्यायिकेनुसार भगवान विष्णू, ब्रह्म देव, इंद्र देव, सरस्वती देवी, अष्टदिक्पाल, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस आणि अर्जुन ह्यांनी पण इथे शिवाची उपासना केली. 


आणखी काही वैशिष्ट्ये:

राजगोपुरम् ला नमस्कार करून मंदिरामध्ये शिरताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या चौकटीला शनिदेव लपलेले आहेत. आख्यायिकेनुसार शनिदेवांनी नळ राजाला त्रास दिल्याने भगवान शिव त्यांच्यावर क्रोधीत झाले आणि ह्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते ह्या प्रवेशद्वारामध्ये येऊन लपले. 


येथील इतर देवस्थाने:

स्वर्ण गणपती, मुरुगन, नटराज, सोमस्कंद. आदिशेष, नायन्मार, महालक्ष्मी, सूर्य आणि भैरव ह्यांच्या मुर्त्या पण येथे दिसतात. नळ राजा आणि त्याने पुजलेलं शिव लिंगपण येथे आहे. शिव मंदिरामध्ये सहसा असणाऱ्या कोष्ट मुर्त्या पण इथे दिसतात.  त्यागराज विडंग म्हणजे हिरव्या पाचूच्या विडंगाचे इथे स्वतंत्र देऊळ आहे.


मंदिरात साजरे होणारे सण:

१) शनी संक्रमण 

२) शनिवारी येथे शनिदेवाची विशेष पूजा असते 

३) पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) ह्या तामिळ महिन्यामध्ये हिरव्या पाचूच्या लिंगाची विशेष पूजा केली जाते 

४) वैकासि (मे-जून) ह्या तामिळ महिन्यामध्ये १० दिवस ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. 


आभार: खाली दिलेल्या वेब साईट्स वरून काही माहिती ह्या पोस्ट मध्ये समाविष्ट केली आहे

1. https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ 2. https://temple.dinamalar.com/en/

3. http://www.indiatemples.in/

Thursday, July 9, 2020

थिरुअग्नीश्वरर - कंजनूर - शुक्र ग्रहाचे मंदिर



हे मंदिर शुक्र ग्रहाचे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर अंदाजे २००० वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्यातल्या कंजनूर गावामध्ये हे मंदिर आहे. 

मुख्य दैवत: अग्निश्वरर् 
देवी (अम्मन): श्री कर्पगम् अम्बाळ 
क्षेत्र वृक्ष: पळस, फणस 
पवित्र तीर्थे: अग्नी तीर्थ, पराशर तीर्थ, ब्रह्म तीर्थ (कावेरी), चंद्र तीर्थ, अंजनेय तीर्थ आणि मणिकर्णिका तीर्थ 
ऐतिहासिक / पौराणिक नांवे: पळस अरण्य, पळसापुरम, ब्रह्मपुरी, अग्निपुरम, कंसपूरम 

येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 

ह्या क्षेत्राची वैशिष्ठ्ये

हे नवग्रहांमधील शुक्रदेवाचं स्थळ आहे आणि शुक्रदेवाने तपश्चर्या केलेल्या स्थळांपैकी एक आहे. इथे शुक्रदेवाचे स्वतंत्र देवस्थान आहे. ह्या मंदिराचं एक वैशिष्ठय म्हणजे इथे भगवान शिव आणि माता पार्वती ह्यांचं एकत्र देवस्थान आहे. ब्रह्मदेवाला त्यांनी वधूवरांच्या रूपात ह्या ठिकाणी दर्शन दिलं असा समज आहे. आणि म्हणूनच जसं विवाहाच्या वेळी पत्नी पतीच्या उजव्या बाजूला असते, त्याप्रमाणे पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्या बाजूला आहेत. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी तांडव नृत्य करत पराशर ऋषींना मुक्ती दिली म्हणून येथील नटराजांच्या मूर्तीला मुक्ती तांडव मूर्ती म्हणतात. भगवान शुक्रांना इथे कंजन असे नाव आहे. आणि म्हणूनच ह्या गावाचे नाव कंजनूर आहे. 

