Sunday, February 15, 2026

सेथलपथी (थिरुथीलथैपथी) येथील श्री मधीमुक्तेश्वरर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून २५ किलोमीटर्स वर वसले आहे. कुथनूर येथील श्री सरस्वती मंदिराच्या हे खूप जवळ आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर (अरिसिलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या दक्षिण काठावर) वसले आहे. शैव संत संबंधर आणि अरुणागिरिनाथर ह्यांनी त्यांच्या रचनांमध्ये ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. अंत्यविधी जिथे केले जातात अशा विशेष सात स्थानांपैकी हे एक स्थान आहे. बाकीची सहा स्थाने अशी आहेत - काशी, रामेश्वर, गया, त्रिवेणी संगम, श्री वांचीअम आणि थिरुवेंगाडू. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती केली. कालांतराने नट्टूकोट्टै चेट्टीयार ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 

मूलवर: श्री मधीमुक्तेश्वरर, श्री मंदारवनेश्वरर
देवी: श्री स्वर्णवल्ली, श्री मरगदवल्ली, श्री पोरकोडीअम्माई
उत्सव मूर्ती: श्री सोमस्कंदर
क्षेत्र वृक्ष: मंदार वृक्ष
पवित्र तीर्थ: सूर्य पुष्करिणी, चंद्र तीर्थ, अरिसीलारू नदी, ब्रह्म तीर्थ
पुराणिक नाव: थिरुथीलथैपथी, टिलातरपंपूरी

क्षेत्र पुराण:

१. श्री ब्रह्मदेव स्वर्गीय अप्सरा उर्वशीच्या प्रेमात पडले. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना शाप दिला. ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी श्री ब्रह्मदेवांना पृथ्वीवर येऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा झाली. त्या आज्ञेप्रमाणे श्री ब्रह्मदेव ह्या स्थळी आले आणि त्यांनी शापविमोचनासाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना शापापासून मुक्त केलं. 

२. प्रभू श्रीराम आणि श्री लक्ष्मण ह्यांना वनवासात असताना त्यांना त्यांचे पिता श्री दशरथ ह्यांचा निधनाबद्दल ज्ञात झालं. त्यांनी विविध स्थळांमध्ये त्यांचे अंत्यविधी केले. ह्या सगळ्या स्थळांमध्ये अंत्यविधी करताना पिंडांचं रूपांतर किड्यांमध्ये झालं. प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांना ह्या समस्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवांनी त्यांना ह्या स्थळी येऊन नदीमध्ये स्नान करून मग पितृ तर्पण करण्याचा सल्ला दिला. जेव्हा प्रभू श्रीरामांनी भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार इथे पितृतर्पण केलं तेव्हां पिंडांचें रूपांतर शिवलिंगांमध्ये झालं आणि त्या पिंडांना मुक्ती मिळाली. म्हणून इथे भगवान शिवांना श्री मुक्तेश्वरर असं संबोधलं जातं.

३. स्थळ पुराणानुसार प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण ह्यांनी ह्या स्थळी जटायूचे अंत्यविधी केले.

४. श्री नरमुख विनायक - पुराणानुसार श्री पार्वती देवींनी एकदा हळदीपासून एक मुलगा तयार केला. त्यांनी त्या मुलाला सजीव केले. त्या हरीसोल (अरसीलारू) ह्या महानदीमध्ये स्नान करत होत्या आणि म्हणून त्यांनी त्या सजीव केलेल्या मुलाला आपल्या स्नानगृहाच्या बाहेर द्वारपाल बनून थांबायला सांगितले. जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा त्या मुलाने भगवान शिवांना आत जाण्यापासून थांबवले. म्हणून भगवान शिवांनी त्या मुलाचा शिरच्छेद केला. जेव्हा पार्वती देवींनी हे पाहिलं तेव्हा त्यांना खूप रडू आलं कारण तो मुलगा त्यांचा पुत्र होता. त्यांचं सांत्वन करण्यासाठी भगवान शिवांनी शिवगणांना अशा जीवाचं शिर आणण्याची आज्ञा केली जो झोपला आहे आणि ज्याचे शिर उत्तरेकडे आहे. शिवगणांना एक हत्ती सापडला. ते त्याचे शिर घेऊन भगवान शिवांकडे आले. भगवान शिवांनी ते शिर त्या मुलाच्या शरीराला जोडले आणि त्याला परत सजीव केले. त्यांनी त्याला गणांचा सेनापती नेमले आणि त्याचे नाव गणपती ठेवले. आणि त्याला असा वर दिला कि कुठल्याही कार्याची सुरुवात करण्याआधी त्याची पूजा केली जाईल. श्री पार्वती देवींनी निर्माण केलेला तो प्रथम गणेश असल्या कारणाने त्याला श्री आदि-नरमुख-विनायक असं संबोधलं जातं.

५. काशीचा राजा नरचोधी ह्याला आपल्या पितांचे अंत्यविधी करायचे होते. त्याला आपल्या पूर्वजांना पिंड (भाताचे गोळे) प्रत्यक्षरित्या अर्पण करायची इच्छा होती. त्याने विविध स्थळी पिंडदाने केली पण ती स्वीकारली गेली नाहीत. शेवटी त्याने जेव्हा ह्या स्थळी पिंडदाने केली तेव्हा त्याच्या पूर्वजांनी ती स्वीकारली. म्हणून हे स्थळ पिंडदान करण्यासाठी योग्य मानलं जातं. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री पार्वती देवी, श्री लक्ष्मीदेवी, श्री ब्रह्मदेव, श्री सूर्यदेव, श्री शनीश्वरर, ऐरावत हत्ती, राजा नरचोधी

वैशिष्ट्ये:

१. इथल्या श्री गणेशांच्या मूर्तीला नरमुख आहे.

२. ह्या मंदिरामध्ये श्री महाविष्णू तीन ठिकाणी तीन मुद्रांमध्ये चित्रित केले आहेत.

३. इथे श्री पार्वती देवींना स्वर्णवल्ली असे संबोधले जाते. 

४. इथल्या सर्व मूर्ती सुंदर आहेत विशषतः श्री दक्षिणामूर्ती, प्रभू श्रीराम, श्री दुर्गादेवी आणि श्री विष्णू.

५. असा समज आहे की श्री सूर्य आणि श्री चंद्र ह्यांनी इथे भगवान शिवांची एकाच वेळी पूजा केली. म्हणून इथे सर्व दिवस अमावस्या मानले जातात. म्हणून त्यांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात. म्हणून इथे सर्व दिवस पितृ तर्पणासाठी योग्य दिवस मानले जातात. 

६. इथल्या परिक्रमेच्या भिंतींवर ६३ नायनमारांची चित्रे आहेत.

७. असा समज आहे की इथे पितृ तर्पण केल्याने भगवान शिव पूर्वजांना मुक्ती प्रदान करतात. म्हणून भगवान शिवांना इथे श्री मुक्तेश्वरर असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला थिरुतर्पणपुरी असं संबोधलं जातं.

८. प्रभू श्रीरामांनी इथे जेव्हा तर्पण केलं तेव्हा त्यांनी माता, पिता, गुरु आणि देव अशी चार पिंडे केली. ही चार पिंडे शिवलिंगांमध्ये परिवर्तित झाली.

९. श्री अष्टभुजा देवीचा डावा पाय थोडासा पाठीमागे आहे.

१०. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्यदेव बाकीच्या ग्रहांपेक्षा थोड्या उंचावर आहेत.

११. ह्या ठिकाणी अरिसिलारू नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. म्हणून ह्या नदीला इथे उत्तरवाहिनी असे संबोधले जाते.

१२. असा समज आहे की जे इथे उपासना करतात ते वैभवशाली होतात.

मंदिराबद्द्ल माहिती:

हे मंदिर छोटं आहे पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथल्या राजगोपुराचे बांधकाम अगदी अलीकडेच झाले आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये प्रभू श्रीराम पितृतर्पण करत आहेत असे दृश्य चित्रित केलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या जवळ असलेल्या चार लिंगांना पितृ लिंग असे म्हणतात. इथले मुख्य दैवत श्री आदि-विनायक आहेत. त्यांना नरमुख-विनायक (नराचे मुख असलेले श्री गणेश). त्यांचे स्वतंत्र देवालय आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवान शिव स्वयंभू आहेत आणि द्वितल विमानाच्या (दोन स्तरांचे गोपुर) खाली आहेत. 

कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री अष्टभुजा-दुर्गा देवी. 

भगवान शिवांच्या उजव्या बाजूला श्री अंबिकादेवींचे देवालय आहे. 

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, श्री सुब्रमण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री गजलक्ष्मी, नवग्रह, श्री चंद्र, श्री सूर्य, श्री भैरव, शैव संत नालवर, श्री नटराज, प्रभू श्रीरामांनी पुजीलेलं शिव लिंग, श्री काशी विश्वनाथ, श्री शिवगामींसमवेत श्री नटराज, 

क्षेत्र वृक्षाखाली श्री मंदारवनेश्वरर आहेत. 

ह्या मंदिरात श्री महाविष्णूंच्या तीन ठिकाणी तीन विविध मुद्रा असलेल्या मूर्ती आहेत.

प्रार्थना:

१. हे स्थळ पितृदोषांचे परिहार स्थळ असल्याकारणाने भाविक जन इथे पितृ तर्पण करतात.

२. समृद्धी साठी भाविक जन इथे श्री स्वर्णवल्ली देवींची पूजा करतात.

पूजा:

दररोज ४ वेळा पूजा केली जाते. तसेच प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी आणि प्रदोष दिवशी पूजा केली जाते. 

मंदिरात साजरे होणारे सण:

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रा दिवशी पूजा)
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्रदर्शन
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासीमाघम 

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता

श्री मधीमुक्तेश्वरर मंदिर,
सेथलपथी (पुंथोट्टम),
तालुका:नन्नीलम,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३

दूरध्वनी: ०४३६६-२३९८१८, ९४४२७१४०५५

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment