हे मंदिर थिरुवारुर - नागपट्टीनं मार्गावर थिरुवारुर पासून १४ किलोमीटर्स वर, नागपट्टीनं पासून १३ किलोमीटर्सवर, सिक्कल पासून ८ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणमपासून ५४ किलोमीटर्सवर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलेल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. चोळा राजाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला असा समज आहे. ह्या स्थळाला कुबेर स्थळ असं म्हणतात. इथे दोन शिलालेख आहेत. हे शिलालेख राजराजा चोळा आणि मराठा राजा तुळजाजी ह्यांच्या काळचे आहेत. चित्रकूट पर्वत नावाच्या टेकडीवर हे मंदिर बांधले आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या ठिकाणी भगवान शिवांचे पुत्र श्री मुरुगन ह्यांनी भगवान शिवांची पूजा केली. म्हणून ह्या स्थळाला वेलूर असं म्हणतात. श्री मुरुगन ह्यांच्या हातात भाला (वेल) असतो म्हणून त्यांना वेलन असं पण म्हणतात.
मूलवर: श्री केडिलीयप्पर, श्री अक्षयलिंगस्वामी, श्री अक्षयलिंगेश्वरर
देवी: श्री सुंदरगुगम्बल, श्री वनमुळैनायकी
पवित्र तीर्थ: श्रवण तीर्थ, अग्नी तीर्थ, शेष तीर्थ, ब्रह्म तीर्थ, सूर्य तीर्थ, चंद्र तीर्थ, कुबेर तीर्थ.
क्षेत्र वृक्ष: बद्री (मराठी मध्ये बोर), इंडियन प्लम किंवा इंडियन जुजूबे (तामिळ मध्ये एलंथै)
पुराणिक नाव: किळवेलूर, थिरुकिळवेलूर
क्षेत्र पुराण:
१. इथल्या स्थळपुराणानुसार सुरपद्मन ह्या राक्षसाचा वध केल्याने श्री मुरुगन ह्यांना वीरहत्ती दोष प्राप्त झाला होता. ह्या दोषापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी भगवान शिवांना सल्ला विचारला. भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. श्री मुरुगन त्यांचे सैन्य आणि ९ सेनापतींसह इथे आले. त्यांनी इथे येऊन प्रथम श्री विनायकांची हळदीची मूर्ती केली. आणि मग तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या भाल्याने (वेल) इथे एक तीर्थ (तलाव) तयार केलं. म्हणून ह्या स्थळाला वेलूर असं नाव प्राप्त झालं. इंद्रदेव आणि स्वर्गीय स्थपती मायन ह्यांच्या साहाय्याने श्री मुरुगन ह्यांनी हे भगवान शिवांचं सुंदर मंदिर बांधलं. ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली त्या जागेचं नाव मांजाडी ज्याचं वर्तमान नाव किळवेलूर आहे. तपश्चर्ये दरम्यान मायाजालाच्या रूपांत त्यांना वीरहत्ती कडून बरेच अडथळे निर्माण झाले. त्यांनी भगवान शिवांना मदतीची मागणी केली. भगवान शिवांनी पार्वती देवींना मुरुगन ह्यांच्यावरचे अडथळे दूर करण्यासाठी पाठवलं. पार्वती देवी इथे भद्रकालीच्या रूपांत आल्या आणि त्यांनी मुरुगन ह्यांचं चार दिशा तसेच आकाशातून रक्षण केलं. त्यांनी पांच दिशांहून रक्षण केलं म्हणून त्यांना इथे अंजु-वत्तथू-अम्मन असं संबोधलं जातं (तामिळ मध्ये अंजु म्हणजे पांच आणि वत्तथू म्हणजे वर्तुळ). स्थळपुराणानुसार पार्वती आकाशातून पांच वेळा वर्तुळाकार फिरल्या आणि त्यांनी नृत्य केलं म्हणून त्यांना अंजु-वत्तथू-अम्मन असं संबोधलं जातं.
२. सिंघध्वज नावाचा राजा शिकारीला वनांत गेला असताना त्याला तहान लागली. एका ऋषींच्या आश्रमांत गेल्यावर त्याने स्वतः राजा असल्याने अहंकाराने पाणी आणण्यासाठी मोठ्या आवाजात आज्ञा दिल्याच्या स्वरात आरोळी दिली. ध्यानात मग्न असलेल्या ऋषींच्या ध्यानामध्ये व्यत्यय आला म्हणून त्यांनी राजाला तो गाढव बनेल असा शाप दिला. तसेच विंध्य पर्वतावर एक असुर होता. ह्या पर्वतावर वसती करून असलेल्या अगस्त्य ऋषींकडे जे भेटायला येत त्यांना तो त्रास द्यायचा. अगस्त्य ऋषींनी त्याला तो गाढव होईल म्हणून शाप दिला. सिंघध्वज राजा आणि हा असुर हे दोघेही गाढव म्हणून जन्माला आले आणि ते दोघेही एका व्यापाऱ्याच्या घरी राहून त्याची सेवा करत होते. एकदा ह्या दोन गाढवांनी इथल्या ब्रह्म तीर्थाचं पाणी प्यायलं. त्यामुळे त्यांना आपल्या पूर्व जन्माची स्मृती झाली आणि ते दोघेही मनुष्य वाणीमध्ये एकमेकांशी बोलू लागले. हे बघून तो व्यापारी पळून गेला. ह्या दोन गाढवांनी ह्या मंदिरात भगवान शिवांची उपासना करून भगवान शिवांची कृपा प्राप्त केली. त्यांना आकाशवाणीने सुचविले कि आडी ह्या तामिळ महिन्याच्या चतुर्थीला त्यांनी ब्रह्म तीर्थातल्या पाण्याचं प्राशन करावं जेणेकरून त्यांना आपले मूळ स्वरूप प्राप्त होईल. त्या गाढवांनी तसे केले आणि त्यांना आपले मूळ रूप प्राप्त झाले.
३. पुराणानुसार अगस्त्य ऋषींनी इथे तपश्चर्या केली. भगवान शिव त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी अगस्त्य ऋषींना भगवान शिवांच्या विवाहामध्ये सहभागी होण्याचा तसेच भगवान शिवांचे तांडव नृत्य बघण्याचा आशीर्वाद दिला. ह्या नृत्यामध्ये भगवान शिवांचा डावा पाय जमिनीवर तर उजवा पाय वरती आहे. असा समज आहे की ह्या नृत्याच्या समयी भगवान महाविष्णूंनी डमरू वाजवला, श्री ब्रह्मदेवांनी ताल धरला, श्री महालक्ष्मींनी टाळ्या वाजवल्या, श्री सरस्वती देवींनी वीणावादन केलं, श्री इंद्रदेवांनी बासरी वाजवली आणि श्री मुरुगन आणि श्री विनायकांनी गायन केलं. अगस्त्य ऋषी, पतंजली ऋषी आणि व्याघ्रपाद ऋषी ह्यांनी हे नृत्य बघितलं. रथयात्रेमधल्या मूर्ती हे दृश्य दर्शवितात. ह्या मूर्ती मुख्य मंडपामध्ये आहेत.
४. असा समज आहे की श्री कुबेर ह्यांनी अक्षय तृतीयेला इथे दर्शन घेण्यासाठी भेट दिली आणि त्यांना संपत्तीचे नऊ घट प्राप्त झाले. ह्या घटांमध्ये संगनिधी (शंख) आणि पद्मनिधी होते. म्हणून इथे भगवान शिवांना श्री अक्षयलिंगेश्वरर असे संबोधले जाते.
५. पुराणानुसार एकदा श्री ब्रह्मदेवांची सृष्टिनिर्मितीची शक्ती लोप पावली. ते इथे आले आणि त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण केलं. ह्या तीर्थामध्ये स्नान करून श्री अक्षयलिंगेश्वरर ह्यांची उपासना केल्यावर त्यांना परत हि शक्ती प्राप्त झाली.
६. श्री इंद्रदेवांनी इथे तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्यांचं पापक्षालन झालं.
७. एकदा मार्कंडेय ऋषी त्यांची नित्य पूजा करत असताना प्रलय आला. आकाशवाणीने ऋषींना इथे येऊन श्री केडिलीयप्पर ह्यांची पूजा करण्याची सूचना दिली. ऋषी इथे आले आणि त्यांनी पूजा केली. असा समज आहे की प्रलयामध्ये ह्या स्थानाला काही बाधा होणार नाही.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री मुरुगन, श्री इंद्रदेव, श्री कुबेर, श्री अग्निदेव, श्री वायुदेव, श्री यमदेव, श्री चंद्रदेव, नवग्रह, अगस्त्य ऋषी, वसिष्ठ ऋषी, मार्कंडेय ऋषी, शैव संत अप्पर आणि संबंधर.
वैशिष्ट्ये:
१. हे मंदिर भव्य आणि सुंदर आहे.
२. गाभाऱ्यामध्ये दोन बाजूबाजूला विमानं (गोपुरं) आहेत. एक भगवान शिवांचं तर दुसरं श्री सोमस्कंदर ह्यांचं आहे.
३. भगवान शिवांच्या देवालयाचे शिखर ग्रॅनाईटचे आहे.
४. श्री वीणादक्षिणामूर्ती, श्री भिक्षादनर आणि श्री काटची-अलिथ-नायकर (भगवान शिव ज्यांनी दर्शन दिलं) ह्यांच्या मूर्ती खूप सुंदर आहेत.
५. असा समज आहे की थिरुचेन्दूर येथील श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आणि इथली मूर्ती ह्या दोन्ही मूर्ती एकाच मुर्तीकाराने बनवल्या आहेत.
६. अंजु-वत्तथू-अम्मन कोविल भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
७. श्री भद्रकाली आणि भव्य नंदी ह्यांच्या मूर्ती वाळूच्या (तामिळ मध्ये सुधै) आहेत.
८. श्री नटराजांची मूर्ती अद्वितीय आहे.
९. संत मुथुस्वामी दीक्षितर ह्यांनी ह्या मंदिराची थोरवी गायली आहे.
१०. इथले शिव लिंग छोटे असून ते मोठ्या पायथ्यावर (अवूदयार) आहे.
११. इथे याली (पौराणिक सिंह) ह्या प्राण्याची सुंदर शिल्पे आहेत.
१२. नवग्रह देवालयामध्ये सर्व ग्रह तीन रांगांमध्ये असून ते सर्व गाभाऱ्याकडे मुख करून आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर भव्य असून ह्याला सात स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू असून एकवीस फूट उंच आहे ज्याच्या बहुतांश भागाची रचना स्तरीय आहे. तामिळ मध्ये भगवान शिवांना केडिलीयप्पर असे संबोधले जाते (तामिळ मध्ये केडी म्हणजे नाश किंवा पाप). म्हणजे नाश किंवा पापांपासून रक्षण करणारे भगवान शिव.
नंदींच्या जवळ ध्वजस्तंभ आणि बलीपीठ आहेत. गाभाऱ्यावरचे शिखर दगडी आहे.
श्री दक्षिणामूर्तींना इथे श्री वीणादक्षिणामूर्ती असे संबोधले जाते. ते बैठ्या मुद्रेमध्ये आहेत.
कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री वीणादक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव, श्री महाविष्णू आणि श्री नटराज. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्या दोघांचीही देवालये पूर्वाभिमुख आहेत. ह्या देवालयांची रचना वधुवर रचनेसारखी आहे.
कोष्ठाच्या खालच्या पातळीवर श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री दुर्गादेवी आहेत.
बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - श्री गणेश, अगस्त्य ऋषी, श्री गजलक्ष्मी देवी, श्री जम्बुकेश्वरर, श्री कैलासनाथर, श्री ब्रगथेश्वरर, श्री अन्नमलयार, श्री एकांबरेश्वरर, श्री चोळेश्वरर, नवग्रहांमध्ये सर्व ग्रह तीन रांगांमध्ये असून ते भगवान शिवांकडे मुख करून आहेत, ६३ नायनमार, अंजु-वत्तथू-अम्माई, श्री काळहस्तीश्वरर, श्री विश्वनाथर, श्री अष्टभुजाभैरव, श्री ज्वरदेवर, श्री वेंकटाचलेश्वरर, श्री आंजनेय, श्री काळींचें स्टुक्कोचे चित्र (म्हणून फक्त पुनुगू आणि सांबरानी ह्यांचा लेप लावला जातो).
श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र देवालय आहे.
ह्याशिवाय पुढील मूर्ती पण आहेत - श्री बद्रीविनायक, श्री मुरुगन, श्री नटराज आणि श्री सोमस्कंदर, श्री लक्ष्मीविनायक, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री कुबेर, श्री काशीविश्वनाथ, श्री महालक्ष्मी, श्री इंद्रदेव, श्री नर्दनगणपती, श्री कल्याणसुंदरेश्वरर, श्री चंडिकेश्वरर.
श्री नटराज ह्यांची मूर्ती अद्वितीय आहे. त्यांना दहा हात आहेत. त्यांचा डावा पाय मुयलागनवर आहे. मदुराई मध्ये त्यांचा उजवा पाय मुयलागनवर आहे.
क्षेत्र वृक्षाच्या खाली शिव लिंग आहे. असा समज आहे की हे शिव लिंग अगस्त्य ऋषींनी पुजीलेलं आहे.
अंजु-वत्तथू-अम्मन ह्या श्री भद्रकाळींच्या रूपाची मूर्ती ह्या मंदिरात आहे. असा समज आहे कि त्या आपल्या भक्तांचं संकटात रक्षण करतात. स्थळ पुराणानुसार त्यांनी एकदा आकाशात पांच वेळा फिरून नृत्य केलं. असा समज आहे की त्या भक्तांचं प्रवासामध्ये रक्षण करतात.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे पापक्षालनासाठी प्रार्थना करतात.
२. हे स्थळ पितृ दोष तसेच सर्व दोष निवारणासाठी परिहार स्थळ आहे.
३. भाविक जन प्रवास चालू करण्याआधी इथे अंजु-वत्तथू-अम्मन ह्यांची पूजा करतात.
पूजा:
रोज सहा पूजा केल्या जातात. तसेच नियमित प्रदोष पूजा, संकटहर चतुर्थी पूजा आणि पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): ऋषभ वाहन समवेत ब्रह्मोत्सव, सप्तस्थान उत्सव
आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक आणि स्कंदषष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर -डिसेम्बर): थिरुकार्थिगई तसेच प्रत्येक सोमवारी पूजा
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव)
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ९
मंदिराचा पत्ता:
श्री अक्षयलिंगेश्वरर स्वामी मंदिर,
ऍट पोस्ट किळवेलूर,
तामिळ नाडू ६१११०४
दूरध्वनी: +९१-५३६६२७६७३३
पुजाऱ्याचा दूरध्वनी: श्री बालसुब्रह्मण्य गुरुक्कल +९१-९६८८६२२६१८