शुक्रदेवांना अनेक नावे आहेत. इथे त्यांना अजून दोन नावांनी ओळखले जाते - एक म्हणजे कवि आणि दुसरे म्हणजे भार्गव. ऋषी भार्गव आणि देवी पुलोमजा ह्यांचे ते पुत्र म्हणून त्यांना भार्गव असे म्हणले जाते. 

चंद्रदेवाला ह्या ठिकाणी त्याच्या शापातून मुक्ती मिळाली. ऋषी व्यासांच्या सल्ल्यानुसार अग्निदेवाने ह्या ठिकाणी तपश्चर्या केल्याने त्याचे रोगनिवारण झाले. म्हणूनच इथे भगवान शिवांना अग्नीश्वर असे नाव आहे. 

मथुराधिपती कंस राजाने पण ऋषी शुक्राचार्यांच्या सल्ल्याने इथे तपश्चर्या केल्याने त्याचे पण रोगनिवारण झाले. म्हणूनच ह्या स्थळाला कंसपूरम असं पण नाव आहे. 

हरदत्तशिवाचार्य ह्यांनी “ॐ नमः शिवाय” ह्या पंचाक्षरी मंत्राचं महत्व ह्याच ठिकाणी प्रस्थापित केले. 

मंदिरातील मुर्त्या

१) कोष्टम् मध्ये, म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, नर्तन गणपती, दक्षिणामूर्ती, लिंगोद्भवर, दुर्गा आणि चंडिकेश्वर ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
२) देवी पार्वतीच्या देवस्थानाच्या बाजूला आदि कर्पगम्बाळ ह्यांची मूर्ती आहे. 
३) परिक्रमेमध्ये विनायक, मयूर सुब्रह्मण्य आणि महालक्ष्मी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
४) पळस वृक्षाच्या खाली अग्नीश्वरर लिंग आहे. 
५) शिव लिंगा जवळ मनकंचनारर, कुलिकमर, सुरैकाय भक्तर आणि त्याची पत्नी ह्यांच्या मुर्त्या आहेत. 
६) महामंडपामध्ये भैरव, सूर्य, चंद्र, नवग्रह आणि नालवार (श्रेष्ठ शैव संत) ह्यांच्या मुर्त्या आहेत. 

आख्यायिका

१) पुराणांनुसार शुक्राचार्यांनी त्यांच्या पत्नीची हत्या केल्याबद्दल भगवान विष्णूंना शाप दिला. त्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी भगवान विष्णूंनी ह्या ठिकाणी हरदत्तशिवाचार्य नावाच्या शिवभक्ताच्या रूपात भगवान शिवांची उपासना केली. 

२) कट्टर वैष्णव वासुदेवाचा सुदर्शन नावाचा पुत्र होता. वैष्णव कुटुंबात जन्म घेऊन पण सुदर्शन भगवान शिवांची भक्ती करीत होता. ह्या ठिकाणी तापलेल्या लोखंडी खुर्चीवर बसून भगवान शिवांचं नाव घेत असलेल्या सुदर्शनची मूर्ती आहे. अजून एक मूर्ती आहे जिथे हरदत्तशिवाचार्य दक्षिणामूर्तींच्या रूपात आहेत. 

३) एक ब्राह्मण होता ज्याला एका वासरूच्या हत्येसाठी जबाबदार धरलं गेलं होतं. बाकीच्या ब्राह्मणांनी ह्या ब्राह्मणाला गोहत्येचा आरोप लावून जातीबाहेर काढलं होतं. हरदत्तशिवाचार्यांनी आरोप लावलेल्या ब्राह्मणाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्याला परत जातीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साक्ष म्हणून एका नंदीच्या दगडी मूर्तीकडून गवताचं सेवन केलं. 

४) ब्रह्मदेवांनी येथे त्यांना शिवपार्वतींच वधुवर रूपामध्ये दर्शन व्हावं आणि ह्या दर्शनाचा लाभ इतरांना पण व्हावा म्हणून तपश्चर्या केली. आणि म्हणूनच इथे भगवान शिवांचं देवस्थान उजव्याबाजूला (दर्शन घेणाऱ्याच्या) तर देवी पार्वतींचं देवस्थान डाव्याबाजूला आहे. 

