हे पाडळ पेथ्र स्थळ तामिळनाडू राज्यातल्या तंजावूर जिल्ह्यामध्ये पापनाशम ह्या गावामध्ये आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. कुंभकोणम-तंजावूर मार्गावर कुंभकोणम पासून १५ किलोमीटर्स वर आहे. हे मंदिर थिरुनल्लूर सप्त स्थानांमधलं पण एक आहे. कावेरी, कुडूमुरूट्टी आणि थिरुमलैरायन ह्या नद्यांच्या संगमावर हे मंदिर आहे. हे मंदिर जवळ जवळ तीन युगं जुनं असावं असा समज आहे. साधारण ३ एकराचे आवार असलेल्या ह्या मंदिराचे वर्तमान बांधकाम हे १२०० वर्षे जुनं आहे. विजयनगर आणि पांड्या साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे.
मूलवर: श्री पालईवननाथर
देवी: श्री थवलं वेन्नयैयन
पवित्र तीर्थ: वसिष्ठ तीर्थ, इंद्र तीर्थ, यम तीर्थ, कावेरी नदी
पवित्र वृक्ष: ताड (पाल्म), पालई (सध्या हे वृक्ष अस्तित्वात नाही). ह्या स्थळाचं थिरुप्पालईथुरै हे नाव इथे पूर्वी भरपूर प्रमाणात असणाऱ्या पालई वृक्षांमुळे प्रसिद्ध झालं. कुडूमुरूट्टी नदीच्या काठावर हे मंदिर आहे.
पुराणिक नाव: ब्रह्म वनम, पालई वनम, आरस वृक्ष (पीपल), पुन्नाग वनम
क्षेत्र पूराण:
१. दारुकवनामध्ये वास्तव्य करणाऱ्या ऋषींना अहंकारी भावना निर्माण झाली. त्यांना वाटायला लागलं की त्यांना प्राप्त झालेले आध्यात्मिक ज्ञान आणि सिद्धी हे त्यांचा आणि जनांचा उद्धार करण्यासाठी पुरेसे आहे. त्यांना असं वाटायला लागलं की प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मानुसार बरे वाईट भोग भोगत असल्याने देवाची गरज नाही. त्यांच्या पत्नींना पण असं वाटायला लागलं की त्या सर्व स्त्रियांपेक्षा, म्हणजे अगदी देवांच्या पत्नी तसेच स्वर्गातल्या अप्सरा, ह्यांच्यापेक्षाही सुंदर आहेत. ऋषींना आणि त्यांच्या पत्नींना शिक्षण देण्यासाठी म्हणून भगवान शिव भिक्षाटनरच्या (अंगावर कपडे नसलेला भिक्षुक) तर भगवान विष्णू भिक्षाटनरच्या पत्नी मोहिनी म्हणजेच एका सुंदर स्त्रीच्या रूपात इथे प्रकट झाले. भिक्षाटनरला पाहून ऋषींच्या स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित झाल्या आणि त्यांचं त्यांच्या कामामधलं लक्ष विचलित झालं तसेच मोहिनीला पाहून त्यांना आपल्या अति सुंदर असण्याच्या भावनेची लाज वाटली. भिक्षाटनर आणि मोहिनीच्या पाठीमागे येत येत भिक्षाटनर, मोहिनी आणि ऋषींच्या पत्नी ऋषी जिथे यज्ञ करीत होते तेथे आले. मोहिनीला बघून ऋषिपण तिच्याकडे आकर्षित झाले. पण त्याचवेळी आपल्या पत्नींचं त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे हे पाहून ते क्रोधीत पण झाले. त्यांनी भिक्षाटनरचा नाश करण्यासाठी अनेक मायावी प्रयत्न केले. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीने वाघासारखे हिंस्त्र प्राणी आणि वाईट शक्ती निर्माण करून त्यांना भिक्षाटनरवर धाडले. भिक्षाटनर रूपातल्या भगवान शिवांनी आपल्यावर धाडलेल्या सर्व हिंस्त्र प्राणी आणि शक्तींचा विनाश केला. आणि त्यांनी मारलेल्या वाघाचे कातडे परिधान केले. ही घटना ह्या स्थळी घडली असा समज आहे.
२. प्रभू श्रीरामचंद्रांनी इथून जवळ असलेल्या श्री रामलिंगस्वामी मंदिरात १०८ शिवलिंगांची स्थापना केली. तसेच त्यांनी ह्या मंदिरात पण भगवान शिवांची उपासना केली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री रामलिंग असे पण नाव आहे. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी इथल्या शमीच्या (वन्नी) झाडाखाली आपलं धनुष्य आणि बाण ठेवले आणि भगवान शिवांना युद्धात विजय मिळण्यासाठी प्रार्थना केली.
३. इथल्या पीपल झाडाखाली (तामिळ मध्ये आरसु) वसिष्ठ ऋषींनी तपश्चर्या केली. ह्यासाठी त्यांनी शिव लिंगाची स्थापना केली. तसेच त्यांनी वसिष्ठ तीर्थ निर्माण केले. विश्वकर्मांनी तयार केलेली श्री अंबिका ह्यांची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती त्यांनी शिव लिंगाच्या दक्षिणेला स्थापन केली. तपश्चर्येच्या अंती भगवान शिवांनी तेथे प्रकट होऊन वसिष्ठ ऋषींना दर्शन दिले. वसिष्ठ ऋषींनी ही तपश्चर्या त्यांना ब्रह्मऋषींचे पद प्राप्त होण्यासाठी केली.
