Thursday, June 20, 2019

श्री केदारनाथ

कैलास पर्वताच्या जवळ असणारे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडामध्ये आहे. चारधाम यात्रेपैकी एक असलेले हे ठिकाण हिमालयाने वेढलेले आहे. या स्थानाविषयी अनंत आख्यायिका परंपरेने आलेल्या आहेत. वर्षातील फक्त सहा महिने ही यात्रा लोक करू शकतात. शिवसाधकांनी (म्हणजेच ६३ नायन्मार) स्तोत्रे व मंत्र म्हणलेल्या २७५ स्थळांपैकी हे एक आहे.

श्री केदारनाथाच्या लिंगाची घडण व रचना कशी झाली ह्या विषयी अनेक कथा आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

एका कथेप्रमाणे श्री विष्णूंच्या नर व नारायण अवतारात श्री विष्णूंनी ध्यान करून घोर तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन विष्णूंना वर मागावयास सांगितले. नर आणि नारायण दोघांनी शंकराला विनंती केली की त्यांनी स्थायी स्वरूपाच्या ज्योतिर्लिंगात येथे रहावे म्हणजे जे कोणी लिंगाची भक्ती करतील त्यांची सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता होईल. हेच ते केदारनाथ ज्योतिर्लिंग.

दुसऱ्या एका कथेनुसार मानव जातीच्या कल्याणासाठी पांडवांनी शंकराचे ध्यान करून त्याला प्रसन्न करून घेतले. शंकर स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले. हेच ते केदारनाथ ज्योतिर्लिंग. काळ्या दगडाच्या पसरट स्वरूपात हे ज्योतिर्लिंग आहे.

आणखीन एका कथेप्रमाणे जेव्हा पांडव त्यांच्या अंतिम प्रवासासाठी निघाले होते तेव्हा त्यांना टाळण्यासाठी शिवाने बैलाचे किंवा जंगली डुकराचे रूप धारण केले. जेंव्हा पांडव केदारनाथ मंदिरात पोहोचले तेंव्हा भीमाने बैलाची शेपटी ओढायचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही पण बैलाला मात्र कुबड आले. असा समज आहे की बैल सरळ नेपाळला गेला व तेथे पशुपतिनाथाची स्थापना झाली. बैलाच्या पार्श्वभागावर शंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रगट झाले. शिवाने त्रिकोणी आकाराच्या ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात कायम वास्तव्य करण्याचे मान्य केले. ज्या पर्वत शिखरावरून पांडव स्वर्गात पोचले ते बद्रीनाथाजवळच आहे. असा समज आहे की भीमाची शंकराशी बैलाच्या रूपात असताना जी झटापट झाली त्यानंतर भीमाने शंकराला तुपाने मालिश केले. म्हणून त्रिकोणी ज्योतिर्लिंगाला तुपाने मालिश करण्याची प्रथा पडली आहे.

दुसऱ्या एका कथेनुसार नर आणि नारायण बद्री नावाच्या खेड्यात गेले. तेथे त्यांनी पार्थिव लिंगाची पूजा सुरु केली. तेव्हा शंकराने केदार येथे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात राहण्याचे मान्य केले. अशा प्रकारे त्या ज्योतिर्लिंगाला केदारेश्वर हे नाव प्राप्त झाले. केदारनाथाच्या मंदिरासभोवती अनेक पवित्र स्थळे आहेत. या पर्वत शिखरावरच आदी शंकाराचार्यांना मोक्ष प्राप्ती झाली.

३५८३ मीटर उंचीवर असलेले हे पवित्र स्थळ मंदाकिनी नदीकाठी हृषीकेश पासून २२३ किलोमीटर अंतरावर आहे. मंदाकिनी ही गंगेची उपनदी होय.

Thursday, June 13, 2019

श्री त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग होय. महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीकाठी त्र्यंबकेश्वर येथे हे स्थान वसले आहे. गोदावरी नदी गौतमी म्हणूनसुद्धा ओळखली जाते म्हणून काही ठिकाणी हे स्थान गौतमी काठी असल्याचा उल्लेख आहे. येथील शिवलिंगाचा आकार अद्वितीय असा आहे. त्याचे साधर्म्य उखळीच्या तळाच्या भागाशी असून मध्यभागी पोकळी सदृश्य भाग आहे. त्या खोलगट भागात अंगठ्याचा आकार असलेली तीन लिंगे असल्यामुळे ह्या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर असे म्हणतात. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रातून अव्याहत पाणी वाहत असते. ह्या शिवलिंगाच्या दर्शनाला हजारो लोक येतात कारण ह्या शिवलिंगाच्या कृपेने अध्यात्मिक समाधान मिळते व भौतिक इच्छा पण पूर्ण होतात. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. ह्या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक दंतकथा आहेत. त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत.



दक्षिण पर्वतावर गौतम ऋषी व त्यांची पत्नी अहिल्या तपश्चर्या करत होते. त्या काळात एका वर्षी कोरडा दुष्काळ पडला. सर्वत्र हाहाकार उडाला तेव्हा गौतम ऋषींनी वरुणाची कठोर साधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. गौतम ऋषींना वरुणाने वर दिला की त्यांच्या आश्रमात पाण्याचा अक्षय पुरवठा होईल व त्यामुळे मुबलक अन्नधान्य उपलब्ध होईल. ही आश्रमातील सर्व प्रकारची सुबत्ता इतर साधू व त्यांच्या पत्नींच्या मनात द्वेष निर्माण करण्यास कारणीभूत झाली. त्यांनी मायेने एक गाय निर्माण केली व तिने अन्नधान्याची नासधूस करायला सुरुवात केली. त्या गाईला हाकलण्यासाठी गौतम ऋषींनी एक छोटीशी फांदी तिच्या अंगावर टाकताच ती गाय मरण पावली. त्या साधूंनी गौतम ऋषींवर ब्रह्महत्येचा आरोप करून त्यांना ब्रह्मगिरी पर्वतावर एकांतवासात हद्दपार केले. गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर शंकराच्या पार्थिव लिंगाची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने त्यांना दोन वर दिले. एक म्हणजे गौतमीच्या रूपात तिथे प्रत्यक्ष गंगाच प्रकट होईल, तर दुसऱ्या वरानुसार त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग स्वरूपात शिव प्रगट होतील.  


दुसऱ्या एका आख्यायिके प्रमाणे पहिल्या लिंगाच्या प्रगटीकरणाच्या वेळी ब्रह्मदेवाने शंकराला शाप दिला की त्र्यंबकेश्वरचे लिंग जमिनीत ढकलले जाईल. म्हणूनच हे लिंग खळग्यामध्ये असून त्याचा आकार वरून अव्याहत वाहणाऱ्या पाण्यामुळे लहान आहे.


त्र्यंबकेश्वरला वराहतीर्थ नावाचे एक तीर्थ आहे. श्री विष्णूंच्या वराह अवतारामध्ये गौतमी नदीत त्यांनी स्नान केले होते तेच वराह तीर्थ. ब्रह्मगिरीपर्वतावरील ज्या झऱ्यापासून गोदावरी नदी उगम पावते त्याला गंगाद्वार असे म्हणतात. उगमानंतर गोदावरी जवळजवळ अदृश्य होऊन एकदम तहालहाटी येथे प्रकट होते. शंकराने दिलेल्या वरामुळे प्रकट झालेल्या गौतमीगंगेचा प्रवाह इतका जोरात होता की गौतम ऋषि त्यात स्नान करू शकले नाहीत. पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी गौतममुनींनी दर्भ फेकला. गंगा थांबलेल्या या स्थानाला कुशावर्त तीर्थ म्हणतात. परिक्रमेच्या मार्गावर रामतीर्थ, प्रयागतीर्थ, नरसिंहतीर्थ अशी अनेक तीर्थे आहेत.


पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ह्या जागी नारायण नागबळी केल्यास सर्प दोष नाहीसा होतो तर त्रिपिंडी श्राद्ध केल्यास पितृदोषाचे निराकारण होते.

Friday, June 7, 2019

श्री काशी विश्वनाथ अर्थात श्री काशी विश्वेश्वर

गंगा, वारणा आणि अस्सी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर उत्तर प्रदेशातील वाराणसीला हे पवित्र स्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी प्रत्यक्ष शंकरानेच वाराणसीची स्थापना केली असे समजतात. काशी विश्वनाथ याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काशी विश्वेश्वर हे एक पवित्र यात्रा केंद्र आहे. काशा नावाची जमात येथे वास्तव्य करून होती व त्यावरून या ठिकाणाला काशी हे नाव प्राप्त झाले.

पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की पुरुष आणि प्रकृती म्हणजे निसर्ग यांची नेमणूक भगवान शंकराने तप करून सृष्टीमध्ये सर्वोत्तम गोष्टींची निर्मिती विशिष्ट जागी करण्यासाठी केली. पुरुष आणि प्रकृती ही शिव आणि शक्तीची रूपे होत. निर्गुण शिवांनी पंचक्रोशी नावाचे शहर निर्माण केले. इथे श्री विष्णूंनी तपश्चर्या केल्याने पाण्याचे अनंत झरे निर्माण झाले. त्याचे अवलोकन करीत असता त्याच्या कानातील रत्नजडित खडा खाली पडला म्हणून ह्या जागेचे नाव मणिकर्णिका असे पडले. ह्या पंचक्रोशीतील सर्व पाणी शंकराने त्याच्या त्रिशुळामध्ये गोळा केले. त्यानंतर श्री विष्णूंच्या बेंबीतून आलेल्या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. शंकराने सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. पुराणांप्रमाणे या जगाची व्याप्ती पन्नास कोटी योजने असून येथे चौदा लोकांचा वास आहे. शंकराने कर्माने बांधले गेलेल्या लोकांचे जीवन वाचविण्यासाठी पंचक्रोशी शहराला संपूर्ण सृष्टीबाहेर ठेवले. या शहरात शिवाने मुक्तिदायक ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. त्यानंतर काशीला त्याच्या त्रिशूळावरून काढून ह्या मर्त्यलोकात शिवाने आणून ठेवले. म्हणून काशीला विमुक्त क्षेत्र म्हटले जाते. अविमुक्तेश्वर लिंग काशीला आहे. अनेक दंतकथानुसार काशीवर ब्रह्मा, विष्णु आणि महेश राज्य करतात. लोकांचा असा विश्वास आहे की काशीला वास्तव्य करणाऱ्यांना मुक्ती प्राप्त होते. दुसऱ्या एका दंतकथेप्रमाणे या शहराचे कालभैरव व दंडपाणी रक्षण करत असल्यामुळे प्रलयातसुद्धा या शहरांचा विनाश होणार नाही. गंगेच्या काठावर वैदिक काळापासून असलेले चौऱ्याऐंशी स्नानाचे घाट व अगणित तीर्थकुंड येथे आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे या स्थानाविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काशी शहराच्या एका स्थानी ब्रह्मदेवाने तपस्या केली. शंकराचे स्तुतीपर वेद म्हणत असता ब्रह्मदेवाने एक कडवे चुकीच्या पद्धतीने म्हणले. त्यामुळे रागावून शंकराने ब्रह्मदेवाचे एक डोके उडवले. ह्या शिखराला कायमस्वरूपी व शाश्वत अशी जागा मिळाली. त्यालाच ब्रह्मकुंड असे म्हणतात.

वाराणसी हे देवीचे एक शक्तीपीठ असून तेथे देवीच्या कानातील एक कर्णफुल पडले. त्या ठिकाणी देवी विशालाक्षी पाण्याचा झरा आहे. काशीमध्ये जेव्हा बराच काळ दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने सर्वांना अन्न पुरवले. अन्नपूर्णा देवीचे पूजन करण्याची पवित्र जागा सुद्धा येथेच आहे. शंकराने केलेल्या ब्रह्महत्येच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तो भिकारी झाला व म्हणून देवीने वाटलेल्या अन्नाचा लाभ त्याला पण मिळाला. त्याने केलेल्या ब्रह्महत्येमुळे शिवाच्या डाव्या हाताच्या तळव्याला ब्रह्मदेवाची कवटी चिकटून बसली. शंकराला देवीकडून भिक्षा मिळताच ती कवटी गळून पडली.

तिथे असलेला हरिश्चंद्र घाट म्हणजेच हरिश्चंद्राला ज्या स्मशानावर डोंबारी म्हणून नेमले होते ती जागा होय.

वाराणसीवर मोगलांनी अनेक हल्ले केले व त्यात विश्वेश्वराचे मंदिर सुद्धा उध्वस्त केले. त्याची पुनर्बांधणी मराठा व राजपूत युगात झाली.