Friday, March 29, 2019

श्री महाकाळेश्वर

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असणारे महाकाळेश्वर हे एक स्वयंभू लिंग आहे. ह्या मंदिराचा उल्लेख जरी इसवीसनानंतर पाचव्या शतकात सापडतो तरी मंदिर कधी बांधले गेले याचा अंदाज करणे कठीण आहे. महाकाळेश्वराची मूर्ती दक्षिणमुखी म्हणजेच दक्षिणेकडे तोंड असणारी आहे. भगवान शंकर व माता पार्वती यांच्यामध्ये झालेल्या पवित्र संवादाला शिवनेत्र असे नाव आहे. शिवनेत्र परंपरेला अनुसरून मूर्ती दक्षिणमुखी आहे. या ठिकाणाला शक्तीपीठ म्हणून पुजले जाते. उज्जैनचे पूर्वीचे नाव अवंती होते व त्याविषयीचा उल्लेख पुराणांमध्ये ठिकठिकाणी सापडतो. कवी कालिदासाच्या प्रसिद्ध काव्यरचना त्याने येथेच केल्या आहेत. १२३४-१२३५ नंतर हे मंदिर पुन्हा बांधले गेले कारण आधीची वास्तू मोगलांनी उध्वस्त केली होती. सध्या असलेले मंदिर ग्वालियरच्या मराठा राजांनी चांगल्या अवस्थेत राखले आहे.

या मंदिराशी अनेक आख्यायिका व दंतकथा जोडल्या गेल्या आहेत. पुराणात सांगितल्याप्रमाणे उज्जैनचा राजा चंद्रसेन हा शिवाचा निःसीम भक्त होता. त्याची भक्ती पाहून श्रीखर नावाचा मुलगा शिवभक्तीला अत्यंत आकर्षित झाला. जेव्हा त्याने राजाच्या महालात प्रवेश करावयाचा प्रयत्न केला तेव्हा सुरक्षारक्षकाने त्याला शहराबाहेर क्षिप्रा नदीच्या काठी घालवून दिले. पुढे ज्यावेळी राज्यावर आक्रमण झाले त्यावेळी श्रीखर व विधी नावाच्या पुजाऱ्याने क्षिप्रा नदीच्या काठी शंकराचा धावा केला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर महाकाळाच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांनी शत्रूचा बिमोड केला. भगवान शिव स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. मात्र हे लिंग तांत्रिक तत्वानुसार सांभाळले जाते. आजपर्यंत रोज पहाटे येथे भस्माभिषेक नेमाने केला जातो. भस्म, म्हणजेच अभिषेकाला लागणारी पवित्र राख, त्या दिवशी चितेमध्ये दहन केलेल्या पहिल्या देहाची असून तिला क्षिप्रा नदीच्या पवित्र जलाने व मंत्रांनी शुद्ध केले जाते व मगच त्याचा वापर अभिषेकाला होतो.

भर्तृहरी गुंफा नावाच्या गुहा पण येथेच आहेत. मुनी भर्तृहरी हे राजा विक्रमादित्याचे सावत्र बंधू होते व असे म्हणतात की राजा विक्रमादित्याने संसाराचा त्याग केल्यावर याच ठिकाणी ध्यान केले होते.

महाकाळेश्वराच्या या मंदिराजवळच काळभैरवाची मूर्ती आहे. ही मूर्ती कोणत्याही झिंग आणणाऱ्या म्हणजेच उन्माद निर्माण करणाऱ्या पेयाचाच नैवेद्य म्हणून स्वीकार करते. अर्धे पेय नैवेद्य म्हणून देणाऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून परत मिळते तर उरलेले अर्धे पेय आपल्या डोळ्यादेखत नाहीसे होते.

उज्जैन हे सात* मुक्तीस्थळांपैकी एक आहे.

*सात मुक्तीस्थळे: अयोध्या, मथुरा, हरिद्वार, वाराणसी, कांची, उज्जैन आणि द्वारका.  

No comments:

Post a Comment