४. मलैध्वजम ह्या पांड्या राजाने काल ऋषींचा अपमान केला. काल ऋषींनी राजाला शाप देऊन त्याचे अस्वलामध्ये रूपांतर केले. ह्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी अगस्त्य ऋषींनी राजाला इथे भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. राजाने अगस्त्य मुनींच्या सल्ल्यानुसार भगवान शिवांची उपासना करून शापातून मुक्ती मिळवली.
५. पांडव जेव्हां वनवासात होते त्यावेळी अर्जुन ह्या ठिकाणी आला आणि त्याने भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्याला धनुर्विद्येतील विविध तंत्रे शिकविली. असा समज आहे कि त्यानंतर अर्जुन पाताळ लोकांत गेला आणि तिथे त्याने उल्लूपी ह्या अप्सरेबरोबर विवाह केला.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
धौम्य ऋषी, वसिष्ठ ऋषी, भगवान महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, प्रभू श्रीराम, श्री सीतादेवी, पांडव, अष्टदिक्पाल आणि मलैध्वजम राजा.
वैशिष्ट्ये:
१. थिरुनल्लूरच्या भोवतीच्या सप्त स्थांनांमधलं हे एक स्थान आहे.
२. श्री पार्वती देवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्याबाजूला आहे. हि दोन्ही देवालये पूर्वाभिमुख आहेत. म्हणून ही रचना भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या वर-वधू रूप दर्शवते.
३. सहसा १० कडव्यांच्या स्तोत्रा ऐवजी इथे शैव संत अप्पर ह्यांनी ११ कडव्यांचे स्तोत्र रचले आहे.
४. इथल्या राजगोपुरावर स्टुक्कोची चित्रे नाहीत.
५. भगवान नटराजांनी येथे ऊर्ध्व तांडव नृत्य केले.
६. मंदिराच्या प्रवेशाजवळ धान्याचे कोठार आहे. असा समज आहे की हे कोठार ७०० वर्षे जुनं आहे.
मंदिराबद्दल माहिती:
इथल्या ११ शिलालेखांमध्ये चोळा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांची वर्णने आहेत. इथे एक भव्य धान्याचे कोठार आहे. हे कोठार शंकूच्या आकाराचे असून ते विटांचे बनवले आहे आणि साधारण ७०० वर्षे जुने आहे. रघुनाथ नायक ह्या राजाने हे बांधले.
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्यामंदिराला पांच स्तरांचे राजगोपुर आहे आणि २ परिक्रमा आहेत. इथे ध्वजस्तंभ नाही. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री नर्तन विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री ऊर्ध्वतांडव मूर्ती, श्री भिक्षाटनर, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्मदेव आणि श्री चंडिकेश्वरर.
भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची स्वतंत्र पूर्वाभिमुख देवालये आहेत. श्री पार्वती देवींचे देवालय भगवान शिवांच्या उजव्याबाजूला आहे. ही रचना वर-वधू मुद्रा दर्शवते.
मंदिरातील इतर देवालये आणि मूर्ती:
श्री विनायकर, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, भगवान विष्णू, श्री सोमस्कंद, श्री नटराज, ६३ नायनमार, श्री कालभैरवांच्या दोन मूर्ती, श्री शनीश्वरर, श्री महालक्ष्मी देवी, श्री सूर्य, श्री चंद्र, नवग्रह, वसिष्ठ ऋषींनी उपासलेली शिव लिंगे, प्रभू श्रीराम, मलैध्वजम राजा आणि अर्जुन ह्या मूर्ती परिक्रमेमध्ये आहेत.
बाहेरील परिक्रमेमध्ये उजव्या बाजूला श्री पार्वती देवींचे अजून एक पूर्वाभिमुख देवालय आहे.
परिक्रमेच्या उजव्या बाजूला बरीच चित्रे आहेत. श्री शनीश्वरांचे देवालय श्री महालक्ष्मींकडे मुख करून आहे.
हे स्थळ अशा ८ स्थळांपैकी आहे जिथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवी वर-वधूच्या रूपात आहेत. बाकीच्या स्थळांची नावे अशी आहेत - थिरुविडाईमरुथुर, कंजनूर, मानथुरै, थिरुअंबरअमक्कलं, थिरुछोत्रूथुरै, थिरुवळंचुळी आणि थिरुकरवीरं.
प्रार्थना:
भाविक जन इथे अपत्यप्राप्ती, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि बुद्धी तल्लख होण्यासाठी अभिषेक करून भगवान शिवांची पूजा करतात तसेच नवीन वस्त्रे दान देतात.
पूजा:
नियमित दैनंदिन पूजा तसेच प्रदोष पूजा आणि दर सोमवारी पण पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): चैत्रपौर्णिमा
आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक आणि स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम (पुष्य नक्षत्र), मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०
पत्ता: श्री पालईवननाथर मंदिर, थिरुप्पालईथुरै, ऍट पोस्ट पापनाशम, तालुका पापनाशम, तामिळ नाडू ६१४२०५
दूरध्वनी: +९१-९४४३५२४४१०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment