Friday, May 26, 2017

Ballaleshwar - fifth incarnation of Lord Vinayaka

अवतार पांचवा - बल्लाळेश्वर (तसेच मयुरेश्वर) - अध्याय १३ ते १६

यात शंखासूर दैत्य व कमलासूर दैत्य यांनी वेदादि ग्रंथ नष्ट करून विद्येचा लोप केला. त्यावेळी विनायकाने दशभुज रूप धारण करून कमलासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. मयुरेश्वर क्षेत्राची स्थापना केली (मोरगाव).

दिव्य भीमकाय शरीर, दहा बाहु, भयानक रूप, पाश, अंकुश, परशु, कमळ, चक्र ही आयुधे उजव्या हातात, तर गदा, खङग, त्रिशूल, तोमर, डमरू ही आयुधे डाव्या हातात असे त्याचे स्वरूप आहे.

एकदा ब्रह्मदेव तपश्चर्येत मग्न असतांना शंखासूर दैत्य अचानक तेथे आला व त्याचे वेद, शास्त्रे, पुराण ग्रंथ त्याने चोरून नेले व सागरात ठेवले. ध्यान संपल्यावर ब्रह्मदेवांना जेव्हां हे समजले तेव्हा त्यांना फार दुःख झाले. हे शंखासुराचे कृत्य आहे हे त्यांना कळले. ते चिंतेत पडले. वेदशास्त्र पठण व ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे बंद झाली. ब्रह्मदेव क्षीरसागरी विष्णूंकडे गेले. तेथे श्री विष्णूंना योगनिद्रेत पाहून ते ही समस्या घेऊन कैलास पर्वतावर गेले. तेथे श्रीशंकरांना साष्टांग नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला. श्री शंकर म्हणाले "योगनिद्रेतून बाहेर आल्यावर श्री विष्णू शंखासुराला मारतील व कमलासूराला मारण्यासाठी विनायक अवतार घेतील."

श्री ब्रह्मदेव स्वस्थानी परत गेले व ओंकाराचा एकाक्षरी मंत्र जपून त्यांनी विनायकास प्रसन्न करून घेतले. विनायकाने चारी वेद शास्त्रे पुराणे चोरणाऱ्या शंखासुराचे कृत्य मला कळले असून, त्याच्या बंधूचा कमलासूराचा मी वध करीन असे आश्वासन ब्रह्मदेवांना दिले. तसेच सर्व वेदादि ग्रंथ मी परत आणीन, ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे पूर्ववत सुरु होतील असे पाहीन व या करीता मी जो अवतार तो घेईन तो "मयुरेश्वर" या नावाने प्रसिद्ध होईल. असे बोलून विनायक अंतर्धान पावला.

पुढे विनायकाने स्वतःच्या मायेने पुन्हा वेदशास्त्रे पुराणे यांची निर्मिती केली. स्नान, संध्या, जप, हवन, स्वाध्याय, देवतार्चन, वैश्वदेव, अतिथीपूजन ही अष्टकर्मे लोप पावल्याने ब्राह्मण, ऋषी चिंतीत झाले होते. तोच त्यांच्या समोर विनायक ब्राह्मण रूपाने अत्यंत तेजस्वी रूप घेऊन उभा राहिला. त्याने त्यांची शास्त्रे पुराणे वेदादि ग्रंथ त्यांना परत केले व ब्राह्मणांना त्यांची नैमित्तिक कर्मे परत सुरु करण्यास सांगितले. ऋषी ब्राह्मणांस अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या बल्लाळास आसनावर बसवून त्याचे पूजन स्तवन केले. पृथ्वीवर परत सर्व कर्मे यथासांग सुरु झाली.

दूतांकरवी हे वर्तमान कमलासूराला काळातच तो क्रोधीत झाला व शंखासुराच्या आज्ञेने प्रचंड सैन्यासह घोड्यावर बसून बल्लाळास (ब्राह्मणास) मारण्यासाठी निघाला. हे वृत्त ऐकताच ऋषी मुनी संतत्प झाले व त्यांनी बल्लाळास हे वृत्त कळवले. बल्लाळाने त्यांना शांत केले व स्वतःच प्रचंड सैन्य निर्माण केले व स्वतः दहा बाहुंचे भीमकाय शरीर प्रकट केले. दहा हातात दहा आयुधे होती. बल्लाळास व त्याच्या सेनेस बघून कमलासूर सेना भयकंपित झाली पण कमलासूराने त्यांना धीर दिला. घनघोर युद्ध झाले. कमलासूराने सर्पास्त्र सोडून सर्व बल्लालसैन्यामध्ये हा:हा:कार माजवला. कित्येक जण विषाग्निने मेले. उरले ते भीतीने पळू लागले. स्वतःच्या सैन्याची अशी दशा बघून बल्लाळाने रागाने स्वतःच्या बाणाने एक चक्र सोडले. त्यातून असंख्य चक्रे निर्माण झाली व त्याचे दैत्यसैन्य कुणाचे शीर, कुणाचे हातपाय तुटून बरेच जण धारातीर्थी पडले. ते पाहून कमलासूराने गदायुद्धाचे आव्हान बल्लाळास दिले. परंतु कमलासुराचे देवापुढे काही चालेना. शेवटी त्याने रणातून पलायन केले. बल्लाळ आश्रमात परत आला. स्वतःचे इतके सैन्य रणांत पडलेले पाहून प्रथम त्यास फार वाईट वाटले, पण ऋषींच्या प्रार्थनेनुसार त्याने संजीवनी मंत्र जपून पुन्हा आपल्या सैन्यास नवनवीन दिले. ऋषींनी बल्लाळास हवन करण्यास सांगितले. यज्ञाची सांगता होताच त्यातून मयूर उत्पन्न झाला. त्या मयूरावर विनायक आरूढ होऊन कमलासूराचा वध करण्यासाठी निघाला. मयूरावर बसला म्हणून त्याला "मयुरेश्वर" नाव पडले. 

मयुरेश्वर-विनायक सिद्धी बुद्धीसहित रणांगणावर निघाला. बुद्धीने स्वतः कमलासूराला माशीसारखा मारीन, मला आज्ञा द्या अशी विनायकास प्रार्थना केली. विनायकाने आनंदाने ते मान्य केले.  बुद्धी भयंकर देह धारण करून व मायेने प्रचंड सैन्य निर्माण करून ती रणांगणावर पोहोचली. पण कमलासूर व त्याच्या सैन्यापुढे तिचा टिकाव लागेना. तिने पुन्हा सैन्य निर्माण केले. पण तेही पराजित होऊ लागले. शेवटी बुद्धीने "लाभ" नामक मानसपुत्र निर्माण केला. तो धनुर्विद्या निपुण होता. बुद्धीला विचारून ऋषींच्या आश्रमात जाऊन मयूरावर आरूढ झालेल्या आपल्या पित्याचे विनायकाचे दर्शन घेऊन तो युद्धास निघाला. 

तो कोवळा कुमार पाहून कमलासूर प्रथम उपहासाने हसला व त्याला स्वगृही परत जाण्यास, पण तोपर्यंत लाभाने कमलासुराचे असंख्य सैनिक मारले. कमलासूराने मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून लाभाच्या सैन्याला मोहनिद्रेत नेले. एकटा लाभ व विनायक सोडून सर्व सैन्य मोहनिद्रेत गेले. विनायकानेही लाभाची परीक्षा घेण्यासाठी मोहनिद्रेत गेल्याचे नाटक केले. लाभ शोकाकुल झाला. पण त्याला हे संकट दूर करण्याची युक्ती आठवली. त्याने मोहिनीअस्त्राचा संहार करणारा मंत्र जपून मोहनिद्रेत गेलेल्या सैन्यास उठवले. पण विनायक काही उठला नाही. ते पाहून लाभ अत्यंत दुःखी झाला व त्याने आत्मदहन करण्याचे ठरवले. त्याने सैनिकांकडून लगेच काष्ठे जाणवली व त्यास अग्नी लावून चितेत उडी मारणार तोच विनायकाने आपले नाटक संपवून लाभास आवरले. लाभाला अत्यंत आनंद झाला. नंतर विनायक मयूरावर बसून प्रचंड सैन्यासह परत कमलासुरावर चाल करून गेला. 

विनायकाने विशाल रूप धारण केले. त्याचे मस्तक आकाशापर्यंत उंच पोहोचले. ते पाहून कमलासूराने त्याची निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. तेव्हा क्रोधीत होऊन विनायक म्हणाला "एका नेत्रकटाक्षात पूर्ण त्रैलोक्याचा मी संहार करीन. तुझ्यासारखे दैत्य मरण्यासाठीच माझा अवतार झाला आहे." दोघांत घनघोर युद्ध झाले. कमलासूर देवासमोर उभा न राहता सैन्यात शिरला व बाणाने अनेक शूरवीर मारले. ते पाहून लाभ धावून आला व कमलासुरावर मुष्टिप्रहार केला. कमलासूराने आकाशात उड्डाण केले व शुक्राचार्यांनी दिलेला मंत्र जपून योगसामर्थ्याने आकाशातच राहिला. तेथून त्याने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. विनायकाने पाश टाकून कमलासूरास आपल्यासमोर आणले. दैत्याने केलेल्या गदेचा प्रहार मोडून काढत त्याने कमलासुरावर अमोघ शास्त्रे सोडली व त्यास मारले. पण जेथे जेथे कमलासुराचे रक्त सांडे तेथे तेथे परत प्रति कमलासूर उत्पन्न होई. ते पाहून देवाच्या साहाय्यासाठी सिद्धी बुद्धी त्वरित धावून आल्या. त्यांनी आपल्या सामर्थ्याने दहा हजार किरात निर्माण केले व शत्रुसैन्यावर सोडले. शत्रुसैन्यात हा:हा:कार माजला. ते सैरावरा पळू लागले. सिद्धीबुद्धीने नवकोटी भूतगण निर्माण केले व दैत्यसैन्यास भक्षिण्यास सांगितले. भूतगण दैत्यसैन्यास भक्षू लागले. त्यांनी  प्रति कमलासुरांचेही भक्षण करण्यास सुरुवात केली. रणांगण पूर्ण रिकामे झाले. कमलासूराचा रक्तबिंदू पडतांना दिसताच तो जमिनीवर पडण्याआधीच भूतगणाने वरच्यावर चारण्यास सुरुवात केली. शेवटी एकटा कमलासूर रणांगणात उरला. तरीही त्याने धीर सोडला नाही. दोघांत घनघोर युद्ध झाले. सरतेशेवटी विनायकाने त्रिशुळाने आघात करून कमलासुराच्या देहाचे तीन तुकडे केले. जेथे कमलासुराचे शीर पडले तेथे विनायकाने आपले क्षेत्र निर्माण केले. 

कमलासूराचा वध झालेला पाहून सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवादिकांनी विनायकाची पूजा केली. पूजा करीत असताना नकळत ब्रह्मदेवाचा कमंडलू कलंडला व तेथे नदी निर्माण झाली. तिला कमंडलू तीर्थ म्हणतात. 

ते स्थान त्या दिवसापासून "मोरगाव" क्षेत्र म्हणून विख्यात झाले व विनायक मयुरेश्वर नांवाने प्रसिद्ध झाला. 

No comments:

Post a Comment