Sunday, May 25, 2025

थिरुनल्लूर येथील श्री पंचवर्णेश्वरर मंदिर

हे मंदिर थिरुनल्लूर संबंधित सप्तस्थान शिव मंदिरातील पहिलं मंदिर आहे. हे मंदिर कुंभकोणम-पापनाशम-तंजावूर मार्गावर कुंभकोणमपासून १५ किलोमीटर्स वर तर पापनाशम पासून ३ किलोमीटर्स वर आहे. शैव संतांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. अप्पर आणि संबंधर ह्या शैव संतांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर वसलं आहे. चोळा साम्राज्याच्या कोचेंगट ह्या राजाने बांधलेल्या ७० माड कोविल स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. ह्या मंदिराला दक्षिण कैलास असं मानलं जातं. ह्या मंदिराचे वर्तमान बांधकाम १५०० वर्षे जुनं आहे. ह्या मंदिरात बरेच शिलालेख आहेत ज्यांमध्ये विविध चोळा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचा तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. 

मूलवर: श्री कल्याण सुंदरेश्वरर, श्री सुंदरनायकर, श्री पंचवर्णेश्वरर, श्री पंचवटेश्वरर
देवी: श्री कल्याणसुंदरी, श्री त्रिपुरसुंदरी, श्री गिरीसुंदरी, श्री पर्वताम्मन
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: सप्तसागरम, कावेरी नदी
पुराणिक नाव: थिरुनल्लूर

क्षेत्र पुराण:

१. वायुदेव आणि आदिशेष ह्यांच्या द्वंद्वामध्ये वायुदेवाच्या तीव्र जोरा मुळे आदिशेष मेरू पर्वताला धरून ठेवू शकले नाहीत. त्यामुळे मेरू पर्वताची दोन छोटी शिखरे तुटून पृथ्वीवर नल्लुर आणि अवूर ह्या जागांवर पडली. असा समज आहे की ह्या जागी शिव लिंगे निर्माण झाली.

२. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या विवाहामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जण कैलासावर जमा झाले. पण त्यामुळे पृथ्वी थोडी कलंडली म्हणजेच उत्तरेकडचा भाग थोडा खाली आला तर दक्षिणेकडचा भाग जरा वरती गेला. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी ज्ञानाचे जोरकस वजन असलेल्या अगस्त्य ऋषींना भगवान शिवांनी दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. अगस्त्य ऋषींचे मन विवाह सोहळा सोडून जाण्यास कचरत होते म्हणून भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना विवाह सोहळ्याचे दर्शन ते दक्षिणेत जिथे जातील तिथे देण्याचे वचन दिले. अगस्त्य ऋषी दक्षिणेतील नल्लूर ह्या गावी आपल्या बरोबर शिव लिंग घेऊन आले आणि त्यांनी त्या लिंगाची पूजा करण्यास सुरुवात केली. हे लिंग आपल्या मुख्य लिंगाच्या दक्षिण दिशेला बघायला मिळतं. श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना इथे वधू-वराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्याचबरोबर श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंनी पण अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं. गाभाऱ्याच्या भिंतींवर कोरलेल्या चित्रांमध्ये ह्या घटना चित्रित केल्या आहेत.

३. कुंतीदेवी: पुराणांनुसार कुंतीदेवींकडून विवाहाच्या आधी पुत्रप्राप्ती झाल्याने पाप घडलं होतं. त्या पुत्राला त्यांनी एका पेटीमध्ये ठेऊन ती पेटी पाण्यामध्ये वाहून जाऊ दिली. पुढे ती पेटी कौरवांच्या राज्यातील एका रथसारथीच्या हाती लागली आणि त्याच्या पत्नीने त्या मुलाचे संगोपन केले. ह्या पापाचे क्षालन करण्यासाठी कुंतीदेवी नारद मुनींकडे गेल्या. नारद मुनींनी त्यांना मासी महिन्यातल्या माघ नक्षत्र दिवशी सप्त समुद्रांमध्ये स्नान घेण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी त्यांनी कुंतीदेवींना ह्या ठिकाणी भेट देण्यास सांगितलं. कुंतीदेवी इथे आल्या आणि त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिवांनी सर्व सप्त समुद्रांना इथल्या मंदिरातल्या तलावात येण्याची आज्ञा केली जेणेकरून कुंतीदेवी त्यात स्नान करू शकतील. म्हणून इथल्या तीर्थाचे (तलावाचे) नाव सप्तसागर असे आहे. कुंतीदेवींनी इथे स्नान केल्यावर त्यांची पापापासून मुक्ती झाली. इथल्या एका उठावदार चित्रामध्ये ही घटना चित्रित केली आहे. 

४. एका आधीच्या लेखामध्ये उल्लेखिलेल्या प्रमाणे भृंगी ऋषींनी श्री पार्वती देवींना प्रदक्षिणा घालण्यास नकार दिला. ते मधमाशी बनले आणि त्यांनी फक्त भगवान शिवांनाच प्रदक्षिणा घातली. श्री पार्वती देवींनी भृंगी ऋषींना शाप दिला. भृंगी ऋषींनी भगवान शिवांची तपश्चर्या करून त्या शापापासून मुक्ती मिळवली. त्यांनी मधमाशी बनून भगवान शिवांना प्रदक्षिणा घातली हे इथल्या शिव लिंगावरील असलेल्या छिद्रांमुळे दर्शवतं. 

५. असा समज आहे कि मुचुकुंद राजा श्री इंद्रांनी दिलेल्या श्री त्यागराजांच्या सात मूर्ती घेऊन आपल्या राज्याला चालले होते त्यावेळी त्यांनी ह्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम केला होता. आणि मुक्कामाच्या काळात त्यांनी इथे भगवान शिवांची उपासना केली. 

६. अमरनिथीनायनार: स्थळ पुराणांनुसार अमरनिथीनायनार ह्यांनी आपलं सर्व आयुष्य शिव भक्तांना अंतर्वस्त्र पुरविण्यात घालवलं. त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांनी आपला एक कपडा अमरनिथीनायनार ह्यांच्याकडे सुपूर्त केला. आपल्या लीलेने भगवान शिवांनी अमरनिथीनायनारकडे सुपूर्त केला कपडा गायब केला आणि त्यांनी अमरनिथीनायनारकडे त्या कपड्याच्या बदल्यात तेवढ्याच किमतीच्या सोन्याची मागणी केली. अमरनिथीनायनार तराजूच्या दुसऱ्या बाजूला आपली सर्व मिळकत ठेवली. तरीपण तराजू समतोल होईना तेव्हा अमरनिथीनायनार स्वतः आपल्या पत्नीसमवेत तराजूमध्ये बसले. भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी अमरनिथीनायनार ह्यांना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं वरदान दिलं. 

७. शैव संत अप्पर ह्यांना थिरुवडी (पवित्र पादुका) दीक्षा: शैव संत अप्पर ह्यांना आपलं आयुष्य भगवान शिवांच्या चरणी प्रदान करायची इच्छा होती. त्यांनी आपली यात्रा थिरुवथीगै इथून चालू केली. त्यांनी चिदंबरम, सिरकाळी आणि थिरुविदाईमरुथुर येथे भगवान शिवांचे दर्शन घेतले. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना थिरुनल्लूर येथे येण्याची आज्ञा केली. जेव्हा अप्पर ह्या मंदिरात आले तेव्हा भगवान शिवांनी अप्पर ह्यांच्या शिरावर आपली पदकमळे ठेवून त्यांना थिरुवडी दीक्षा दिली. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ इथे येणाऱ्या भक्तांच्या शिरावर शतारी ठेवली जाते (जशी भगवान विष्णूंच्या मंदिरात ठेवतात तशी). हे थिरुनल्लूर ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. अप्पर ह्यांनी काही दिवस इथे वास्तव्य केलं आणि मग त्यांनी थिरूपळैथूरै, थिरुक्कारुकूड, थिरुअवूर आणि थिरुपळणं ह्या ठिकाणी भेट दिली. शेवटी ते थिरुवारुर येथे वस्ती करून राहिले. अप्पर ह्यांनी त्यांच्या स्तोत्रांमधे थिरुनल्लूर ह्या ठिकाणाची तेनकैलास (तेन म्हणजे दक्षिण) अशी स्तुती केली.      

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

अगस्त्य ऋषी, भृंगी ऋषी, काकभुजंदर ऋषी, कुंतीदेवी, मुचुकुंद चक्रवर्ती, शैव संत संबंधर, अप्पर, माणिकवाचगर, रामलिंग अडिगलर, सेक्कीळर, नाम्बी, नाम्बियंदर, नाम्बी नाम्बियंदर

वैशिष्ट्ये:

१. गाभाऱ्यात शिव लिंगाच्या मागे श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांचे वधू-वर मुद्रेत त्यांच्या समवेत श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू असलेले शिल्प हे इथले वैशिष्ट्य आहे.

२. बलीपीठाच्या जवळ असलेले श्री गणनाथांचे (गणपती) देवालय हे वैशिष्ट्य आहे. अशी रचना फक्त वाराणसी आणि ह्या मंदिरात आहे.

३. इथल्या शिव लिंगाचा रंग प्रत्येक २ तास २४ मिनिटांनी बदलतो. सकाळी ६ ते ८.२४ तांब्याचा रंग, ८.२५ ते १०.४८ लाल, १०.४९ ते १.१२ सुवर्ण, १.१३ ते ३.३६ हिरवा पाचु, ३.३७ ते ६ विविध रंग

४. इथे श्री उच्चीष्ट गणपती त्यांच्या पत्नींसमवेत आहेत.

५. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांच्या स्तुतीपर स्तोत्रे रचली आहेत.

६. इथे क्षेत्र वृक्ष हे खूप खूप जुने आहे. त्याचे नाव आधीमारम असे आहे. असा समज आहे की हे पृथ्वीवरील पहिले वृक्ष आहे. 

७. परिक्रमेमधले भगवान शिवांचे शिल्प खूप सुंदर आहे.

८. एक जुनी म्हण ह्या क्षेत्राचे महत्व दर्शवते. त्या म्हणीत असे म्हणले आहे की नेल्लुर मध्ये माघ नक्षत्रावर साजरा होणार उत्सव आणि कुंभकोणम येथे साजरा होणारा महामाघम उत्सव हे खूप पवित्र आहेत.

९. इथे २३ शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, होयसाला आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांचा तसेच मंदिरासाठी केलेल्या कामांचा उल्लेख आहे.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचे राजगोपुर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. मंदिरातील देवालये कृत्रिम टेकडीवर उभारली आहेत. येथील शिव लिंग स्वयंभू आहे आणि त्याचा रंग दिवसातून ५ वेळा बदलतो (प्रत्येक २ तास २४ मिनिटांनी). ह्या मंदिराचे स्थळ पुराण हे अगस्त्य मुनी आणि अमरनिथीनायनार ह्यांच्याशी निगडित आहे. इथे एका चौकोनी पायावर (अवूदयार) दोन शिव लिंगे आहेत. त्यातील एक स्वयंभू लिंग आहे आणि एक अगस्त्य मुनींनी स्थापित केलेले आहे. असा समज आहे की मंदिराचा मागील भाग हा भगवान शिवांच्या जटा आहेत. म्हणून ह्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परवानगी नाही. ह्या शिव लिंगाला बरीच छिद्रे आहेत जी हि घटना दर्शवतात कि भृंगी ऋषींनी फक्त भगवान शिवांना प्रदक्षिणा घालण्यासाठी मधमाशीचे रूप घेतले. असा समज आहे की वाल्किल्य ऋषींनी ह्या छिद्रांमध्ये मधमाशीच्या रूपात तपश्चर्या करून मुक्ती मिळविली. 

कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री नर्तनविनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, श्री विष्णुदूर्गा आणि श्री चंडिकेश्वरर (त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी). गाभाऱ्याच्या आतल्या पश्चिमेकडील भिंतीवर श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांचे वधू-वर रूपात शिल्प कोरले आहे. तर उत्तरेकडील भिंतीवर भगवान विष्णू आणि दक्षिणेकडील भिंतीवर श्री ब्रह्मदेव ह्यांची शिल्पे कोरली आहेत. 

पहिल्या परिक्रमेमध्ये श्री गिरीसुंदरी देवींचे (श्री कल्याणसुंदरी) देवालय आहे. श्री नटराजांची कास्याची मूर्ती आहे. श्री गणेश, अगस्त्य ऋषी, तीन शैव संत आणि श्री सोमस्कंदर ह्यांच्या मूर्ती आणि शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मंदिराचे तीर्थ आहे. श्री त्रिपुरसुंदरी स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री नटराज (ज्यांना श्री चतुरतांडवनाथर असे नाव आहे), श्री काशीविश्वनाथर, अगस्त्य ऋषी आणि श्री गणेश ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री कल्याणसुंदरर आणि त्यांच्या पत्नीचे चित्र शिव लिंगाच्या मागे आहे. 

परिक्रमेमधील इतर मूर्ती आणि देवालये: श्री काशी विनायकर, श्री कैलास गणपती, श्री उच्चीष्ठ गणपती, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, आठ शिव लिंगे, सप्तमातृका, ६३ नायनमार, श्री मुचुकुंद लिंग, संगुकर्ण लिंग, सुमती लिंग, वरुण लिंग, विष्णू लिंग, ब्रह्म लिंग, श्री गजलक्ष्मी देवी, श्री कैलासनाथर, श्री भैरवर, श्री शनीश्वरर, श्री सूर्य, श्री चंद्र, बाणलिंग, श्री महालक्ष्मी देवी, श्री ज्वरहरेश्वरर आणि श्री ज्वरहरेश्वरी, श्री इंद्र आणि श्री अग्नी ह्यांनी पुजलेली लिंगे. 

तिसरी परिक्रमा जी खालच्या स्तरावर आहे, त्यामध्ये श्री अष्टभुजा काली ह्यांचे देवालय आहे.

मंदिराचे महत्व:

हे मंदिर मघा नक्षत्रासाठी आहे. भाविक जन इथे पापविमोचनासाठी प्रार्थना करतात. इथल्या सप्तसागर तीर्थामध्ये स्नान करणे हे कुंभकोणममधल्या महामाघम तीर्थामध्ये स्नान करण्याएवढे पवित्र समजले जाते.

पूजा:

१. दररोज सहा पूजा केल्या जातात - १) उषःकाल पूजा सकाळी ५.३० वाजता, २) कालसंधी पूजा सकाळी ८ वाजता, ३) उच्चीकाल पूजा सकाळी १० वाजता, ४) सायंरक्षा पूजा संध्याकाळी ५ वाजता, ५) इरंडकाल पूजा संध्याकाळी ७ वाजता, ६) अर्धजाम पूजा रात्री ८ वाजता

२. प्रत्येक आठवड्यात सोमवारी आणि शुक्रवारी पूजा केल्या जातात

३. पाक्षिक पूजा, प्रदोष पूजा तसेच प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला पूजा केल्या जातात आणि मासिक पूजा केल्या जातात. 

४. ह्याशिवाय प्रत्येक वर्षी इथे गुरु पूजा केली जाते आणि प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्च च्या दरम्यान महामाघम उत्सव साजरा होतो. ह्यावेळी श्री सोमस्कंदर ह्यांच्या मूर्तीची मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. 

५. गर्भवती स्त्रिया प्रसूती सुरळीत व्हावी म्हणून देवी आणि कालीच्या मंदिरामध्ये बांगड्यांचा उत्सव साजरा करतात.

६. भाविक जन आपल्या बालकांचे पहिले केशवपन ह्या मंदिरात करतात. 

मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:

आनी (जून-जुलै): आनी थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायकर चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई, कार्थिगई दीपम
मारगळी (डिकंबर-जानेवारी): थिरुवथीरै, अरुद्रदर्शन
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुसम नक्षत्र
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं

मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता: श्री कल्याणसुंदरेश्वरर मंदिर, ऍट पोस्ट थिरुनल्लूर, श्री सुंदरपेरूमल कोविल तर्फे, थिरूवारुर जिल्हा, तामिळ नाडू ६१४२०८

दूरध्वनी: +९१-०४३७४-३१२८५७

पुजाऱ्याचा मोबाईल क्रमांक: ९४४३६६८३०६, ९४८८११०६९७

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


  

     


No comments:

Post a Comment