५) पुराणांनुसार शुक्र (शुक्राचार्य) हे दैत्यगुरू होते आणि त्यांना संजीवनी मंत्र अवगत होता ज्याच्या सहाय्याने ते युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना परत जिवंत करू शकत होते. 

६) असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं. 

७) असा समज आहे की चंद्र, पराशर मुनी आणि कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत. 

८) ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव अग्निश्वरर् असे आहे), ३. पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ 

शुक्र ग्रहाचा इतिहास

पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे. 

शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली. 

शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले. 

शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति. 

शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं. 

मंदिरात साजरे होणारे सण

१) आदि ह्या तामिळ महिन्याच्या पुरम (पुर्वा फाल्गुनी) नक्षत्रावर इथे सण साजरा केला जातो 
२) मासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (फेब-मार्च) मासी मघा सण साजरा केला जातो. 
३) हरदत्तशिवाचार्यांचा सण थाई तामिळ महिन्यामध्ये (जॅन-फेब) साजरा केला जातो 
४) पुरत्तासी ह्या तामिळ महिन्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) नवरात्री सण साजरा केला जातो. 
५) ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा आणि अंजनेय पूजा पण इथे केली जाते

Thursday, July 2, 2020

थिरुआपत्सहायेश्वरर - आलंगुडी - गुरु ग्रहाचे मंदिर



कुंभकोणम पासून मन्नारगुडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १७ किलोमीटरवर हे मंदिर आहे. नवग्रहस्थळांपैकी गुरुग्रहाचे हे स्थान आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर आहे. श्रेष्ठ ६३ शिवभक्त जे नायन्मार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी पुजलेल्या २७५ शिव मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. 

मुख्य दैवत: आपत्सहायेश्वरर, काशीनारायणेश्वरर 
उत्सव मूर्ती: भगवान दक्षिणामूर्ती 
अम्मन: एलवरकुळाली, उमाई अम्मन 
क्षेत्र वृक्ष: रेशीमसूत (तामिळ मधे पुलै) 
पवित्र तीर्थ: ब्रह्मतीर्थ, अमृत पुष्करिणी आणि १३ इतर तीर्थे 
पौराणिक नाव: विरूमपुल्लै 
स्थळांचं नाव: आलंगुडी 
जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू) 

वैशिष्ठ्ये
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य देवस्थान (शिवलिंग) हे स्वयंभू आहे. हे स्थळ गुरु स्थळ किंवा दक्षिणामूर्ती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुदोषांचं परिहारस्थळ म्हणून पण प्रसिद्धआहे. 

ठळक वैशिष्ठ्ये
प्रत्येक वर्षी मासी महिना (तामिळ) (फेब-मार्च) मध्ये भगवान दक्षिणामूर्तींच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो. गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस शुभ मानला जातो. पण मासी महिन्यातला हा दिवस त्याहीपेक्षा शुभ मानला जातो. गुरु देवाचं प्रत्यक्ष दर्शन इथे नाही. पण भगवान दक्षिणामूर्तींना इथे गुरु म्हणून मानलं जातं कारण ह्या ठिकाणी त्यांनी सनकादि मुनींना उपदेश दिला. किंबहुना गुरुपरंपरेमध्ये दक्षिणामूर्तींना आदिगुरु मानलं जातं. 

दोन कारणांमुळे ह्या स्थळाला आलंगुडी म्हणलं जातं. १) काळं रेशीमसूत हे इथलं क्षेत्र वृक्ष आहे २) समुद्रमंथनातून निर्माण झालेलं विष प्राशन केल्यावर भगवान शिव इथे येऊन बसले. 

हे पंचारण्य स्थळांपैकी एक आहे. थिरुवदैमुरुथुर येथील भगवान महालिंगेश्वरांचे हे परिवार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. इथे एका स्वतंत्र देवस्थानामध्ये शेळीचे शिर असलेल्या दक्षाची (पार्वतीचे पिता) मूर्ती आहे. दक्षाने केलेल्या यज्ञावेळी आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने जेव्हा सतीने (दक्षाची पुत्री) यज्ञकुंडात उडी घेऊन आपली आहुती दिली त्यावेळी भगवान शिवांचे सेनापती वीरभद्र ह्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला. देवी पार्वतीच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शेळीचे शिर लावून दक्षाला जीवदान दिले. 

शुक्रवार अंबिका (म्हणजेच पार्वती) हिचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. शुक्रवारी येथे विशेष पूजा केली जाते. 

हिंदू धर्मानुसार माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्याची माता, दुसरा गुरु म्हणजे पिता आणि तिसरा गुरु म्हणजे गुरु (जो गुरुकुलात शिकवतो म्हणजेच भगवान दक्षिणामूर्ती). म्हणूनच इथे ह्याच क्रमाने पार्वती (माता), भगवान शिव (पिता) आणि भगवान दक्षिणामूर्ती (गुरु) ह्यांची देवस्थाने आहेत. 

आख्यायिका

१) अमूथोहर ह्या मुकुंद चक्रवर्ती राजाच्या मंत्र्याने हे मंदिर बांधलं, पण आपलं पुण्य मात्र त्याने आपल्याकडेच ठेवलं. राजाला हे न रुचल्याने त्याने मंत्र्याचा शिरच्छेद केला. राजसभेमध्ये मंत्र्याच्या नावाचा प्रतिसाद उमटला. राजावर ब्रह्महत्येचा दोष आला. ह्या मंदिरात उपासना करून त्याने ह्या दोषाचे निवारण केले. 

२) येथील सुंदर मूर्ती नायनार ह्यांच्या मूर्तीवर चेचक रोग (स्मॉल पॉक्स) झाल्याची चिन्हं आहेत. त्याची आख्यायिका अशी आहे. अन्य मूर्तींसमवेत ही मूर्ती पण थिरुवरुर येथील राजाने आलंगुडीवरून थिरुवरुरला नेली आणि तो परत द्यायला तयार नव्हता. आलंगुडी येथील पुजाऱ्याने युक्ती लढवली. त्याने मूर्तीला एका कापडात बांधलं आणि जेव्हा द्वारपालांनी अडवलं त्यावेळी त्याने आपण चेचक रोग झालेल्या लहान मुलाला घेऊन जात आहोत असे सांगितले. आलंगुडी मध्ये आल्यावर जेव्हा त्या पुजाऱ्याने ते कापड उघडलं त्यावेळी त्या मूर्तीवर चेचक रोगाची चिन्हं दिसली. 

३) संतान प्राप्ती साठी देवी महालक्ष्मीने येथे भगवान शिवांची उपासना केली. 

४) आलंगुडीच्या जवळ थिरूमनमंगला ह्या ठिकाणी भगवान शिवांशी विवाहबद्ध होण्याआधी देवी पार्वतीने येथे (आलांगुडीमध्ये) तपश्चर्या केली. विवाहाच्या वेळी भगवान महाविष्णू, ब्रह्मदेव, इंद्रदेव, देवी लक्ष्मी, अष्टदिक्पाल आणि वीरभद्र उपस्थित होते. 

५) संत सुंदरर ह्यांना येथे भगवान दक्षिणामूर्तींकडून पंचाक्षर मंत्राचा उपदेश मिळाला. 

६) आदि शंकराचार्यांना इथे भगवान दक्षिणामूर्तींकडून महावाक्याचा उपदेश मिळाला. 

७) वीरभद्र, कश्यप ऋषी, विश्वामित्र ऋषी, मुचगंद राजा ह्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. 

८) एकदा पार्वती देवी फुलांच्या चेंडूबरोबर खेळत असताना तिनें चेंडू उंच उडवला आणि तो झेलण्यासाठी तिने आपले हात वरती केले. सूर्य देवाला वाटले की हा आपल्यासाठी थांबण्याचा संकेत आहे म्हणून तो थांबला. पण ह्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवरचं जीवन, जे सूर्याच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे, ते विस्कळीत झालं. जेव्हां भगवान शंकरांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पार्वतीदेवीला पृथ्वीवर जन्म घेण्यास सांगितले. असा समज आहे की ह्या ठिकाणी पार्वती देवीने भगवान शंकरांना परत प्रसन्न करून त्यांच्याबरोबर विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. आणि तो विवाह येथून जवळ असलेल्या थिरूमनमंगला ह्या ठिकाणी संपन्न झाला. ह्या विवाहाच्या वेळेस सर्व देव उपस्थित होते. हे मंदिर स्वतः पार्वती देवीने निर्माण केले आहे असा समज आहे. ह्या स्थळाला पूर्वी काशीअरण्य असे म्हणत आणि म्हणूनच ह्या स्थळाला काशी इतकेच महत्व आहे. 

९) गजमुख नावाचा असुर होता जो देव आणि मानवांना खूप कष्ट देत होता. भगवान शंकरांनी आपल्या पुत्राला म्हणजेच गणपतीला गजमुखाला शिक्षा देण्यासाठी पाठवले. म्हणूनंच ह्या स्थळी गणपतीचे मंदिर आहे आणि इथल्या गणपतीला कात्त-विनायगर (कात्त = (रक्षणकर्ता) + विनायक (गणपती) + आकार) असे नांव आहे. 

इतर देवस्थाने

विनायक, वळ्ळी आणि दैवानै ह्या दोन पत्नींसमवेत भगवान मुरुगन, नटराज आणि शिवकामी, सोमस्कंद, सूर्य, चंद्र, काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी, सप्तलिंग (सूर्येश्वरर, सोमेश्वरर, घृष्णेश्वरर, सोमनाथ, सप्तऋषीनादर, विश्वनाथ, ब्रह्मेश्वर), वरदराज पेरुमल आणि श्रीदेवी, नळवार, शनि, भैरव, सप्तमाता, ऋषी विश्वामित्र आणि ऋषी अगस्त्य ह्यांच्या मुर्त्या परिक्रमेमध्ये दिसतात. 

गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतीमध्ये, म्हणजेच कोष्टम् मध्ये, कोष्ट मुर्त्या आहेत. भगवान दक्षिणामूर्तींचे स्वतंत्र देवस्थान आहे आणि त्यांची गुरु म्हणून पूजा केली जाते. 

मंदिरातील अजून काही वैशिष्ठ्ये

१) इथे भगवान दक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी केली जाते. अन्य देवांची नाही. 
२) इथे स्वतंत्र नागसंनिधी आहे. नागदोषाचे निवारण होण्यासाठी इथे पूजा करतात. ह्या गावी कधी नागदंशामुळे मृत्यू होत नाही. 
३) इथे सायंकाळी भगवान शिवांची पूजा केली जाते. 
४) भगवान मुरुगन ह्यांची पूजा करण्याआधी ऋषी अगस्त्य ह्यांची पूजा केली जाते. 
५) श्री महालिंगेश्वर ह्यांच्या परिवार स्थळांमध्ये पुढील देवस्थाने आहेत: १) थिरुवलमचुळी विनायक देवस्थान, २) स्वामी मलय देवस्थान, ३) आलंगुडी भगवान दक्षिणामूर्ती देवस्थान, ४) थिरुवडुदुराई नंदी देवस्थान, ५) सूर्यनार कोविल नवग्रह स्थळ, ६) थिरुवप्पडी चंडिकेश्वर देवस्थान, ७) चिदंबरम नटराज देवस्थान, ८) सिरकाळी भैरव देवस्थान, ९) थिरुवरुर सोमस्कंद देवस्थान 

हे मंदिर पवित्रतीर्थ, पवित्रस्थळ आणि मूर्ती स्थळ (देव गौरव स्थळ) म्हणून पुजलं जातं. 

साजरे होणारे सण
१) गुरु भ्रमण 
२) चैत्र पौर्णिमा 
३) थाई पुसम (जानेवारी-फेब्रुवारी) 
४) पंगूणी उत्तरम् रथयात्रा (मार्च-एप्रिल) 
५) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा