Thursday, September 8, 2016

Vakratunda - first incarnation of Lord Vinayak

या अवतारात वक्रतुंड उपासना करून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य  कसे मिळवले याची कथा आहे. हा अवतार हा या आद्यदेवतेचा म्हणजेच श्री गणेशाचा पहिला अवतार आहे. 

याचे स्वरूप - रक्तवर्ण अंगकांती, हत्तीचे तोंड व सर्वांगी शेंदूर चर्चिलेली अशी चतुर्भुज सगुण मूर्ती आहे. 

सृष्टीमध्ये एकदा महाप्रलय झाला. सर्व ब्रह्मांड जलमय झाले. फक्त शिल्लक राहिले ते चराचरात व्यापून राहिलेले शुद्ध चैतन्य. तोच परमात्मा अथवा परमेश्वर. 

अशा या परमेश्वराला पुन्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या मायेने सत्व, रज आणि तम असे तीन गुण निर्माण केले. सत्वापासून ब्रह्मदेव निर्माण झाला. रजापासून श्रीविष्णू प्रकट झाला. तमापासून शिव-शंकर प्रकट झाला.  याच परमेश्वराच्या इच्छेने ब्रह्मदेवाला ज्ञानप्राप्ती झाली. सृष्टी पुन्हा निर्माण करण्याचे कार्य ब्रह्मदेवाला सांगून परमेश्वर अंतर्धान पावला. 

त्या ईश्वराच्या इच्छेनुसार ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरु केले. कार्यारंभ सुरु केल्यावर त्यात भयंकर विघ्ने निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्या सृष्टीनिर्मितीच्या कामात अडथळा निर्माण करू लागली. ब्रह्मदेवाचे सृष्टी निर्मितीचे काम पुढे सरकेनाच. कोणी ब्रह्मदेवाचा हात ओढू लागले. तर कोणी त्याची शेंडी खेचून त्यास दुःख देऊ लागले. कुणी मेघांच्या गडगडाटासारखे भयंकर गर्जना करू लागले. कुणी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत तर कुणी गुप्तपणे वार करत.  ब्रह्मदेव अतिशय भयभीत झाला.  संकट निवारण करण्यासाठी त्याने अनेक उपाय केले. पण व्यर्थ! या संकंटांपुढे त्याचे काहीही चालेना. त्याच्या सृष्टी निर्मितीचे काम पुढे सरकेना. परमेश्वर अंतर्धान पावला होता. हे दुःख सांगावे कुणाला हे ब्रह्मदेवाला समजेना. 

अखेर ब्रह्मदेवाने अतिशय गोड शब्दात परमात्म्याची करूणा भाकली. त्याची प्रार्थना करून ब्रह्मदेव म्हणाला "हे परमेश्वरा, तुझ्या आज्ञेने मी सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला खरा, पण हे कार्य करण्यात अत्यंत अडथळे येत आहेत. दुष्ट शक्ती नाना संकटे आणून माझ्या कार्यात विघ्ने आणत आहेत. त्यांच्या पुढे माझे वेदमंत्रही कुंठित झाले आहेत. ही विघ्ने निवारण्यास मी खरोखरच असमर्थ आहे. आणि म्हणूनच हे परमात्म्या, मी तुला अनन्य शरण आलो आहे." 

ब्रह्मदेवाची स्तुती ऐकून विनायक संतुष्ट झाला आणि सगुणरूपाने प्रकट झाला. त्याने ब्रह्मदेवाला "ॐ नमो वक्रतुंडाय" हा जप करण्यास सांगितले. त्याने सांगितले "हा मंत्र जपल्यास तुझे इच्छित कार्य पूर्ण होईल. वक्रतुंडाच्या कृपेने तुझे कार्य निर्विघ्न पार पडेल." असे अभयवचन देऊन विनायक अंतर्धान  पावला. विनायकाने दिलेल्या वराने ब्रह्मदेव आनंदित होऊन तपश्चर्येला बसला. एकाग्र मनाने दिवसरात्र त्याने वक्रतुंड मंत्राचा जप चालू केला. बारा वर्षे तपश्चर्या केल्यावर त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन वक्रतुंड विनायक महाकाय रूपाने प्रकट झाला. रक्तासारखी लाल अंगकांती, क्रूर नेत्र, सोंड आणि संपूर्ण तोंडावर शेंदूर चर्चिलेला, असा तो कोटीसूर्याहूनही तेजस्वी असा विनायक प्रकट झाला. त्याच्या दिव्य तेजाने सर्व त्रैलोक्य भरून गेले. ब्रह्मदेव भारावून गेला. हात जोडून उभा राहिला. वक्रतुंडाने आशीर्वाद दिला "तू तुझे सृष्टी निर्मितीचे कार्य सुरु कर. जी विघ्ने येतील त्यांचा मी संहार करीन." हे ऐकून ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याक्षणी विनायक अंतर्धान पावला. 

मग ब्रह्मदेवाने वक्रतुंडास स्मरून सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त अशी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. प्रथम वृक्ष, लता वेली निर्माण केल्या. झरे, नद्या, तलाव निर्माण केले. तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, सरपटणारे प्राणी, किडे, जीव जंतू निर्माण केले. लहान मोठे तऱ्हेतऱ्हेचे अनेक पशु निर्माण केले. पण त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याला स्वतःच्या बुद्धीने काम करणारा, स्वतःच्या विचाराने चालणारा, आत्मकल्याणासाठी प्रयत्न करणारा प्राणी निर्माण करायचा होता. मग वक्रतुंडाला स्मरून महत् प्रयासाने त्याने हा मनुष्य प्राणी निर्माण केला. तो निर्माण करूनच ब्रह्मदेवाला समाधान झाले. म्हणूनच मनुष्य जन्म दुर्लभ आहे असे व्यासांनी लिहून ठेवले आहे. जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होते तेव्हाच मनुष्यदेह लाभतो. म्हणूनच मनुष्याने आत्मकल्याणासाठी वक्रतुंडाची नेहमी भक्ती करावी. त्याचे सतत नामस्मरण करावे. 

वक्रतुंड हा दयाळू आहे. भक्तांचा कैवारी आहे. विघ्नविनाशक असा हा वक्रतुंड भक्तांची संकटे दूर करतो. त्यांचा उद्धार करतो. म्हणून "श्री वक्रतुंडाय नमः" हा जप सतत करून वक्रतुंडाला स्मरावे. त्यातच मनुष्याचे कल्याण आहे. 

स्कंद पुराणातील वक्रतुंड चरितामृताचा हा गोड प्रथम अध्याय समाप्त. 

No comments:

Post a Comment