हे शिव मंदिर पंचक्रोशी स्थळांमधलं एक स्थळ आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर कुंभकोणम-मयीलादुथुराई मार्गावर कुंभकोणमपासून ८ किलोमीटर्स वर असलेल्या थिरुविडाईमरुथुर ह्या गावात वसलेलं आहे. शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. म्हणून हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. इथे १४९ शिलालेख आहेत ज्यांमध्ये चोळा, होयसाला, पल्लव आणि पांड्या राजांचे उल्लेख आहेत. चोळा साम्राज्याच्या काळात ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि विजयनगर साम्राज्यात ह्याचा विस्तार झाला.
कावेरी नदीच्या काठावरील काशी क्षेत्राशी तुल्यबळ मानल्या जाणाऱ्या सहा क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. हे शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ मानलं जातं तसंच हे पंचलिंग स्थळांपैकी पण एक स्थळ मानलं जातं. ह्याशिवाय थिरुनीलकुडीच्या भोवताली असलेल्या सप्त स्थानांपैकी पण हे एक स्थान आहे. पांड्या, चोळा आणि तंजावूर च्या नायक साम्राज्यातल्या राजांनी ह्या मंदिराच्या देखभालीमध्ये तसेच जीर्णोद्धार कार्यांमध्ये लक्षणीय हातभार लावला. भौगोलिक रित्या मुख्य बिंदूंवर असलेल्या सात शिव मंदिरांपैकी हे मंदिर मध्यवर्ती बिंदूवर आहे. ह्या मंदिरातील विग्रहांना (मूर्तींना) सप्त विग्रह असं म्हणतात. हे मंदिर अशा दोन शिव मंदिरांच्या मध्ये आहे ज्या मंदिरांचे क्षेत्र वृक्ष मरुथ (अर्जुन) आहे म्हणून ह्या स्थळाला ईडाईमरुथुर असं पण म्हणतात.
मूलवर: श्री महालिंगम, श्री महालिंगेश्वरर, श्री मरुतवनर, श्री मरुतवनेश्वरर
देवी: श्री परुमुरैअल, श्री बृहद्सुंदररगुजांबिका, श्री नानमुलैनायकी
पवित्र तीर्थ: कारुण्यामृत, कावेरी नदी
क्षेत्र वृक्ष: मरुत वृक्ष (अर्जुन वृक्ष)
पुराणिक नाव: मथिरार्जुनं, शेनबागारण्य, शक्तिपूरं, तपोवनं, मुक्तीपूरं
क्षेत्र पुराण:
१. पट्टीनाथर आणि भद्रगिरियार: शैव संत पट्टीनाथर ह्यांचं ह्या मंदिराशी घट्ट नातं आहे. त्यांचा शिष्य भद्रगिरियार हा राजा होता. त्याने आपल्या राज्याचा त्याग करून तो संत झाला. येथे येऊन तो आपल्या गुरूंबरोबर म्हणजेच पट्टीनाथर ह्यांच्याबरोबर राहू लागला. त्याच्या हातामध्ये नेहमी भिक्षापात्र असायचे आणि एक श्वान नेहमी त्याच्या बरोबर असायचा. एकदा भगवान शिव भिक्षुक रूपात आले आणि त्यांनी पट्टीनाथर ह्यांच्याकडे भिक्षा मागितली. पट्टीनाथर ह्यांनी भद्रगिरियारला संसारी असे संबोधून त्या भिक्षुकाला भद्रगिरियारकडे पाठवलं. आपल्यापाशी भिक्षापात्र आणि श्वान असल्यामुळे आपल्या गुरूंनी आपल्या संसारी असं संबोधलं ह्याचं भद्रगिरियारला फार वाईट वाटलं. त्या रागाच्या भरात त्याने ते भिक्षापात्र त्या श्वानावर फेकलं ज्यामुळे तो श्वान मृत्युमुखी पडला. भिक्षुकाच्या रुपातले भगवान शिव आपल्या मूळ रूपात आले आणि त्यांनी भद्रगिरियारला तसेच त्या श्वानाला पण मुक्ती प्रदान केली. म्हणून ह्या स्थळाला नलादीयार कोविल असं संबोधलं जातं.
२. ब्रह्महत्या दोष: एका चोळा राजकुमाराकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली. ज्यामुळे त्या राजकुमारावर ब्रह्महत्येचा दोष लागला. तो राजकुमार ह्या मंदिरात आला आणि त्याने भगवान शिवांकडे ब्रह्महत्या दोषातून मुक्तीसाठी प्रार्थना केली. हत्या घडलेल्या ब्राह्मणाचा आत्मा राजकुमाराच्या मागावर होता म्हणून भगवान शिवांनी राजकुमाराला ज्या प्रवेशद्वारातून तो आला त्या विरुद्ध दिशेच्या प्रवेशद्वारातून बाहेर जायला सांगितले कारण तो ज्या प्रवेशद्वारातून तो आत आला त्या प्रवेशद्वारात तो ब्रह्महत्ती वाट पाहत होता. असा समज आहे कि तो ब्रह्महत्ती अजूनही वाट बघत आहे. म्हणून अजूनही भाविक जन त्या प्रवेशद्वारातून बाहेर जात नाहीत. त्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर त्या ब्रह्महत्तीचे शिल्प आहे.
३. काही जण हे क्षेत्र पुराण वरगुण पांडियन ह्या राजाच्या कथेशी जोडतात. हा राजा एकदा जवळच्या जंगलामध्ये शिकारीला गेला होता. अंधार व्हायला लागल्यावर तो त्वरेने आपल्या घोड्यावरून परत येण्यास निघाला. एका झाडाखाली एक ब्राह्मण निद्रा घेत होता ह्याकडे त्या राजाचे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे त्याच्या घोड्याचे खूर ब्राह्मणावर आपटून तो ब्राह्मण मृत्यू पावला. राजाला त्याच्या शिपायांकरवी ह्याची माहिती मिळाली. जेव्हा त्याने हि गोष्ट पंडितांना सांगितली तेव्हा त्यांनी राजाला त्याला ब्रह्महत्येचा दोष प्राप्त झाल्याचे सांगितले. पंडितांनी त्याला शास्त्रात सांगितलेले उपाय करण्यास सांगितले. पण त्या उपायांनी राजाला त्या दोषातून मुक्ती मिळाली नाही. तो मदुराई मंदिरात गेला आणि त्याने श्री सुन्दरेश्वरांकडे म्हणजेच भगवान शिवांकडे मुक्तीसाठी प्रार्थना केली. जेव्हा तो भगवान शिवांना प्रदक्षिणा घालत होता त्यावेळी एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीतून राजाला सांगितले गेले कि त्याच्या राज्यावर एक राजा आक्रमण करेल पण तो राजा पराभूत होईल. तो पराभूत झालेला राजा पळून जाईल त्यावेळी त्या राजाचा पाठलाग वरगुण राजास करण्यास सांगितले. पाठलाग करत करत वरगुण राजा श्री महालिंगेश्वर मंदिरात पोचेल जिथे स्वतः भगवान शिवांनी शिव लिंगाची पूजा केली. जेव्हा वरगुण राजा पूर्वेच्या प्रवेशद्वारातून शिरून भगवान शिवांची पूजा करून महालिंगेश्वरांच्या आज्ञेने पश्चिमेच्या प्रवेशद्वारातून बाहेर जाईल त्यावेळी तो ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होईल. वरगुण राजाने तसे केल्यावर तो ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाला. असा समज आहे कि ब्रह्महत्ती, म्हणजेच हत्या झालेल्या ब्राह्मणाचा आत्मा, अजूनही पूर्वेच्या प्रवेशद्वाराशी आहे.
४. पंचक्रोशी स्थळ: प्रलयानंतर अमृत कलश कुंभकोणम मध्ये पोचला आणि तिथे स्थिर झाला. असा समज आहे कि अमृताचे थेम्ब पांच ठिकाणी पडले. ती पांच ठिकाणे अशी - थिरुविडाईमरुथुर, दारासुरम, थिरुनागेश्वरम, स्वामीमलै आणि कोरानट्टू करुप्पूर. हि क्षेत्रे एकमेकांपासून पांच क्रोशी दूर आहेत म्हणून त्यांना कुंभकोणमची पंचक्रोशी स्थळे असं संबोधलं जातं.
५. ज्योतिर्मय महालिंग: जेव्हा इथे ऋषीमुनी तपश्चर्या करत होते त्यावेळी अगस्त्य मुनी त्यांच्या शिष्यांसमवेत इथे आले आणि त्यांनी श्री उमादेवींची तपश्चर्या केली. श्री उमादेवींनी अगस्त्य मुनींना दर्शन दिलं. श्री उमादेवींना नमस्कार करून अगस्त्य मुनींनी श्री उमादेवींकडे भगवान शिवांचे दर्शन मिळविण्याची प्रार्थना केली. श्री उमादेवींनी ऋषींसमवेत भगवान शिवांची तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर तिथल्या ऋषीमुनींना भगवान शिवांनी त्यांच्या चुकीबद्दल दरडावलं. ते ऋषीमुनी तपश्चर्या करण्याआधी शिवलिंगाची उपासना करण्यास विसरले होते. भगवान शिवांची हि कृती बघून श्री पार्वती देवी अचंबित झाल्या आणि त्यांनी भगवान शिवांना ह्याचे कारण विचारलं. श्री पार्वती देवींच्या मते श्री ब्रह्मदेव आणि इंद्रादिदेव प्रचलित प्रथेप्रमाणे श्री पार्वती देवींचीच पूजा प्रथम करतात. भगवान शिवांनी ऋषींना त्यांच्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यायला लागेल असं सांगितलं. त्या दिवसापासून त्या ऋषीमुनींनी प्रथम शिव लिंगाची पूजा करण्यास चालू केले आणि त्यांना मुक्ती प्राप्त झाली. जेव्हा ऋषीमुनी श्री पार्वती देवींसह भगवान शिवांची उपासना करत होते त्यावेळी भगवान शिव श्री पार्वती देवींच्या हृदयातून ज्योती रूपात प्रकट झाले. त्यांनी ऋषीमुनींना ज्योतिरूपात कृपावर्षाव केला म्हणून येथील शिव लिंगाला ज्योतिर्मय महालिंग असं संबोधलं जातं.
६. स्थळ पुराणानुसार आदि शंकराचार्य इथे आले. त्यांची अशी इच्छा होती कि भगवान शिवांनी अद्वैताबद्दलचं सत्य घोषित करावं जेणेकरून सर्वांच्या अद्वैत तत्वाबद्दलच्या शंकांचे निराकरण होईल. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन शिव लिंगातून श्री महालिंगेश्वर प्रकट झाले आणि आणि त्यांनी “सत्यं अद्वैतम्, सत्यं अद्वैतम्, सत्यं अद्वैतम्” असं तीन वेळा घोषित केलं. येथील शंकर मठामधल्या गोपुरावर आपल्याला एक शिल्प बघायला मिळत ज्यामध्ये श्री महालिंगेश्वर आपला हात वर करून घोषणा करत आहेत आणि आदि शंकराचार्य हात जोडून त्यांच्यासमोर उभे आहेत. ह्या मठाच्या मध्यवर्ती अंगणामध्ये देवीचे देवालय स्थापिले आहे आणि त्याचबरोबर आदि शंकराचार्यांच्या पादुका स्थापित केल्या आहेत.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री शनीश्वरर, श्री चंद्र, कश्यप ऋषी, पट्टीनाथर, भद्रगिरियार, अरुणागिरिनाथर, करुवूर देवर, वरगुण पांडियन राजा, श्री उमा देवी, श्री विनायकर, श्री मुरुगन, श्री विष्णू, श्री ब्रह्म, श्री रुद्र, श्री लक्ष्मीदेवी, श्री सरस्वती देवी, श्री कालीदेवी, वसिष्ठ ऋषी, अगस्त्य मुनी, रोमेश ऋषी, कपिल ऋषी, मार्कंडेय ऋषी, सिद्ध (श्रीधर अय्यरवाल), कांचिमठाचे ५९वे मठाधिपती श्री बोधेंद्र सरस्वती, सुकीर्ती, वीरसेना.
वैशिष्ट्ये:
१. येथील शिवलिंग स्वयंभू आहे. ह्या लिंगाची उपासना स्वतः भगवान शिवांनी केली म्हणून ह्या लिंगाचे नाव श्री महालिंगेश्वर आहे.
२. हे दुसरे स्थळ आहे जिथे श्री मुकाम्बिका देवींचे देवालय आहे.
३. नंदिंच्या शरीराच्या तीन भागांशी तीन क्षेत्राचे नाते आहे. श्री शैलम हे नंदिंचे शिर दर्शवते, इडाईमरुथुर हे नंदिंच्या शरीराचा मध्य भाग दर्शवते तर कडाईमरुथुर हे नंदिंच्या शरीराचा पार्श्व भाग दर्शवते.
४. येथील चार रस्त्यांच्या चार जंक्शनवर चार विनायकांचे देवालये आहेत. इथे जेव्हा रथयात्रा निघते तेव्हा ती ह्या देवालयांच्या मार्गावरून जाते.
५. येथील श्री आनंदविनायकर देवालयामधले श्री विनायक देवगणांकडून प्राप्त झालेले पूजा साहित्य वापरून भगवान शिवांची पंचायतन पूजा पद्धतीप्रमाणे पूजा करतात. पुराणानुसार येथील श्री विनायक हे ह्या स्थळावरून अखिल विश्वावर राज्य करतात. म्हणून त्यांना श्री आनंदविनायकर असे संबोधले जाते.
६. इथे बरेच शिलालेख आहेत ज्यामध्ये मंदिराची माहिती तसेच मंदिरासाठी ज्या राजांनी काम केलं तसेच ज्या देणग्या दिल्या त्यांची माहिती उल्लेखिलेली आहे.
७. अश्वमेध प्रदक्षिणा: जेव्हा भाविक जन पहिल्या परिक्रमेमध्ये प्रदक्षिणा घालतात त्या प्रदक्षिणेला अश्वमेध परिक्रमा म्हणतात. ह्या परिक्रमेमधील प्रदक्षिणा चालू करण्याआधी श्री मुरुगन ह्यांची पूजा करणे हि प्रथा आहे. भाविक जन ७, १२, २४ किंवा १०८ प्रदक्षिणा घालतात. जे भाविक जन कार्थिगई महिन्यामध्ये इथे दिवा लावतात आणि थै महिन्यामध्ये प्रदक्षिणा घालतात त्यांना अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.
८. जेव्हा भाविक जन दुसऱ्या परिक्रमेमध्ये प्रदक्षिणा घालतात तेव्हा त्यांना कैलास पर्वताला प्रदक्षिणा (गिरिवलम) घातल्याचे फळ मिळते.
९. हे स्थळ श्री शैलम (श्री मल्लिकार्जुन) आणि थिरुनेलवेली येथील थिरुकडाईमरुथुर (ज्याला पूदरार्जून असं पण म्हणतात) ह्यांच्या मध्ये आहे. म्हणून ह्या स्थळाला थिरुविडाईमरुथुर म्हणजेच मध्यार्जूनम असं म्हणतात. अर्जुनम म्हणजे मरुत वृक्ष. ह्या तीनही स्थळांमध्ये मरुत वृक्ष हे क्षेत्र वृक्ष आहे.
१०. इथे श्री महाविष्णूंनी भगवान शिवांची पूजा केली म्हणून इथे पहिली पूजा भगवान शिवाची केली जाते आणि मगच श्री विष्णूंची पूजा केली जाते.
११. भगवान शिवांनी इथे मार्कंडेय ऋषींना अर्धनारीश्वरर रूपात दर्शन दिलं.
१२. इथे चार शैव संत म्हणजेच अप्पर, सुंदरर, संबंधर आणि माणिकवाचगर ह्यांनी स्तोत्रे गायली आहेत.
१३. इथे सतराव्या शतकातले थोर संस्कृत पंडित श्री श्रीधर अय्यरवल ह्यांची जीवसमाधी आहे. ते ज्योतिरूपामध्ये शिव लिंगामध्ये विलीन झाले.
१४. ह्या मंदिरामध्ये एक दिवा आहे ज्याचे नाव पवैविलक्कु असे आहे. मराठा साम्राज्याचा राजा प्रतापसिंग भोसले ह्यांनी हा दिवा ह्या मंदिराला भेट दिला.
१५. शैव संत श्री अरुणागिरिनाथर ह्यांनी इथल्या श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या मंदिराचे आवार आयताकृती असून साधारण २२ एकरवर पसरलेलं आहे. ह्या मंदिराला भव्य तलाव (पवित्र तीर्थ) आहे. ह्या मंदिरामध्ये भरपूर देवालये आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला सात स्तरांचे राजगोपुर आहे. गाभाऱ्याच्या समोर बलीपिठ, ध्वजस्तंभ तसेच नंदिंचे स्टुक्कोचे चित्र आहे. इथला नंदि खुप भव्य आहे. इथे प्रत्येक दिशेला एक असे चार राजगोपुर आहेत. मुख्य राजगोपुर पांच स्तरांचे आहे. पश्चिमेकडील राजगोपुर सात स्तरांचे आहे. इथे तीन परिक्रमा आहेत आणि प्रत्येक परिक्रमा भव्य भिंतींनी आच्छादित आहे. परिक्रमेंची नावे अशी आहेत: अश्वमेध परिक्रमा (सर्वात बाहेरील परिक्रमा), कोडूमुडी परिक्रमा (मधली परिक्रमा), ब्रणव परिक्रमा (आतली परिक्रमा).
प्रकारामधली देवालये आणि मूर्ती:
भगवान शिवांचे देवालय: येथील शिवलिंग स्वयंभू असून ते खूप भव्य आहे. गाभारा शिवलिंगरुपी आहे. भगवान शिवांनी स्वतः ह्या लिंगाची पूजा केली म्हणून ह्या लिंगाला महालिंग म्हणतात. हे लिंग एका भव्य बैठकीवर असून त्याच्या समोर दोन नंदि आहेत. ह्यातील एक नंदि तांब्याचा आहे. असा समज आहे कि श्री विनायकांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. म्हणून इथे श्री विनायकांच्या आधी भगवान शिवांची पूजा केली जाते.
श्री अंबिका देवींचे देवालय: श्री अंबिका देवींचे देवालय दक्षिणाभिमुख असून ते भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्याबाजूला आहे. हि रचना विवाहाच्या वधूवरांची जशी स्थिती असते त्याप्रमाणे आहे आणि अत्यंत शुभ मानली जाते. हे देवालय ५१ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. अर्थमंडपाच्या छतावर श्री मीनाक्षी देवी आणि श्री सुंदरेश्वरर ह्यांच्या विवाहाचे प्रसंग चित्रित केले आहेत. ह्या देवालयाच्या भिंतींवर श्री अंबिका देवींची विविध रूपे चित्रित केली आहेत. ह्या देवालयामध्ये शैव संत संबंधर ह्यांची मूर्ती आहे. ह्या देवालयाच्या बाहेरील परिक्रमेमध्ये श्री अंबिरप्रियल देवींची मूर्ती आहे. ह्या मंदिरातून बाहेर पडताना श्री अंबिकादेवींचे दर्शन घेऊन बाहेर पडायची प्रथा आहे.
येथील श्री मूकाम्बिका ह्यांचे देवालय हे ह्या स्थळाचे वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये फक्त दोनच ठिकाणी श्री मूकाम्बिका देवींचे स्वतंत्र देवालय आहे. त्यातील हे एक आहे. ह्या देवालयामध्ये त्या पद्मासनामध्ये आहेत आणि उत्तराभिमुख आहेत. हे देवालय श्री अंबिका देवींच्या दक्षिणेला आहे. ह्या देवालयाचा गाभारा हा उत्तर भारतामधल्या तसेच महाराष्ट्रामधल्या मंदिरांसारखा आहे. गाभाऱ्यामध्ये श्री चक्र (महामेरू) स्थापित केलं आहे. श्री मूकाम्बिका ह्यांना श्री पिडारीपरमेश्वरीअम्मन असं पण संबोधलं जातं. ह्या देवालयाचे शिखर काशीमधल्या मणिकर्णिका तीर्थासारखे आहे. मुकासुर ह्या दैत्याची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या ब्रह्महत्येच्या दोषाचे निरसन करण्यासाठी त्या तपश्चर्या करत आहेत.
प्रत्येक शिव मंदिराची एक विशिष्ट पारंपरिक रचना असते. हे मंदिर आणि अजून इतर आजूबाजूची मंदिरे ह्यांची भौगोलिक स्थाने अशा प्रकारे आहेत की ज्यामुळे ह्या सर्व मंदिरांकडे एकत्रित पाहिलं तर ते पारंपरिक रचनेप्रमाणे हे एक शिव मंदिर भासतं. त्या पद्धतीने जर पाहिलं तर थिरुवलंचुळी येथे श्री विनायकांचे मंदिर आहे, स्वामीमलै मध्ये श्री मुरुगन ह्यांचे मंदिर आहे, सैगनलुर येथे श्री चंडिकेश्वरर ह्यांचे मंदिर आहे, सूर्यनार कोविल येथे नवग्रह संनिधी आहे, चिदंबरम येथे श्री नटराजांचे मंदिर आहे, सिरकाळी येथे श्री भैरवांचे मंदिर आहे, थिरुविडाईमरुथुर येथे श्री नंदिंचे मंदिर आहे तसेच ह्या मोठ्या मंदिराचे मूलवर म्हणजेच श्री महालिंगेश्वरर ह्यांचे मंदिर आहे. हि रचना एक शिव मंदिर दर्शवते.
ह्या मंदिराला पंचलिंग स्थळ असं पण संबोधलं जातं कारण ह्या मंदिराच्या चार मुख्य बिंदूंवर चार लिंगे आहेत आणि श्री महालिंगेश्वरर हे मध्यभागी आहे. ह्या मंदिराच्या पूर्वेकडील रस्त्यावर श्री काशी विश्वनाथर मंदिर आहे, पश्चिमेकडे श्री ऋषिपुरीश्वरर मंदिर आहे, दक्षिणेला श्री आत्मानेश्वरर मंदिर आहे तर उत्तरेला श्री चोक्कनाथर मंदिर आहे.
श्री आनंदविनायकर मंदिर: आतील परिक्रमेमध्ये भगवान शिवांच्या दक्षिणेला श्री विनायकांचे देवालय आहे. इथे श्री विनायकांना श्री आनंद विनायकर असे संबोधले जाते.
श्री बाळकृष्णांचे इथे एक छोटे देवालय आहे. इथे कश्यप ऋषींना बाळकृष्ण रूपाचे दर्शन झाले.
इथे प्रवेशाजवळ श्री विनायकांची एक मूर्ती आहे. जिचे नाव श्री पडीथूरै विनायकर असे आहे.
ह्या शिवाय श्री मुरुगन, श्री अघोरवीरभद्र, श्री ऐरावतेश्वरर, श्री आत्मलिंगेश्वरर ह्यांची देवालये परिक्रमेमध्ये आहेत.
इथे परिक्रमेमध्ये २७ नक्षत्रांची प्रतीके म्हणून २७ शिव लिंगे आहेत. पुराणानुसार २७ नक्षत्रांनी हि शिव लिंगे स्थापन करून त्यांची पूजा केली. हे स्थळ नक्षत्र परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
ह्या शिवाय परिक्रमेमध्ये पुढील शिवलिंगे आहेत - आकाश लिंग, कश्यप लिंग, रोमेश लिंग, चोळा लिंग, सहस्र लिंग, पंचभूत लिंग.
इथे एक मूर्ती आहे ज्यामध्ये एक स्त्री पितळ्याचा दिवा घेऊन उभी आहे. ही मूर्ती साधारण १२० सेंटीमीटर उंच आहे. ही मूर्ती मराठा साम्राज्याचा राजा प्रतापसिंग भोसले ह्याने ह्या मंदिराला अठराव्या शतकामध्ये भेट दिली आहे. ह्या मूर्तीचे नाव पवैविलक्कु असे आहे. ह्या मूर्तीशिवाय ह्या राजाने १ लाख धातूचे दिवे ह्या मंदिराला भेट दिले आहेत. ह्या मूर्तीमधली स्त्री अविवाहित युवती आहे (तामिळ मध्ये पवै). ह्या मूर्तीच्या खाली ह्या राजाने हि मूर्ती मंदिराला भेट दिली असे कोरले आहे.
ह्या मंदिराच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर शैव संत पट्टीनाथर आणि त्यांचा शिष्य भद्रगिरियार ह्यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या आवारात शैव सिद्धांत ग्रंथालय आहे जिथे ताडपत्रांवरची हस्तलिखिते आहेत.
ह्या मंदिराशी निगडित ३२ तीर्थे आहेत त्यापैकी ५ तीर्थे मंदिराच्या आतमध्ये आहेत तर उरलेली २७ तीर्थे मंदिराच्या बाहेर आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, दुःखनिवारणासाठी, अपत्यप्राप्तीसाठी तसेच सुरक्षित प्रसूतीसाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे मानसिक औदासिन्य आणि विकारांतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतात.
३. हे स्थळ ब्रह्महत्या दोषाचे परिहार स्थळ आहे.
४. तसेच हे स्थळ अनुशम (मराठी मध्ये अनुराधा) नक्षत्र दोषाचे पण परिहार स्थळ आहे.
पूजा:
१. दैनंदिन पूजा दिवसातून सहा वेळा केल्या जातात
२. प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा केल्या जातात.
३. प्रत्येक पक्षामध्ये प्रदोष पूजा केल्या जातात
४. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, तामिळ नववर्ष, इंग्लिश नववर्ष ह्या दिवशी विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो.
मंदिरात साजरे होणारे सण:
थै (जानेवारी-फेब्रुवारी): १० दिवसांचा थैपुसम उत्सव, पोंगल
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
वैकासि (मार्च-जून): स्वर्गीय विवाह उत्सव
आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरम
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): अन्नाभिषेक, नवरात्री, बाण उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक आणि स्कंदषष्ठी उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम उत्सव, कार्थिगई सोमवारी १००८ शंखांचा अभिषेक केला जातो, दीपावली
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै, थिरुवडुथूरै, अरुंद दर्शन
पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा नक्षत्र उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, संध्याकाळी ५ ते ८
मंदिराचा पत्ता: श्री महालिंगेश्वरर मंदिर, थिरुविडाईमरुथुर, तामिळनाडू ६१२१०४
दूरध्वनी: ९१-४३५२४६०६६०/१९४६, ९१-९७९०५२५७८१