Sunday, February 8, 2026

थिरुमीयचूर येथील श्री मेघनादस्वामी मंदिर आणि श्री सकलभुवनेश्वरर मंदिर

हे मंदिर श्री ललिताम्बिगाई मंदिर म्हणूनपण प्रसिद्ध आहे. ही मंदिरे तामिळ नाडू मधल्या थिरुमीयचूर ह्या गावात स्थित आहेत. मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून हे मंदिर २० किलोमीटर्स वर आहे. इथे पोहोचण्यासाठी पहिले मयीलादुथुराई पासून १८ किलोमीटर्स वर असलेल्या पेरलम ह्या गावात पोचून मग तिथून थिरुमीयचूरला जाता येतं. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. शक्ती पीठांमध्ये हे पहिलं शक्ती पीठ (आदि शक्तीपीठ) समजलं जातं. इथे देवींना आदिपराशक्ती असे संबोधले जाते. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी पैकी हे एक मंदिर आहे. मूळ बांधकाम विटांचे होते. कालांतराने ह्या मंदिराचे दगडी बांधकाम राजेंद्र चोळा आणि सिम्बिअन महादेवी ह्यांनी केले. मंदिराचा विस्तार विविध चोळा आणि पांड्या राजांनी केला. श्री ललिताम्बिगाई मंदिराशिवाय इथे भगवान शिवांची दोन मंदिरे आहेत.

पहिलं मंदिर: श्री मेघनादस्वामी मंदिर

मूलवर: श्री मेघनादस्वामी, श्री मिहारअरुणेश्वरर
देवी: श्री ललिताम्बिगाई, श्री सौंदर्यनायकी, श्री शांतनायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व, जंगलीबदाम, पंगार
पवित्र तीर्थ: सूर्यपुष्करिणी 

दुसरं मंदिर: श्री सकलभुवनेश्वरर मंदिर

देवी: श्री विद्वानमेगलांबिका, श्री मिन्नूममेघालयाल
मूलवर: श्री सकलभुवनेश्वरर
क्षेत्र वृक्ष: मंदार वृक्ष
पवित्र तीर्थ: काली तीर्थ

क्षेत्र पुराण:

१. देवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून श्री ललितादेवी चिदग्निकुंडातून प्रगट झाल्या आणि त्यांनी भंडासूराचा वध केला. भंडासूराचा वध केल्यानंतरपण देवीचा राग शमला नव्हता. ह्या रागाचं शमन होण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना पृथ्वीवर येऊन मनोन्मनी रूपांत तपश्चर्या करायला सांगितली. ललितादेवींनी भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार इथे येऊन तपश्चर्या केली. त्या नंतर त्या शांत आणि दयावान झाल्या. त्यांनी वाग्देवींना निर्माण केलं आणि त्यांना ललितादेवींच्या १००० नावांची स्तुती गाण्याची आज्ञा केली. ह्या घटनेतूनच ललितासहस्रनामाचा उगम झाला. सहस्रनामाची सुरुवात “श्रीमाता” ह्या नावाने होते ज्याचा अर्थ समृद्धीची किंवा लक्ष्मीची माता असा होतो. श्री हयग्रीव हे श्री ललिता देवींचे शिष्य आहेत. श्री ललिता देवींच्या आज्ञेवरून श्री हयग्रीवांनी अगस्त्य ऋषींना श्री ललितासहस्रनाम शिकवलं. जेव्हा अगस्त्य ऋषींनी श्री ललितासहस्रनामाचं पठण करण्यासाठी योग्य जागेबद्दल श्री हयग्रीवांना विचारलं, तेव्हा श्री हयग्रीवांनी अगस्त्य ऋषींना थिरुमीयचूर, जिथे श्री ललिता देवी श्री मनोन्मनी रूपांत वास्तव्य करून आहेत, तिथे येऊन पठण करायला सांगितलं. अगस्त्य ऋषी त्यांच्या पत्नी लोपमुद्रांसमवेत इथे आले आणि त्यांनी श्री ललितासहस्रनामाचं पठण केलं. श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषी आणि त्यांच्या पत्नींना नवरत्न रूपांत दर्शन दिलं. अगत्स्य ऋषींनी श्री ललिता नवरत्नमाला स्तोत्र रचून श्री ललितादेवींची उपासना केली.

२. पुराणानुसार कश्यप ऋषींच्या विनाता आणि कर्तृ नावाच्या दोन पत्नी होत्या. त्यांनी भगवान शिवांची अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी प्रत्येकीला एक एक अंड दिलं आणि त्या अंड्याचं एक वर्षभर पालनपोषण करायला सांगितलं. विनाताला मिळालेल्या अंड्यातून पक्ष्यांचा राजकुमार गरुडाचा जन्म झाला. कालांतराने गरुड भगवान विष्णूंचे वाहन बनला. कर्तृने घाईघाईत तिला मिळालेलं अंड फोडलं आणि त्यातून विकृत आकाराचे अपत्य जन्माला आले. कर्तृने आपल्या कृत्याबद्दल भगवान शिवांकडे क्षमाप्रार्थना केली. भगवान शिवांनी तिला क्षमा केली आणि तो पुत्र अरुणा नाव प्राप्त करून सुर्यदेवाचा सारथी बनेल असा आशीर्वाद दिला. अरुणा भगवान शिवांचा कट्टर भक्त बनला. त्याला कैलासावर जाऊन भगवान शिवांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. सूर्यदेव त्याच्या अपंगत्वाची खिल्ली उडवत त्याला म्हणाले की त्याच्या अपंगत्वामुळे तो कैलासावर जाऊ शकणार नाही. अरुणाने एका सुंदर मोहिनी स्त्रीचे रुप धारण केलं आणि तो कैलासाकडे निघाला. वाटेमध्ये सूर्यदेवांनी त्याला सुंदर अशा मोहिनीच्या रूपांत पाहिलं आणि सूर्येंदेव त्यावर मोहित झाले आणि त्यांनी मोहिनीशी म्हणजेच स्त्री रूपातल्या अरुणाबरोबर गैरवर्तन केलं. जेव्हां अरुणाने भगवान शिवांकडे ह्याबद्दल तक्रार केली त्यावेळी भगवान शिवांनी सूर्यदेवांना त्यांचे तेज कमी होण्याचा शाप दिला. सूर्यदेवांनी इथे येऊन ७ महिने तपश्चर्या केली. त्यांनी हत्तीवर आरूढ असलेल्या भगवान शिवांची म्हणजेच गजारूढ मूर्तीची उपासना केली. तरीपण सूर्यदेवांचे तेज परत आले नाही. सूर्यदेवांनी तेज कमी झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांमुळे खूप आक्रोश केला ज्यामुळे पार्वती देवींची शांतता भंग पावली. त्या सूर्यदेवांना ते पूर्णपणे कृष्णवर्ण होतील म्हणून शाप द्यायला निघाल्या पण भगवान शिवांनी त्यांना शांत केलं. त्यांनी पार्वतीदेवींना समजावलं की सूर्यदेव शापापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्यांना क्षमा करायला सांगितलं. ह्या मंदिरामध्ये भगवान शिव पार्वती देवींना शांत करत आहेत असे दृश्य क्षेत्रपुराणेश्वरर ह्या मूर्तीमध्ये चित्रित केले आहे. भगवान शिवांच्या कृपेने सूर्यदेवांना शापामधून मुक्ती मिळाली आणि त्यांना त्यांचे तेज परत प्राप्त झाले. म्हणून ह्या स्थळाला मेयचूर असे नाव प्राप्त झाले. असा उल्लेख आहे की सूर्यदेव आणि अगस्त्य ऋषींप्रमाणेच यमदेवांनीपण इथे भगवान शिवांची उपासना केली. यमदेवांनी १००८ शंखांनी इथे अभिषेक केला. 

३. पुराणानुसार हे स्थळ श्री शनीश्वरर, श्री यमदेव, वाली आणि सुग्रीव ह्यांचे जन्मस्थान आहे. 

४. आम्ही खूप अलीकडे म्हणजेच १९९९ साली घडलेल्या एका घटनेचा इथे उल्लेख करू इच्छितो. श्री अंबिकादेवींच्या एका भक्तिणीला वारंवार स्वप्ने पडत होती ज्यामध्ये श्री अंबिका देवी त्यांच्याकडे सोन्याच्या पैंजणांची मागणी करत होत्या. त्या महिलेनी बऱ्याच मंदिरांना भेट दिली पण त्यांना स्वप्नात दिसलेल्या देवी कुठे मिळाल्या नाहीत. जेव्हा त्या श्री कपालीश्वर मंदिराच्या जवळ होत्या त्यावेळी त्यांना स्वप्नात दिसलेल्या देवींचा फोटो दिसला. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की तो फोटो थिरुमीयचूर येथील श्री ललिताम्बिकांचा फोटो होता. त्या इथे सोन्याची पैंजणे घेऊन आल्या आणि इथल्या पुजाऱ्यांना त्यांनी आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. पुजारी त्यांना म्हणाले कि देवींच्या मूर्तीमध्ये पैंजण परिधान करण्यासाठी कुठेही सोय नाही. त्या पुजाऱ्याने हे पण सांगितले की त्याच्या अनेक पिढ्या इथे पुजारी म्हणून काम करत होत्या पण कधीही देवीला पैंजणे चढविल्याचे ऐकिवात नाही. त्या महिलेच्या आग्रहाखातर त्या पुजाऱ्याने मूर्तीमध्ये कुठे पैंजण चढविण्याची सोय आहे का ते बघायचे ठरवले. देवीच्या पाउलांवर अभिषेक करताना त्याला एक छिद्र दिसले जिथून पैंजणे बांधली जाऊ शकतात. पुढे त्यांना देवींच्या नाकात पण एक छिद्र दिसले जिथून नथ चढवली जाऊ शकते. ह्या घटनेनंतर भाविक जन आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर देवीला पैंजणे आणि नथ अर्पण करतात.  

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

कालीदेवी, अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा, यमदेव, सूर्यदेवांचे सारथी अरुणा, सूर्यदेव, सुग्रीव, वाली.

वैशिष्ट्ये:

१. ह्या स्थळी श्री ललितादेवींच्या आज्ञेवरून वाग्देवींनी ललितासहस्रनामाचं प्रथम पारायण केलं. 

२. इथे माता ललितादेवी श्रीचक्रावर बसून भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांना दोन हात आहेत. एक हात अभय मुद्रेत आहे तर दुसरा हात वरद मुद्रेत आहे.

३. ह्या स्थळी श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं. अगस्त्य ऋषींनी ललिता नवरत्नमला स्तोत्र रचून श्री ललितादेवींची पूजा केली कारण श्री ललितादेवींनी अगस्त्य ऋषींना नवरत्नरूपांत दर्शन दिलं. 

४. श्री ललिता देवी इथे सर्वालंकारभूषिता तसेच सर्वाभरणभूषिता रूपांत भक्तांवर कृपावर्षाव करतात. 

५. ह्या स्थळी श्री ललितादेवींनी तिच्या भक्तिणीकडून पैंजणांचा स्वीकार केला. श्री ललितादेवी ह्या भक्तिणीच्या १९९९ साली स्वप्नांत आल्या आणि त्यांनी पैंजणांची मागणी केली.

६. शक्तिपीठांची निर्मिती होण्याआधी इथे श्री ललितादेवी आदिपराशक्ती रूपांत प्रकट झाल्या. 

७. श्री सूर्यदेव इथे उपासना करून त्यांना प्राप्त झालेल्या शापांतून मुक्त झाले.

८. श्री सूर्यदेवांचे पुत्र शनिदेव आणि यमदेव ह्यांचे हे जन्मस्थान आहे.

९. दरवर्षी चित्राई (एप्रिल-मे) ह्या तामिळ महिन्याच्या २१व्या दिवसापासून ते २७व्या दिवस ह्या अवधीमध्ये सूर्याची किरणे मेघनादस्वामींवर पडतात. असा समज आहे की श्री सूर्यदेव ह्या अवधीमध्ये भगवान शिवांची उपासना करतात. 

१०. असा समज आहे की ह्या ठिकाणी श्री यमदेव दररोज माध्यान्ह समयी दीर्घायुष्यासाठी श्री मेघनादस्वामींची पूजा करतात. 

११. हे एकच ठिकाण असं आहे जिथे भगवान शिवांची दोन मंदिरे आहेत - श्री मेघनादस्वामी आणि श्री सकलभुवनेश्वरर. 

१२. असा उल्लेख आहे की श्री महालक्ष्मीनीं इथे श्री सकलभुवनेश्वरींची पूजा केली.

१३. सूर्यदेवांचा सारथी अरुणा आणि पक्ष्यांचा राजकुमार गरुड ह्यांचे हे जन्मस्थान आहे.

१४. मोहिनीचे रूप घेतलेला अरुणा आणि श्री इंद्रदेव ह्यांच्यापासून इथे वालीचा जन्म झाला. 

१५. मोहिनीचे रूप घेतलेला अरुणा आणि श्री सूर्यदेव ह्यांच्यापासून इथे सुग्रीवाचा जन्म झाला.

१६. श्री मेघनादस्वामींचा गाभाऱ्याचा आकार हत्तीच्या पृष्ठभागासारखा आहे.

१७. ह्या ठिकाणी श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री शिव (लिंगोद्भवर) ह्या तिघांचेही दर्शन होते.

१८. इथली श्री क्षेत्रपुराणेश्वरर मूर्ती विशेष आहे. ह्या मूर्तीमध्ये श्री अंबिकांचे मुख एका दिशेने पाहिलं तर ते हसतमुख दिसते आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर ते उग्र (क्रोधीत) दिसते. 

१९. इथे श्री दुर्गादेवींच्या हातामध्ये पोपट आहे. असा समज आहे की हा पोपट भक्तांच्या प्रार्थना श्री ललिताम्बिकांपर्यंत पोचवतो. 

२०. श्री सकलभुवनेश्वरर ह्यांच्या देवालयामध्ये श्री विष्णूंची मूर्ती हात जोडलेल्या मुद्रेमध्ये आहे.

२१. इथे श्री कालीदेवींनी श्री ललिताम्बिकांची पूजा केली.    

मंदिरांबद्दल माहिती:

श्री मेघनादस्वामी मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर थिरुमीयचूर पेरूनकोविल म्हणून पण प्रसिद्ध आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्यावरचे विमान (गोपुर) हे हत्तीच्या पृष्ठभागाच्या आकाराचे आहे. हा आकार देण्याचे कारण इथे श्री सूर्यदेवांनी हत्तीवर आरूढ झालेल्या भगवान शिव आणि पार्वती देवींची उपासना केली. इथे दोन पूर्वाभिमुख राजगोपुरें आहेत. मुख्य राजगोपुर पांच स्तरांचं आहे. दुसरं राजगोपुर तीन स्तरांचं असून ते मंदिराच्या आवाराच्या पुढे आहे. मुख्य राजगोपुरानंतर बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदी आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशाला द्वारपालकांची स्टुक्कोची चित्रे आहेत. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या २१व्या दिवसापासून सात दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. ह्या सात दिवसांच्या काळामध्ये इथे सूर्य पूजा केली जाते.

कोष्ठ मूर्ती:  श्री क्षेत्रभुवनेश्वरर, गंगाधरर आलिंगन मूर्ती (भगवान शिव पार्वती देवींचा क्रोध शांत करताना), श्री नर्तन विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी, श्री चंद्रशेखर आणि श्री ऋषभरुढर.

परिक्रमेमध्ये आपल्याला पुढील मूर्ती आणि देवालये पाहावयास मिळतात: नालवर, शिव लिंगाची पूजा करत असलेल्या सप्त मातृका, पंचभूतलिंगे, श्री इंद्रदेवांनी पुजीलेलं शिव लिंग, श्री अग्निदेव, श्री यमदेव, श्री सूर्यदेव, श्री भैरव, श्री सूर्यदेव, श्री सिद्धिविनायक, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, निरूथीलिंग, वरुणलिंग, कुबेरलिंग, ईशानलिंग, अगत्स्यलिंग, नागलिंग, शैव संत सेक्कीळर, श्री नटराज, पाताळलिंग, श्री महालक्ष्मी, श्री विशालाक्षी समवेत श्री विश्वनाथ. 

मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे श्री ललिताम्बिका ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये स्वतंत्र गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. मूर्ती साधारण ५ फूट उंच असून ती श्री चक्रावर स्थित आहे. श्री ललिताम्बिका सुखासनेमध्ये आहेत. त्यांचा डावा पाय मोकळा असून उजवा पाय दुमडलेला आहे. ह्या स्वरूपाला मनोन्मनी म्हणतात आणि मूर्तीला शांतनायकी असे नाव आहे. हे पहिलं शक्तीपीठ मानलं जातं म्हणून इथे त्यांना आदिपराशक्ती असं संबोधलं जातं. असा समज आहे की श्री ललितासहस्रनामाचा उगम इथे झाला.

श्री दुर्गादेवींबद्दल माहिती:

इथे दुर्गादेवींना श्री शुकब्रह्मदुर्गादेवी असं संबोधलं जातं. त्या महिषासुरावर पाय ठेवून आहेत पण त्यांचं रूप शांत आहे. ह्या देवालयातून श्री ललिताम्बिका देवींच्या देवालयाकडे पोपट उडून जाताना दिसतात जणू काही ते भक्तांच्या प्रार्थना पोचवत आहेत.

श्री सकलभुवनेश्वरर मंदिराबद्दल माहिती:

ह्या मंदिराला एलांगकोविल असं म्हणतात. हे मंदिर पेरूनकोविलच्या उत्तरेला आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. श्री अंबिका देवी स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालयामध्ये आहेत ज्यामध्ये स्वतंत्र गाभारा आहे. ह्या मंदिरातल्या मूर्ती आणि देवालये अशी आहेत: श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्म, श्री चतुर्मुखीचंडिकेश्वरर, श्री भैरव, श्री सूर्य, आकाशलिंग, वायूलिंग, शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या दिव्य स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे.

प्रार्थना:

१. असा समज आहे की श्री ललिताम्बिकांच्या भक्तांनी देवींची पूर्ण कृपा प्राप्त करण्यासाठी एकदा तरी ह्या मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घ्यावे.

२. रोगातून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन इथे पिरंडाई मिश्रित भात नैवेद्य अर्पण करतात. पिरंडाई म्हणजे मराठीत कंदवेल किंवा घोलसवेल.

३. भाविक जन इथे विवाह संपन्न होण्यासाठी, अपत्य प्राप्तीसाठी तसेच अपत्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी इथे प्रार्थना करतात. 

४. भाविक जन त्यांच्या ६०व्या आणि ८०व्या जन्मदिवशी इथे दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा करतात. 

५. भाविक जन इथे स्वास्थ्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. 

पूजा

नियमित दैनंदिन पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:

थै (जानेवारी-फेब्रुवारी): रथसप्तमी 

ह्या शिवाय भगवान शिव आणि पार्वती देवींच्या आदरार्थ इथे सर्व मासिक आणि पाक्षिक सण साजरे होतात. 

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२.३०, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री ललिताम्बिका / श्री मेघनादस्वामी मंदिर,
थिरुमीयचूर,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९४०५

दूरध्वनी: +९१-४३६६२३९१७०, +९१-९४४४८३६२५६

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment