हे शिव मंदिर कुंभकोणम-मन्नारगुडी मार्गावर कुंभकोणमपासून ५ किलोमीटर्स वर, मयीलादुथुराई पासून ३९ किलोमीटर्सवर, थिरुवारुर पासून ३६ किलोमीटर्सवर आहे. महामाघम उत्सवाच्या निगडित असलेल्या बारा शिव मंदिरांपैकी हे सातवं मंदिर आहे. प्रलयातून वाहत आलेल्या कुंभाचा मध्यभाग इथे पडला आणि पुढे शिव लिंगात रूपांतरित झाला. हे मंदिर आदीकुंभेश्वरर सप्तस्थानांशी पण निगडित आहे. तामिळनाडूमधल्या साक्कोटाई येथे हे मंदिर स्थित आहे. पूर्वी ह्या स्थळाचे नाव कलयनल्लूर असे होते. हे मंदिर साधारण १५०० वर्षं जूनं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. राजराजेश्वर चोळा राजाने ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती केली. नायक आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. कुलोथंग चोळा III ह्या राजाने ह्या मंदिराची पुनर्निमिती केली. ६३ नायनमारांपैकी सक्कीया नायनार ह्यांचा ह्या मंदिराशी निकटचा संबंध होता. हे मंदिर कोट्टैशिवन कोविल ह्या नावानेपण प्रसिद्ध आहे. असा समज आहे की पूर्वी ह्या मंदिराच्या भोवताली किल्ले आणि कालवे (तामिळ मध्ये अगळी) होते. पण आता फक्त शेष उरले आहेत. असा समज आहे की पूर्वी इथे बुद्ध धर्माचे संन्यासी (ज्यांना सक्कीया असे म्हणतात) वस्ती करून होते. म्हणून ह्या स्थळाला सक्कीयाकोट्टै असे नाव प्राप्त झाले. कालांतराने ते साक्कोटाई असे झाले.
मूलवर: श्री अमृतकलशनाथर, श्री अमृतकडेश्वरर
देवी: श्री अमृतवल्ली
उत्सव मूर्ती: श्री अमृतकलशनाथर
पवित्र तीर्थ: नंगूवेद तीर्थ
पुराणिक नाव: थिरुकलैनल्लूर
पवित्र वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)
क्षेत्र पुराण:
हे मंदिर प्रलयाशी तसेच महामाघम तीर्थाच्या निर्मितीशी निगडित आहे. ह्या ठिकाणी कुंभाचा मध्य भाग पडला आणि त्याचे शिव लिंगात रूपांतर झाले
हिंदू धर्मातली प्रत्येक व्यक्ती पापनिरसन होण्यासाठी प्रार्थना करत असते. पापनिरसन करणाऱ्या क्षेत्रांबद्दल अशी एक जुनी समजूत आहे कि एका क्षेत्रामध्ये केलेल्या पापाचं निरसन पुण्य क्षेत्राला भेट देऊन आणि तिथे प्रार्थना करून होतं. पुण्य क्षेत्रामध्ये पाप घडलं असेल तर त्याचं निरसन वाराणसी मध्ये जाऊन आणि तिथे प्रार्थना करून होतं. वाराणसी मध्ये पाप घडलं असेल तर तर त्याचं निरसन कुंभकोणमला भेट देऊन आणि तिथे प्रार्थना करून होतं. पण कुंभकोणममध्ये घडलेल्या पापाचं निरसन मात्र फक्त कुंभकोणममध्ये प्रार्थना करुनच होतं. ह्यातून कुंभकोणम ह्या स्थळांचं महत्व कळतं.
जेव्हा युगाअंती अधर्म जेव्हा पराकोटीला पोचतो तेव्हा नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी भगवान शिव महाप्रलय घडवून आणतात. आणि तसेच ते नवीन सृष्टी निर्माण करण्यामध्ये मदत पण करतात.
एकदा प्रलय होण्याआधी ब्रह्मदेवांना अशी शंका आली की सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारी सर्व बीजे नष्ट झाली तर मग सृष्टीनिर्मिती कशी करायची. त्यावेळी भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना बीजांचं रक्षण कसं करायचं हे सांगितलं तसंच प्रलयाच्या अंती सृष्टिनिर्मिती कशी करायची ह्याचं पण ज्ञान दिलं. त्यांनी ब्रह्मदेवांना अमृत आणि माती ह्यांचं मिश्रण करून त्यापासून एक कलश निर्मायला सांगितलं. आणि त्यामध्ये अमृत आणि सृष्टीनिर्मितीला आवश्यक सर्व बीजे कलशामध्ये पेरायला सांगितली. त्या कलशाच्या चारी बाजूंना वेद, पुराणे, आगमशास्त्रे पसरायला सांगितली. त्या कलशाच्या तोंडाशी पांच आंब्याची पाने ठेवून त्या वरती नारळ ठेवण्यास सांगितले जेणेकरून त्याला कलशाचा आकार येईल. तसेच तो कलश बंद करण्याआधी त्या कलशाला एक यज्ञोपवीत (जानवे) गुंडाळण्यास सांगितले. त्या तयार झालेल्या कलशाला भगवान शिवांनी मेरुपर्वताच्या शिखरावर जेथे ब्रह्मदेवांचे वसतिस्थान आहे तिथे ठेवावयास सांगितले आणि त्याला दर्भाच्या दोरीने छतास टांगावयास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या कलशाची बिल्वपत्र आणि फुलांनीं पूजा करण्यास सांगितले. आणि त्या कलशावर अमृताचा शिडकाव करून पवित्र करण्यास सांगितले. भगवान शिव म्हणाले कि प्रलयाच्या वेळेस हा कलश वाहत जाऊन एका स्थळी थांबेल. आणि मग भगवान शिव स्वतः किराटमूर्तींच्या (शिकारी) रूपात येऊन तो कलश फोडतील जेणेकरून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती परत चालू करू शकतील.
ब्रह्मदेवांनी भगवान शिवांच्या सर्व सूचनांची अचूक अंमलबजावणी केली. पुढे जेव्हा प्रलय आला त्यावेळी निसर्गाच्या कोपाची पराकाष्ठा झाल्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली. मेरू पर्वत पण प्रलयामध्ये बुडून गेला. तो कलश वाहत वाहत दक्षिणेकडे जाऊ लागला आणि एका स्थळी जाऊन थांबला. जसजसं प्रलयाचे पाणी ओसरायला लागले तसतसं कलशाच्या भोवतीचे दर्भ, आंब्याची पाने, बिल्व पत्रे हे कलशापासून अलग झाले. ज्या ठिकाणी आंब्याची पाने पडली त्या ठिकाणी तिथे शमी वृक्ष प्रगटला तसेच कलशाच्या भोवती गुंडाळलेल्या दर्भामधून शिव लिंग निर्माण झाले. ज्या ठिकाणी बिल्व पत्रे पडली त्या ठिकाणी बिल्व वन तयार झाले. तसेच सप्त मातृका देवी प्रकट झाल्या आणि त्या स्थळाच्या रक्षक बनल्या. दर्भापासून निर्माण झालेल्या लिंगाचे नाव दर्भ लिंग असे झाले. हे सगळं समुद्राच्या पश्चिम दिशेला घडलं. त्यानंतर कलश वायव्य दिशेला सरकायला लागला आणि मग ह्या ठिकाणी जागी स्थिर झाला. इथे कलश स्थिर झाला म्हणून ह्या स्थळाला कुंभकोणम असे नाव प्राप्त झाले. कलशाच्या भोवतील गोष्टी पडायला सुरुवात झाली. जिथे कलशाला धरून असलेले जानवे थांबले तिथे शिव लिंग निर्माण झाले. त्या शिव लिंगाचे नाव श्री सोमेश्वरर असे आहे. जिथे जानवे पडले तिथे लिंग निर्माण झाले. त्याचे नाव गौतमेश्वरर असे आहे. जिथे बिल्व पत्रे पडली तिथे लिंग निर्माण झाले त्याचे नाव नागेश्वरर असे झाले. नारळाचे पण शिव लिंगात रूपांतर झाले. ह्या स्थळाचे नाव नल्लिकेश्वरम असे झाले आणि शिव लिंगाचे नाव अभिमुक्तेश्वरर असे झाले. शेवटी बीजे असलेला कलशच उरला. श्री ब्रह्मदेवांनी ह्या कलशामधली बीजे सृष्टीनिर्मितीसाठी उपलब्ध होण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिव किराटमूर्तिस्वरूपांत आले आणि त्यांनी आपल्या बाणांनी कलश फोडला. कलश फुटला आणि त्यातील गोष्टी विविध ठिकाणी पडल्या. ह्या सर्व ठिकाणी शिव लिंग निर्माण झाले आणि प्रत्येक ठिकाणी कालांतराने शिव मंदिर बांधले गेले.
श्री आदिकुंभेश्वरर मंदिर: ह्या स्थळी अमृत कलश थांबला. असा समज आहे की भगवान शिवांनी स्वतः इथे माती आणि अमृत ह्यांच्या मिश्रणाने शिवलिंग तयार केले. ह्या लिंगाचा आकार कलशाच्या गळ्यासारखा आहे. भगवान शिवांनी ह्या लिंगाची उपासना केली.
श्री सोमेश्वरर मंदिर: इथे कलशाला गुंडाळलेले जानवे थांबले आणि त्यातून एक शिव लिंग निर्माण झाले.
श्री नागेश्वरर मंदिर: इथे बिल्व पत्रे पडली आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
श्री अभिमुक्तेश्वरर मंदिर: इथे कलशावरचा नारळ पडला आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
श्री गौतमेश्वरर मंदिर: इथे कलशाला गुंडाळलेले जानवे (उपवित) पडले आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
श्री कोणेश्वरर मंदिर: इथे कलशाची कडा पडली आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
साक्कोटाई येथील श्री अमृतकलशनाथर मंदिर: इथे कलशाचा मध्यभाग पडला. ह्या स्थळाला कलयनल्लुर असे पण म्हणतात. तामिळमध्ये कलशाच्या मध्य भागाला कलय म्हणतात.
श्री बाणपुरीश्वरर मंदिर: ह्या स्थळी भगवान शिवांनी आपल्या बाणांनी कलश फोडला.
श्री आदिकंपट्टा विश्वनाथर मंदिर: इथे कलशातली फुले पडली आणि त्यांचे रूपांतर शिवलिंगामध्ये झाले. ह्या स्थळी मालती फुलं विपुल प्रमाणात होती म्हणून ह्या स्थळाला पूर्वी मालती वनम असे नाव होते.
श्री कालहस्तीश्वरर मंदिर: इथे कलशातील चंदन पडले आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
श्री एकांबरेश्वरर मंदिर: जिथे कलशाचे उर्वरित भाग पडले आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
श्री कोट्टाईयूर कोडेश्वरर मंदिर: इथे कलशातल्या अमृताचे काही थेम्ब पडले आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले.
२. साक्कोटाई: संत सक्कीया हे कट्टर शिव भक्त होते. ते बुद्ध साधुंसारखा पोशाख परिधान करून भगवान शिवांची पूजा करायचे. मंदिराच्या मार्गावर ते एका दगडाची पूजा करायचे आणि फुलांऐवजी दगड अर्पण करायचे. एक दिवस जेवण करायच्या आधी ते पूजा करायला विसरले. ते जिथे दगडाची पूजा करायचे तिथे धावत गेले. ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा कैलासातले दगड त्यांच्या पायावर पडायला लागले. श्री पार्वती देवी आणि भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिले. भगवान शिवांनी त्यांना नायनमारांमध्ये समाविष्ट केलं म्हणून त्यांना सक्कीयानायनार असं संबोधलं जातं. इथे सक्कीयांनी भगवान शिवांची पूजा केली म्हणून ह्या स्थळाला साक्कोटाई असं नाव प्राप्त झालं.
३. श्री पार्वती देवींनी इथे तपश्चर्या केली आणि भगवान शिवांशी विवाह केला. म्हणून इथे त्यांची मूर्ती आहे ज्याचे नाव तपस्याअम्मन असे आहे.
४. इथे कलशाचा मध्य भाग पडला म्हणून ह्या स्थळाला कलयनल्लुर असे नाव प्राप्त झाले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: श्री ब्रह्म, सक्कीयानायनार, श्री शनीश्वरर
वैशिष्ट्ये:
१. हे महामाघम उत्सवाशी निगडित मंदिर आहे.
२. श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती अलौकिक आहे.
३. इथले शिव लिंग हिरव्या ग्रॅनाईटचे आहे.
४. श्री पार्वती देवींची मूर्ती अलौकिक आहे आणि अशी मूर्ती दुसऱ्या कुठल्या मंदिरांत दिसत नाही.
५. सप्त मातृका एका शिळेमध्ये कोरल्या आहेत.
६. इथे श्री अर्धनारीश्वरांची मूर्ती अलौकिक आहे. ह्या मूर्तीमध्ये ते उजव्या पायावर उभे आहेत असे दर्शित केले आहे.
७. इथले शिव लिंग मातीचे आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला एक परिक्रमा आणि तीन स्तरांचं राजगोपुर आहे. प्रवेशद्वारावर रस्त्याच्या बाजूला एक कमान आहे. ह्या कमानीवर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी आणि त्यांच्या समवेत श्री गणेश आणि श्री मुरुगन असे शिल्प आहे. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. राजगोपुराच्या पुढ्यात नंदी आणि बलीपीठ आहेत. ह्या शिवाय मंडपामध्येपण नंदी आणि बलीपीठ आहेत. गाभारा शिव लिंगाच्या आकाराचा आहे. शिव लिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या आवाराच्या भिंतींच्या आत आणि बाहेर खंदक आहेत. इथे एक मंडप आहे ज्याचे नाव नायक्कर मंडप असे आहे. उत्तरेकडे श्री अंबिका देवींचे दक्षिणाभिमुखी देवालय आहे. महामंडपाच्या प्रवेशाशी श्री दंडपाणी आणि श्री नर्दन विनायकर ह्यांच्या मूर्ती आहेत. शिव लिंगाच्या पुढ्यात नंदी आणि बलीपीठ त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहेत. मंडपाचा आकार वटवाघुळाच्या (तामिळ मध्ये वोवळ) कपाळासारखा आहे. म्हणून ह्या मंडपाला वोवळ मंडप असे नाव आहे. मंडपामध्ये श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांची वधू-वर पोषाखातली मूर्ती आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री अर्धनारीश्वरर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी.
श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती अलौकिक आहे. त्यांना चार हात आहेत. त्यांच्या उजवीकडील वरच्या हातामध्ये रुद्राक्षमाला आहे, डावीकडील वरच्या हातामध्ये अग्नी आहे, उजवीकडील खालचा हात मुद्रेमध्ये आहे, डावीकडील खालच्या हातामध्ये तालवृक्षाची (मराठी मध्ये ताडवृक्ष) पाने आहेत. त्यांच्या डोक्यामागे प्रभावळ आहे. त्यांच्यामागे मोठं कल्लाळ वृक्ष आहे.
श्री लिंगोद्भवरांची मूर्ती हिरव्या ग्रॅनाइटची आहे. ही मूर्ती गाभाऱ्याच्या मागे असून तिच्या आजूबाजूला श्री महाविष्णू आणि श्री ब्रह्मदेव आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला त्रिमूर्तींचं दर्शन होतं. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती नेहमीच्या ठिकाणी आहे.
श्री अंबिका देवींची त्या तपश्चर्या करत आहेत अशी मूर्ती असलेले एक स्वतंत्र देवालय आहे. इथे त्यांचे नाव तपस्याअम्मन असे आहे. त्या उजव्या पायावर उभ्या आहेत आणि डावा पाय मांडीपर्यंत दुमडलेला आहे, उजवा हात माथ्यावर आहे आणि डावा हात पोटाशी आहे.
इथे अजून एक श्री अंबिका देवींचे देवालय आहे ज्यामध्ये त्यांना श्री अमृतवल्ली असे संबोधले जाते. हे देवालय महामंडपाच्या उत्तरेला आहे.
सप्त मातृका एका दगडामध्ये कोरल्या आहेत.
ह्याशिवाय इथे पुढील देवालये आहेत: नालवर, नवग्रह, वायूलिंग, पृथ्वी लिंग, थेयुलिंग, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रमण्यम, श्री गजलक्ष्मी, श्री भैरव, श्री भिक्षादनर, श्री चंद्र, श्री सूर्य, श्री शनीश्वरर, श्री राहू आणि सक्कीयानायनार.
प्रार्थना:
भाविक जन इथे ६०व्वा वाढदिवस (षष्ट्यब्दी पूर्ती), ७०व्वा वाढदिवस (भीमारथ शांती), ८०व्वा वाढदिवस (सदाभिषेक) साजरे करतात.
पूजा:
आगम नियमानुसार दैनंदिन पूजा, सोमवारी आणि शुक्रवारी पूजा, पाक्षिक प्रदोष पूजा तसेच मासिक पूजा (अमावस्या, पौर्णिमा आणि चतुर्थी) केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखम
आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री विनायकर चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी, अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महामाघम उत्सव, महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरम (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा)
मंदिराच्या वेळा: सकाळी ९ ते १२, संध्याकाळी ५ ते ७
मंदिराचा पत्ता:
श्री अमृतकलशनाथर मंदिर,
साक्कोटाई,
कुंभकोणम,
तामिळ नाडू ६१२४०१
दूरध्वनी: ४३५२४१४४५३, ९६९८४६०९८४