Thursday, September 29, 2022

स्तोत्र श्रवण-पठण - सुरक्षा आणि उद्धाराचा सुलभ उपाय

 देवांच्या कार्यासाठी जाण । जगदंबा होतसे उत्पन्न । एरव्हीं तरी जन्म-मरण । नाही नाही तियेसी ।।
इच्छामात्रें सर्व संहारीत । परी गुणानुवाद व्हावा निश्चित ।
आपुला या सर्व जगतांत । म्हणोनि उत्पन्न होतसे ।।
गुणांचे जें श्रवण-पठण । तेणें उद्धरती सर्व जन । म्हणोनि होतसे उत्पन्न । योगनिद्रा हरीची ।।

- श्री देवी माहात्म्य अध्याय १ 

"स्तुवन्ति त्रायते इति स्तोत्रः" अशी स्तोत्राची व्याख्या आहे. ज्या स्तुतीमुळे आपलं रक्षण होतं, उद्धार होतो, त्याला स्तोत्र म्हणतात. श्री देवीला एरव्ही जन्म-मरण नाही. पण आपल्या परम कारुण्य भावनेनी ती जनांच्या उद्धारासाठी दैवी अवतार घेते आणि तिच्या दैवीलीला बघून जनं तिची स्तुती करतात आणि ह्या स्तुतीमुळे जनांचा उद्धार होतो, रक्षण होतं. म्हणूनच अशा स्तुतीला स्तोत्र म्हणलं जातं.  

श्री देवीमाहात्म्याला श्री देवीचं महास्तोत्र असं पण म्हणतात. स्तोत्रामध्ये गुणानुवाद असतो. स्तोत्रामध्ये किंवा शेवटी फलश्रुती असते ज्यामध्ये स्तोत्र श्रवण-पठणाने काय फळं मिळतात त्याचं वर्णन असतं. 

स्तोत्र श्रवण-पठणाची काही महत्वाची फळं म्हणजे वाणीशुद्धी, मनाची एकाग्रता, आत्मविश्वासाची वृद्धी. आणि ह्या फळांच्या प्राप्तीमुळेच नियमित स्तोत्र श्रवण-पठण करणाऱ्यांचं आपोआपच रक्षण होतं आणि उद्धार होतो. स्तोत्र श्रवण-पठणासाठी सर्वात महत्वाचं काय तर शुद्ध भाव. स्तोत्र पठणासाठी खूप वेळेची पण गरज नाही. इच्छा आणि भाव असेल तर कुठल्याही दैनंदिन कर्तव्यामध्ये बाधा न आणता आपण हे करू शकतो. किंबहुना असंच करायला पाहिजे तरच आपण आपल्या जिवलगांना, आपल्या मुलांना पण आपण ह्या श्रवण-पठणामध्ये प्रोत्साहित करू शकू आणि त्यांना पण ह्या श्रवण-पठणामुळे मिळणाऱ्या रक्षणाचा अनुभव करून देऊ शकू. 

No comments:

Post a Comment