Thursday, January 31, 2019

नवग्रह मंदिरे - शनि

शनि ग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: थिरुनल्लार शनी कोविल
स्थल देवता: श्री शनीश्वरन
देवीचे नांव: श्री भोगमार्ता पूनमुलैयाल   
ग्रहाचे नांव: शनि  
गावाचे स्थान: थिरुनल्लार, तामिळनाडू ६०९६०७, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  दर्भारण्येश्वरर (दर्भ + अरण्य + ईश्वर)

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

हे मंदिर कुंभकोणम - कारैकल मार्गावर आहे. नागपट्टीनं पासून २५ किमी वर आहे.

शनि ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार सृष्टी निर्माण केल्यावर, ब्रह्मा सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाला. जेव्हां तो दर्भाच्या अरण्यामध्ये आला तेव्हा त्या अरण्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला. आणि त्या अरण्यामध्ये त्याने तपश्चर्या केली आणि स्वयंभु शिवलिंगाची उपासना केली.

शिव ब्रह्माच्या उपासनेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्रह्माला सर्व शास्त्रांचं ज्ञान दिलं आणि वेदांचं मर्म सांगितलं. ब्रह्माने ह्या अरण्यामध्ये बराच काळ वास्तव्य केलं आणि शिवपार्वतीची उपासना केली आणि त्यांची मंदिरे पण बांधली.  ब्रह्माने ब्रह्मतीर्थ तर सरस्वतीने वाणीतीर्थ निर्माण केलं. ह्याच ठिकाणी इंद्र, अष्टदिक्पाल (आठ दिशांचे स्वामी) आणि पवित्र अशा हंसाने पण इथे त्यांची त्यांची शिवलिंगे स्थापन करून त्यांची तपश्चर्या केली.

ह्या ठिकाणाला विविध नावे आहेत. ती अशी. ब्रह्माने ह्या ठिकाणी तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाचे नाव आदिपुरी (आदि म्हणजे सुरुवात जिथून झाली) असे पण आहे. ह्या ठिकाणी पवित्र दर्भ भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ह्या ठिकाणाला दर्भारण्य असे पण नाव आहे. इथे नळ राजाने तपश्चर्या केली म्हणून ह्या ठिकाणाला नल्लार असे पण म्हणले जाते आणि म्हणूनंच इथल्या शंकराचे नाव नल्लेश्वर आहे.  

शनि ग्रहाचा इतिहास:

संचिका (उषा देवी) हि सूर्यदेवाची पत्नी. तिच्यापासून सूर्यदेवाला दोन पुत्र (वैवस्वत मनू आणि यम) आणि एक पुत्री (यमुना) झाली होती. संचिकादेवीला सूर्यदेवाची उष्णता सहन झाली नाही म्हणून तिने स्वतःच्या छायेतून छायादेवी निर्माण केली आणि तिला सूर्यदेवाबरोबर राहायला सांगून ती आपल्या पित्याकडे गेली. पण तिचा पिता ह्या कृत्यामुळे तिच्यावर रागावला आणि त्याने तिला परत सूर्यदेवाकडे पाठवले. पण पतीच्या भीतीपोटी संचीकादेवी उत्तरध्रुवावर गेली आणि तिथे घोडीच्या रूपात राहून तपश्चर्या करू लागली. इकडे छायादेवीपासून पण सूर्याला दोन पुत्र (सावर्णि मनू आणि शनी) आणि एक पुत्री (भद्रा) झाली.

छायादेवी आपल्या सावत्र पुत्राला म्हणजेच यमदेवाला खूप त्रास द्यायची. म्हणून यमदेवाने एकदा छायादेवीला लाथ मारली. छायादेवीने यमाला पंगू होण्याचा शाप दिला. जेंव्हा सूर्यदेवाला हे माहित झालं तेंव्हा त्याने यमाची पंगूतेतून सुटका केली. त्याचवेळी त्याला संचीकादेवी सोडून गेल्याची पण माहिती कळली. त्याने उत्तरध्रुवावर जाऊन संचीकादेवीला परत आणले. म्हणूनंच सूर्याला इथे उत्तरायण म्हणलं जातं. परत आल्यावर सूर्यदेव त्याच्या दोन्ही पत्नींसह राहू लागला.

छायादेवीच्या त्रासाने आतमध्ये धुमसत असलेल्या यमदेवाने तिच्या पुत्राला म्हणजेच शनीदेवाला लाथ मारली आणि त्यामुळे शनिदेव पंगू झाले. सूर्यदेवाने शनिदेवाला ग्रह होण्याचं वरदान दिलं. शनिदेव काशीस गेले आणि त्यांनी तेथे शक्ती संपादन करण्यासाठी  तपश्चर्या केली.

शनि ग्रहाचे महत्व:

शनिदेव हा मकर आणि कुंभ राशींचा स्वामी आहे. तूळ राशीसाठी तो उच्चेत आहे तर मेष राशीसाठी तो नीचेत आहे.

कुंडलीमध्ये शनिदेव हा आयुष्याच्या अवधी बद्दल निर्णय देतो. शनिदेवाचा प्रभाव पुढील गोष्टींवर पडतो - व्यवसाय, शीलभ्रष्टता आणि अपमान यांचे भय, निद्रानाश, जीवहत्या. पुढील अवयवांवर शनिदेव नियंत्रण ठेवतो - नाडी, त्वचा, केश, नखे, गुद (आतडे).

कुंडलीमधील ३, ७ आणि १०व्या घरांवर शनिदेवाची दृष्टी असते. शनिदेवाला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यास २ १/२ वर्ष लागतात. स्वराशीपासून १२व्या राशीमध्ये जेव्हा शनिदेव प्रवेश करतो तेव्हा त्या राशीच्या व्यक्तींची पुढची ७ १/२ (साडेसात) वर्ष ही अनिष्ट फळं देणारी असतात. ह्यालाच साडेसाती असे म्हणतात.

शनी महादशा ही १९ वर्ष चालते.

शनि ग्रहदोषांपासून निवृत्ती:

शनिदेव ग्रहादोषाच्या निवृत्तीसाठी ((विशेषतः साडेसाती चालू असताना) पुढील उपाय उपयोगी ठरतात
  1. श्री हनुमानाची उपासना
  2. श्री हनुमान स्तोत्राचे पठण
  3. शनिदेव स्तोत्राचे पठण
  4. प्रत्येक शनिवारी शनिमहात्म्य वाचणे
  5. प्रयेक शनिवारी उपवास करणे (उपवास करताना मीठ खाऊ नये)
  6. शनिदेवाच्या मंत्राचा जप
  7. पुढील गोष्टींचे दान करणे - काळे तीळ, काळे कपडे, लोखंडाचा खिळा, निळे फुल (गोकर्ण).
  8. मंदिरामध्ये काळ्या कापडाची वात आणि तिळाचे तेल वापरून दिवा प्रज्वलित करणे   

शनि ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
शनि ग्रह
पत्नी
निळादेवी
कपड्यांचा रंग
काळा / निळा    
लिंग
नपुंसक
पंच महाभूतातील घटक
वायू
देव
ब्रह्म  
वाहन
कावळा
अधि देवता
यम
धातू
लोखंड
रत्न (खडा)
नीलम
१०
अवयव
स्नायू
११
चव
तुरट
१२
धान्य
काळे तीळ
१३
ऋतू
सर्व ऋतू  
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पश्चिम
१५
पुष्प
शंख पुष्प   
१६
क्षेत्र वृक्ष
दर्भ  
१७
आठवड्यातला दिवस
शनिवार
१८
ध्वनी

शनि ग्रहाची रांगोळी:

शनिची पूजा करताना काढावयाची रांगोळी:



शनि ग्रहाचा श्लोक :

शनि ग्रह देवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् |
छायामार्तण्डसंभूतं तं नमामि शनैश्चरम् ||

Thursday, January 24, 2019

नवग्रह मंदिरे - शुक्र

शुक्र ग्रह मंदिराची माहिती:



मंदिराची माहिती:



मंदिराचे नांव: अरुलमीगु अग्निश्वरर् कोविल
स्थल देवता: श्री अग्निश्वरर्
देवीचे नांव: श्री कर्पगम् अम्बाळ  
ग्रहाचे नांव: शुक्र
गणपती: कर्पग विनायगर
गावाचे स्थान: आडुदुराई-कुट्रालम् मार्ग, कंजनूर, तामिळनाडू ६०९८०४, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  अरुलमीगु अग्निश्वरर् कोविल

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

कुंभकोणम - मयीलाडुदुराई मार्गावर असलेल्या आडुदुराई ह्या गावावरून ह्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आडुदुराई, कुंभकोणम आणि मयीलाडुदुराई पासून ह्या मंदिराकडे जाणाऱ्या बसेस आहेत. हे मंदिर सूर्यनार कोविल पासून ३ किमी, आडुदुराई पासून ५ किमी तर मयीलाडुदुराई पासून २० किमी वर आहे.


शुक्र ग्रह मंदिराचा इतिहास:

कंजनूर गावामध्ये वासुदेवर नावाचा एक वैष्णव होता. त्याला सुदर्शनर नावाचा पुत्र होता. सुदर्शनरला आपल्या कपाळावर विभूती, भगवान शंकराचं प्रतीक, लावण्याची तीव्र इच्छा होती. पण गावामधल्या कट्टर वैष्णवांनी त्याला नकार दिला. सुदर्शनर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान विष्णूंनीच सुदर्शनर म्हणून जन्म घेतला होता. त्या वैष्णवांना सत्याची जाणीव करून देण्यासाठी सुदर्शनर जळत्या बैठकीवर बसला. दक्षिणामूर्ती, म्हणजेच भगवान शिव, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सुदर्शनरवर कृपा केली. सुदर्शनर नंतर हरदत्त ह्या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याने शिवाची उपासना केली.  


इथल्या शिव आणि पार्वतीच्या मंदिरांबद्दल एक कथा आहे. ब्रह्मदेवाने शिव आणि पार्वतीदेवीचे नवीन लग्न झालेल्या वधू-वराच्या रूपामध्ये दर्शन घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव आणि पार्वतीने त्याला वधू-वराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणूनच इथे शिव मंदिर उजव्या बाजूला तर पार्वतीचे मंदिर डाव्या बाजूला आहे.


असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं.


असा समज आहे की चंद्र, पराशर मुनी आणि कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत.


ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव अग्निश्वरर् असे आहे), ३. पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ  

शुक्र ग्रहाचा इतिहास:

पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे.


शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली.


शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले.


शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति.


शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं.

शुक्र ग्रहाचे महत्व:

शुक्र हा शुभ ग्रह आहे. तो वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे. मीन राशीमध्ये तो उच्च स्थानी आहे तर कन्या राशीमध्ये नीच स्थानी. ऋग्वेदामध्ये शुक्राला वेण असे नाव आहे. शुक्राचा प्रभाव विवाह संबंधित गोष्टींवर असतो. शुक्राच्या कृपेमुळे नपुंसकत्वावर मात करता येते. शुक्राचा शुभ प्रभाव पुढील महिन्यांमध्ये अनुभवास येतो - नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, आणि तो जेव्हां वृषभ, तूळ आणि मीन राशींत असतो तेव्हां. शुक्र महादशा २० वर्षांची असते.

शुक्र ग्रहदोषांपासून निवृत्ती:

शुक्र ग्रहदोषांपांसून निवृत्तीचे काही उपाय - देवी उपासना (गजलक्ष्मी आणि/किंवा राजराजेश्वरी). देवीमहात्म्याचे पारायण. शुक्रवारी उपवास. श्वेत रंगाचे कपडे परिधान करणे आणि पूजेमध्ये श्वेत कमळ आणि श्वेत वस्त्र अर्पण करणे.  


शुक्र ग्रहाची वैशिष्ठ्ये:



#
वैशिष्ठ्य
शुक्र ग्रह
पत्नी
सुकीर्ती / उर्ज्जस्वती
कपड्यांचा रंग
श्वेत (पांढरा)   
लिंग
स्त्री
पंच महाभूतातील घटक
जल
देव
इंद्राणी
वाहन
अश्व / उंट / मगर
अधिदेवता
महालक्ष्मी
धातू
रूपे
रत्न (खडा)
हिरा
१०
अवयव
वीर्य
११
चव
आम्ल (आंबट)
१२
धान्य
पावटा
१३
ऋतू
वसंत
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पूर्व
१५
पुष्प
पांढरं कमळ  
१६
क्षेत्र वृक्ष
पळस  
१७
आठवड्यातला दिवस
शुक्रवार
१८
ध्वनी
नी

शुक्र ग्रहाची रांगोळी:



शुक्राची पूजा करताना काढावयाची रांगोळी:


शुक्र ग्रहाचा श्लोक :



शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा


ध्यान श्लोक:
हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् |
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ||