Friday, May 31, 2019

श्री नागेश्वर

पुराणांत नागेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी तीन निरनिराळ्या आख्यायिका सांगितल्या आहेत. त्याचे प्रकटीकरण नक्की कुठे झाले याविषयी मतभेद आहेत. त्या सर्व दंतकथांचा खाली उल्लेख केला आहे.

पहिल्या विचारधारेप्रमाणे महाराष्ट्रातील प्रभाषा क्षेत्रातील औंध येथे असलेला नागनाथ म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग. दुसऱ्या विचारसरणीनुसार उत्तराखंडातील अलमोरा येथील जागेश्वर म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग तर तिसऱ्या दंतकथेनुसार गुजरातमधील द्वारकेला असलेले ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वर होय.

क्षेत्र पुराणांमध्ये औंधच्या नागेश्वर लिंगाची कथा कथन केली आहे. त्यानुसार वनवासात असताना पांडव औंधला आले. ते जेव्हा औंधच्या जंगलात आले तेव्हा भीमाने एक विस्मयकारक गोष्ट पाहिली. नदीकाठी पाणी प्यायला गेलेल्या गाईंच्या आचळातून आपोआप दूध येत होते. त्याच जागेवर भीमाने काही वेळ गदा प्रहार केल्यावर तेथे असलेल्या अति तेजस्वी शिवलिंगातून रक्त वाहू लागले. अशा प्रकारे औंधच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा शोध लागला.

औंधच्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी आणखी एक दंतकथा आहे. संत नामदेव जेव्हा मंदिरात भजन म्हणत होते तेव्हा तेथील ब्राह्मण पुजाऱ्यांनी नामदेवांना तिथून जाण्यास सांगितले कारण त्यांना वाटले की संत नामदेव त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये अडथळा आणत आहेत. म्हणून नामदेव व त्यांचे शिष्य देवळाच्या मागच्या बाजूला जाऊन भजन म्हणत बसले व त्यामुळे अख्खे मंदिरच उलटे फिरले. ह्या चमत्काराचा पुरावा म्हणजे ह्या मंदिरात नंदी हा देवळाच्या मागच्या बाजूला आहे.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार द्वारकेला असलेले नागेश्वर लिंग हेच ज्योतिर्लिंग आहे. दारुका आणि दारुकीने उग्र तपश्चर्या करून पार्वतीकडून असा वर प्राप्त करून घेतला की ते जेथे जेथे प्रवास करतील तेथे तेथे जंगल सुद्धा त्यांच्याबरोबर प्रवास करेल. हे दानव यतीच्या यज्ञामध्ये व तपश्चर्येत विघ्न आणत. यतीनी घाबरून जाऊन और्य मुनींच्याकडे आसरा घेतला. मुनींनी असुरांना शाप दिला की त्यांचा पृथ्वीवर सर्वनाश होईल. तेव्हा असुरांनी संपूर्ण जंगलच समुद्रामध्ये नेऊन ठेवले. त्यानंतर त्यांनी समुद्रमार्गे उद्योगधंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास द्यायला आरंभ केला. व्यापाऱ्यांना समुद्रातील बेटांवर बंदी ठेवले. सुप्रिया नावाच्या यतीने तो बंदी असताना शिवाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. शिवाने सर्व दानवांचा नाश केला. पार्वतीने मात्र दारुकाला असा वर दिला की सांप्रत कालखंड जेव्हा संपेल तेव्हा फक्त असुरच ह्या बेटावर उत्पन्न होतील व स्वतः पार्वती त्यांच्यावर राज्य करेल. शिवपार्वतीने त्यानंतर त्या बेटावरच वास्तव्य केले. शंकराने नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले तर पार्वती नागेश्वरी बनून दोघेही समुद्रकिनारी राहिले.

बाळ जागेश्वर म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग उत्तराखंडातील अलमोरा मध्ये असलेल्या दारुकावन येथे असून त्याची कथा अशी आहे की बाळ खिल्ल्यासनी म्हणजे बुटक्या महर्षींनी केलेल्या तपावर प्रसन्न होऊन शंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात येथे प्रगट झाले. येथे मुख्यत्वे महामृत्युंजय जप पठण केला जातो. ह्या जपाने ज्याचे डोळे म्हणजे सूर्य, चंद्र व अग्नि आहेत त्या महादेवाची करुणा भाकली जाते. भिती, रोगराई व दारिद्र्यापासून संरक्षण करण्यास तसेच ऐश्वर्य व दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप केला जातो.

Friday, May 17, 2019

श्री रामेश्वर

रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाड जिल्ह्यामध्ये आहे. हे दक्षिण भारताचे टोक आहे. असे समजले जाते की गंगा नदीतील पाणी घेऊन रामेश्वरला अभिषेक केल्याशिवाय चार धाम यात्रा पूर्ण होत नाही आणि तसेच रामेश्वराहून थोडीशी वाळू घेऊन तिचे विसर्जन गंगेमध्ये करणे हा सुद्धा चार धाम यात्रेचा भाग आहे.

स्कंदपुराण व शिवपुराणात रामेश्वरचा उल्लेख महत्वाची पवित्र जागा असा केला आहे. रावणाचा पराभव केल्यावर श्रीरामाने शंकराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास तसेच त्याला वंदन करण्यास म्हणून शिवलिंगाची स्थापना करण्याचे ठरविले. रामाने हनुमानाला वाराणसीला जाऊन काशी विश्वेश्वराची प्रार्थना करून त्याची हुबेहूब प्रतिकृती आणावयास सांगितले. हनुमान मुहूर्तापर्यंत परत येऊ न शकल्याने सीतेने रामेश्वरातील समुद्रकाठी असलेल्या वाळूचे शिवलिंग तयार केले. वेदमंत्रांच्या घोषात, अभिषेक करून विधिपूर्वक सीतेने तयार केलेल्या लिंगाची प्रतिष्ठापना झाली. काशीहून परतल्यावर हे शिवलिंग पाहून हनुमान क्रोधाविष्ट झाला. त्याचा राग पाहून प्रभू श्रीराम हनुमानाला म्हणाले की सीतेने स्थापन केलेले लिंग तिथून काढून हनुमानाने आणलेले लिंग त्याच जागी स्थापित करावयास काही हरकत नाही. हनुमानाने त्याची सर्व शक्ती पणाला लावून सीतेने बसवलेले लिंग समूळ उखडण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही. लवकरच सीतेने निर्माण केलेल्या लिंगाचे महत्व हनुमानाच्या ध्यानात आले. पण श्रीरामाने आज्ञा केली की हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना सीतेने स्थापन केलेल्या शिवलिंगाशेजारी करावी. अर्थातच श्रीरामाची आज्ञा पाळली गेली व म्हणूनच रामेश्वरला दोन लिंगे पहायला मिळतात. हनुमानाने आणलेल्या लिंगाला विश्वलिंग तर सीतानिर्मित लिंगाला रामलिंग असे संबोधले जाते. रामाने सांगितल्याप्रमाणे प्रथम दर्शन विश्वलिंगाचे होऊन मगच रामलिंगाचे दर्शन घ्यावयाचे असते. ही प्रथा आजतागायत चालू आहे.

दुसरी आख्यायिका अशी आहे की सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र रामेश्वरला पोहोचले. ते पाण्याचा घोट घेणार तोच त्यांना आठवले की त्यांची शंकराची पूजा राहिली आहे. शंकराची पूजा करण्याआधी प्रभू रामचंद्र पाणीसुद्धा पीत नसत. त्यांनी शिवाची प्रार्थना करताच साक्षात शिव त्यांच्यासमोर अवतीर्ण झाले. रामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकर रामेश्वरलिंग म्हणून तिथेच राहिले.

रामेश्वर देवळाच्या प्रदक्षिणा मार्गात पवित्र पाण्याचे चोवीस झरे आहेत. त्यांना रामतीर्थ किंवा रामकुंड असे म्हणतात. त्यांची नावे सीतातीर्थ, कपितीर्थ, ब्रह्मकुंड वगैरे आहेत. ही  कुंडे म्हणजे चोवीस विहिरी आहेत व अशी प्रथा आहे की ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाण्याआधी भक्तांनी सर्व कुंडांवर स्नान करून मगच दर्शनाला जावे. देवस्थानाने प्रत्येक कुंडावर सेवकांची नेमणूक केली असून ते बादलीभर पाणी भक्तांच्या डोक्यावर ओततात. इथे हे नमूद करावेसे वाटते की पाणी थंड असते व सर्वजण शेवटपर्यंत पाणी घेऊ शकतील हे खात्रीने सांगता येत नाही. पण जे शेवटपर्यंत जातात त्यांना अनपेक्षित वाटणारी घटना म्हणजे शेवटची तीन कुंडे गरम पाण्याची आहेत.

असा समज आहे की रामेश्वराच्या काठी पितृधर्म केल्यास पितरांना त्यांच्या कर्मापासून मुक्ती मिळून मोक्ष मिळायला सहाय्य होते.

Thursday, May 9, 2019

श्री भीमाशंकर

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एक होय. हे स्थान सह्याद्री पर्वतावर महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे १२५ किलोमीटरवर आहे.

शिवपुराणातील कथेनुसार त्रिपुरा या असुराने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्याच्या उपासनेने सर्व देव भयभीत झाले. कारण त्याला इच्छित वर मिळाल्यास तो अतिशक्तिमान होणार हे उघड होते. ते सर्व देवेंद्राकडे गेले व त्रिपुराची उपासना थांबविण्याची त्याला विनंती केली. पण देवेंद्र काही करू शकण्याआधीच त्रिपुराने लोभ, मत्सर, हेवा, लालसा, वासना वगैरेंवर विजय मिळवला होता. म्हणून सर्व देव व इंद्र ब्रह्मदेवाकडे मदत मागण्यास गेले. ब्रह्मदेवानी देवांना मदत करण्याचे वचन देऊन तो स्वतः त्रिपुराकडे त्याच्या उपासना करण्याच्या ठिकाणी गेला. पण ब्रह्मदेव त्रिपुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाला आणि त्याने त्रिपुराला आशीर्वाद देऊन त्याला हवे असलेले खालील तीन वर दिले:

१. देव, असुर व यक्ष त्याला मारू शकणार नाहीत
२. सर्व जगामध्ये म्हणजेच तिन्ही लोकात तो पाणी आणि हवेमध्ये संचार करू शकेल,
३. इंद्र आणि अमरावतीसह संपूर्ण विश्वाला तो पादाक्रांत करू शकेल

ह्या तीन वरांखेरीज ब्रह्मदेवाने त्याला स्वतःहून आणखी एक वर दिला. त्यानुसार जर एखाद्याने एकाच बाणाने त्रिपुराच्या तीन पुरांना छेद दिला तरच त्याला मृत्यू येईल. त्रिपुराला वर प्राप्त झाल्याबरोबर तो एवढा माजला की सरसकट सर्वांना त्रास द्यायला त्याने सुरुवात केली. यज्ञामध्ये विघ्न आणणे, ब्राह्मणांचा अपमान करणे वगैरे उद्योग चालू केले. त्रिपुराचा वध करण्यासाठी शंकराची मदत घेण्याच्या इच्छेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी ऋषी, देवगण व इंद्र या सर्वांनी शंकराची भक्ती चालू केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने इंद्राला सांगितले की जर त्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या ज्योतिर्लिंगासमोर शिवाची तपश्चर्या केली तर त्रिपुराला मारावयास तो मदत करेल. इंद्र आणि देवांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केल्यावर शंकराने सात दिवसांच्या आत त्रिपुराला मारण्याचे वचन दिले. शंकराने त्यानंतर नंदीवर आरूढ झालेल्या महाकाय मनुष्याचे रूप धारण केले. त्यावेळी त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू असून त्याच्या अवतीभवती देवगण, डाकिनी व शाकिनी आदि योगिनी पण होत्या. तेव्हा शंकर भीमासारखा (पाच पांडवांपैकी) दिसत होता, म्हणून त्याला भीमाशंकर हे नाव पडले.

त्रिपुराचा वध केल्यावर देवांच्या व ऋषींच्या विनंतीवरून शंकराने तिथेच वास्तव्य केले आणि तेव्हापासून तो भीमाशंकर याच नावाने ओळखला जातो.

भीमाशंकराचे मंदिर प्राचीन असून कित्येक शतकांपूर्वी बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवळाची देखभाल व पूजाअर्चेसाठी देणगी दिली होती असे म्हणतात. तसेच पेशव्यांचे सचिव नाना फडणवीस यांनी कळसाची पूनर्बांधणी केली असेही म्हणतात.

भीमा नदीचा उगम येथेच आहे. आख्यायिका अशी आहे की त्रिपुरा व भीमाशंकराच्या घनघोर युद्धात शंकराला घाम आला व त्यापासून भीमा नदी उत्पन्न झाली.

इथे पार्वतीचे पण मंदिरआहे व ती कमळजा या नावाने प्रसिद्ध आहे. पार्वतीने इथे एका असुराचा वध केला. तेव्हा देवांनी व ऋषींनी तिची कमळाने पूजा केली म्हणून ती कमळजा या नावाने येथे पुजली जाते.

भीमाशंकर मंदिराच्या पाठीमागे मोक्षकुंड तीर्थ नावाचे कुंड आहे. त्याच्याशी कौशिक मुनींचे नाव जोडले गेले आहे कारण त्यांनी येथे शिवाची आराधना केली. त्याच्याखेरीज तिथे सर्व तीर्थ व कुषारण्य तीर्थ या नावाची दोन तीर्थे असून ज्ञानकुंड नावाचे कुंड आहे.

भीमाशंकर येथील शंकराची आराधना करण्यास महाशिवरात्र व श्रावणी सोमवार हे दिवस विशेष महत्वाचे मानले जातात.