Thursday, April 18, 2019

श्री वैद्यनाथ

श्री वैद्यनाथ ह्या ज्योतिर्लिंगाची तीन स्थाने आहेत व प्रत्येक स्थानाविषयी काहीना काही दंतकथा आहेत. महाराष्ट्रातील अंबेजोगाई जवळील परळी हे एक स्थळ तर झारखंडातील देवगढ हे दुसरे व हिमाचल प्रदेशातील वैजनाथ हे तिसरे स्थळ होय.

हिमाचल प्रदेशातील वैजनाथ हे शंकराचे एक अत्यंत पवित्र असे निवासस्थान समजले जाते. असुरांचा राजा रावण हा शिवाचा कट्टर उपासक होता व शंकराची तपस्या करत असता एका पाठोपाठ एक आपली दहाही शिरे कापून त्याने ती शंकराला बळी म्हणून अर्पण केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याच्या सर्व जखमा बऱ्या केल्या. यावेळी शंकराने वैद्याचे काम केले म्हणून हिमाचल प्रदेशात त्याला वैजनाथ अथवा वैद्यनाथ असे म्हणतात.

दुसरी आख्यायिका परळीच्या ज्योतिर्लिंगाविषयी आहे. अंबेजोगाई देवी योगेश्वरी म्हणजे पार्वती परळीच्या वैद्यनाथाशी विवाहबद्ध होणार होती. पण विवाहाला येणारी मंडळी अंबेजोगाईला उशिरा पोहोचल्यामुळे योगेश्वरी देवीने सर्वांचे रूपांतर दगडामध्ये केले. ह्याच जागेविषयी आणखी एक आख्यायिका समुद्र मंथनाशी जोडलेली आहे. त्या दंतकथेनुसार समुद्रमंथनानंतर भगवान विष्णूंनी धन्वंतरी व समुद्रमंथनातून बाहेर पडलेली इतर रत्ने एका शिवलिंगामध्ये लपवली. जेव्हा दानवांनी ती रत्ने हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून अतिप्रचंड महाकाय अशा ज्वाळा बाहेर आल्या व त्यामुळे असुरांना मागे हटावे लागले. हेच ते वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंग. अभिषेकाचे जे तीर्थ शिवलिंगातुन बाहेर येते त्यात रोग बरे करण्याचे गुण आहेत असे म्हणतात. जवळच वटेश्वर मंदिर आहे व त्या मंदिराजवळ जो वटवृक्ष आहे तिथेच सावित्रीने सत्यवानाला वाचविण्याचा प्रसंग घडला असे म्हणतात. जवळच असलेल्या तलावाला मार्कंडेय ऋषींचे नाव दिले आहे. याच जागेवर मार्कंडेय ऋषींना शंकराकडून अमरत्वाचा वर मिळाला.

देवगडची आख्यायिका वेगळी आहे. रावणाला अभ्यंगस्नान करावयाची इच्छा झाली पण जवळपास पाणीच नसल्याने त्याने जमिनीवर मुष्टिप्रहार केला व त्यामुळे शिवगंगा नावाचा तलाव प्रगट झाला. रावणाने तेथील शिवलिंगाचे पूजन करून स्वतःचे सर्व हात यज्ञात दिले. त्याने केलेल्या त्यागाने संतुष्ट होऊन शंकर अवतीर्ण झाले व त्याचे सर्व हात त्याला परत देऊन तो अजिंक्य राहील असा वर दिला. त्यामुळे या शिवलिंगाला वैद्यनाथ असे संबोधतात.

Thursday, April 11, 2019

श्री ओंकारेश्वर

मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या काठी ओंकारेश्वर हे पवित्र स्थान आहे. नर्मदा नदीमध्ये मंधाता म्हणजेच शिवपुरी नावाचे एक बेट आहे व त्याचा आकार ॐ असा आहे. या जागेविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यातील खाली उद्धृत केलेल्या तीन दंतकथा प्रमुख व महत्वाच्या मानल्या जातात.

विंध्य पर्वत जरी उंच असला तरी तो मेरू पर्वताएवढा उंच नव्हता व त्यामुळे विंध्यपर्वत मेरू पर्वताचा द्वेष करत असे. एकदा नारदमुनींनी यावरून विंध्य पर्वताला डिवचले. त्यावर चिडून जाऊन विंध्य पर्वताने पर्वत लिंगाची पूजा करून कठोर तपश्चर्या केली. विंध्याच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकराने विंध्य पर्वताची नर्मदेच्या काठावर शिवलिंग स्थापण्याची विनंती मान्य केली. समस्त देव व ऋषींच्या विनंतीवरून लिंगाचे दोन भाग करण्याचे सुद्धा मान्य केले. दोन भागांपैकी एकाला ओंकारेश्वर व दुसऱ्या भागाला ममलेश्वर अथवा अमरेश्वर असे म्हणतात. अशा प्रकारे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आले तसेच शंकराने विंध्य पर्वताला हवे तेवढे वाढण्याचा वर सुद्धा दिला. फक्त अट एवढीच होती की भक्तांच्या वाटेत त्याने अडथळा होऊ नये. शंकराच्या वराने शेफारून जाऊन विंध्यपर्वत एवढा वाढला की त्याने सूर्य व चंद्राला सुद्धा अडवले. या संकटातून मुक्त होण्यासाठी देवी भगवतीने अगस्त्य मुनी व त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांना पाठवले. अगस्त्य मुनींनी विंध्य पर्वताची समजूत घातली व त्याच्याकडून वचन घेतले की ते स्वतः दक्षिणेतून परत येत नाहीत तोपर्यंत विंध्य पर्वताने वाढू नये. अगस्त्य व त्यांची पत्नी श्रीशैलम् ला राहिले व परत कधी आलेच नाहीत. अर्थातच पर्वताचे वाढणे तिथेच थांबले. श्रीशैलम् ला दक्षिण काशी समजले जाते.

दुसरी कथा इक्ष्वाकु वंशातील जन्मलेल्या मंधाता राजा विषयी आहे. प्रभू श्रीराम सुद्धा इक्ष्वाकु कुळातीलच होते हे सर्वज्ञात आहेच. राजा मंधाताने ह्याच जागी ज्योतिर्लिंगाच्या रूपात शिव प्रगट होई पर्यंत घोर तपश्चर्या केली. असे म्हणतात की राजाच्या मुलांनीसुद्धा खूप उग्र आणि खडतर तपश्चर्या केली व शंकर त्यांच्यावरसुद्धा प्रसन्न झाले आणि म्हणूनच या पर्वत शिखराला मंधाता पर्वत अथवा मंधाता शिखर असे नाव पडले.

तिसरी कथा अशी आहे की देव आणि असुर यांच्या युद्धात असुरांचा विजय झाला. तेव्हा देवांनी शंकराची उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले. शंकर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले व त्यांनी असुरांचा पराभव केला.