हे शिव मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर असलेल्या थिरुपांपूरं ह्या गावात वसले आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी आपल्या काव्यांमध्ये इथल्या भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे मंदिर चोळा साम्राज्याच्या राजांनी ६व्या शतकाच्याही आधी बांधलं असावं. वर्तमान बांधकाम साधारण १३०० वर्षे जुनं आहे. इथे २८ शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, पांड्या आणि मराठा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामाचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.
मूलवर: श्री शेषपुरीश्वरर, श्री पाम्बीसर, श्री पांपुरेश्वरर (तामिळ मध्ये पांपु म्हणजे नाग किंवा साप)
देवी: श्री ब्रम्हाम्बिका, श्री मामलयत्ति, श्री वंदूपुंकुळली
क्षेत्र वृक्ष: शमी वृक्ष
पवित्र तीर्थ: आदिशेष तीर्थ, नाग तीर्थ
पुराणिक नाव: शेषपुरी, थिरुपांपूरं, पम्पारनंनगर
क्षेत्र पुराण:
१. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंखपाल, कुलीग, पद्म, महापद्म हे अष्टनाग आहेत. एकदा भगवान विष्णू भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान शिवांच्या गळ्यातील वासुकी नागाच्या मनात अभिमान जागृत झाला. त्याला असं वाटलं भगवान विष्णू त्याची पण पूजा करत आहेत. भगवान शिवांना ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी सर्व नागांना शाप दिला कि त्यांची विषशक्ती लोप पावेल. तेव्हा अष्टनाग भगवान शिवांकडे आले आणि त्यांनी विनंती केली कि केवळ एका नागाच्या चुकीमुळे सर्व नागांना त्याचा परिणाम भोगायला लागू नये. त्यांनी भगवान शिवांना ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना पृथ्वीवर जाऊन महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहारांमध्ये चार ठिकाणी - कुंभकोणम, थिरुनागेश्वरम, थिरुपांपूरं आणि नागोर - पूजा करण्याचा सल्ला दिला. आदिशेषांच्या नेतृत्वाखाली हे अष्टनाग पृथ्वीवर आले आणि त्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार भगवान शिवांची चार ठिकाणी पूजा करून शापापासून मुक्ती मिळविली. आदिशेषांनीं श्री शेषपुरिश्वरांची महाशिवरात्रीच्या रात्री तिसऱ्या प्रहरामध्ये पूजा केली. त्या रात्री पूजा करण्यासाठी फुले उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी वडाच्या झाडाला अगस्तीची फुले बांधून त्याची पूजा केली. असा समज आहे की अष्टनागांनी दर महाशिवरात्रीला इथे पूजा केली. इथल्या स्थानिक लोकांच्या समजूतीनुसार अगस्ती फुले हि परत फुलत नाहीत आणि वडाच्या झाडाची देठे जमिनीला टेकत नाहीत आणि ह्या काळात ते आधार देतात.
२. असा समज आहे की गंगादेवी तुला ह्या तामिळ महिन्यामध्ये इथे आल्या आणि त्यांनी कार्थिगई महिन्यामध्ये कुंभकोणम इथे येऊन महामागम तीर्थामध्ये स्नान केलं. गंगेमध्ये सर्वजण आपली पापे धुवायला स्नान करतात जी अर्थातच गंगादेवी आपल्यामध्ये शोषून घेतात. म्हणून गंगादेवींनी इथे स्नान केल्यामुळे त्यांनी शोषून घेतलेल्या पापांचं क्षालन झालं.
३. दक्ष राजाने भगवान शिवांचा अपमान केल्याने वीरभद्रांनी त्याचा शिरच्छेद केला. पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी दक्षाच्या शरीराला मेंढीचे शीर लावून त्याला सजीव केलं. इथल्या स्थळ पुराणानुसार मेंढीचे शीर असलेला दक्ष राजा इथे आला आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे त्याच्या पापांचे क्षालन झाले.
४. कोचेंगट चोळा राजाला रक्ताचा कर्करोग झाला होता. त्याने इथे येऊन इथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे तो बरा झाला.
५. एका आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही आदिशेष आणि वायुदेव ह्यांच्यामधल्या द्वंद्वाबद्द्ल उल्लेख केला होता. त्यांच्या द्वंद्वामुळे सर्व देव त्रासले होते. शेवटी इंद्रदेवांच्या नेतृत्वाखाली सर्व देव आदिशेषांकडे आले आणि त्यांनी त्यांना हे द्वंद्व थांबविण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण वायुदेवांनी द्वंद्व चालूच ठेवलं. भगवान शिवांना ह्याचा राग आला आणि त्यांनी दोघांना मेंढी होण्याचा शाप दिला. जेव्हा त्या दोघांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली तेव्हा भगवान शिवांनी वायुदेवांना वैगाई नदीच्या उत्तरेला आणि मदुराईच्या पूर्वेला असलेल्या स्थळी तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांना भगवान शिवांनी १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांनी एक पवित्र तीर्थ निर्माण केलं आणि १२ वर्षे तपश्चर्या करून ते शापापासून मुक्त झाले.
६. पुराणानुसार आदिशेष हे सर्व विश्वाचा भार आपल्या माथ्यावर घेतात. एकदा त्यांना हा भार सहन न होऊन ते आजारी पडले. भगवान शिवांना त्यांनी ह्यावर उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना महाशिवरात्रीच्या रात्री कुंभकोणम येथील नागेश्वर मंदिरात तसेच इथल्या नागनाथर मंदिरामध्ये उपासना करण्याची आज्ञा दिली. तसे करून आदिशेष स्वस्थ झाले.
७. सुनीथन ह्या काशीच्या राजाला वशिष्ठ ऋषींनी स्वप्नांत येऊन ह्या स्थळी येऊन भगवान शिवांची पूजा करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे पूजा करून सुनीथन अपस्मारापासून मुक्त झाला.
८. श्री ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा ह्या स्वर्गीय अप्सरेला निर्माण केले. तिलोत्तमा श्री ब्रह्मदेव आपले पिता आहेत असे मानून त्यांच्याकडे गेली. पण ब्रह्मदेव तिच्यावर मोहित झाले. तिलोत्तमाने भगवान शिवांकडे धाव घेतली. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना त्यांची सृष्टी निर्माण करण्याची शक्ती लोप पावेल असा शाप दिला. ऋषीमुनी आणि भगवान शिवांच्या सल्ल्याने श्री ब्रह्मदेव ह्या स्थळी आले. त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण करून एक वर्ष इथे तपश्चर्या केली आणि ते शापापासून मुक्त झाले.
९. श्री इंद्रदेवानी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्या बरोबर गैरवर्तन केले म्हणून गौतम ऋषींनी इंद्रदेवांना शाप दिला कि त्यांच्या शरीरावर १००० नेत्र निर्माण होतील. ह्या शापापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेवरून इंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. भगवान शिवांनी शिवरात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं.
१०. एकदा खेळीमेळीच्या मनःस्थितीमध्ये श्री उमादेवींनी भगवान शिवांच्या डोळ्यावर आपले हात ठेवून ते बंद केले. त्यामुळे सर्व विश्वामध्ये अंधार झाला आणि विश्वातलं सर्व जीवन थांबलं. ह्या कृत्याबद्दल भगवान शिवांनी उमादेवींना त्यांच्यापासून विभक्त व्हायला सांगितलं. ह्या चुकीचा परिहार करण्यासाठी भगवान शिवांनी उमादेवींना ह्या स्थळी येऊन १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. उमादेवींनी इथे १२ वर्षे तपश्चर्या केली. आणि भगवान शिवांनी त्यांना शिवरात्रीच्या चौथ्या प्रहरी दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं.
११. एकदा कैलासावर अगस्त्य ऋषी आणि इतर ऋषी ह्यांच्यामध्ये तामिळ आणि संस्कृत ह्यामध्ये श्रेष्ठ भाषा कुठली ह्यावर वाद उठला. अगस्त्य ऋषींचं दोन्ही भाषा समान पातळीवर आहेत असं मत होतं. पण इतर ऋषींना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी अगस्त्य ऋषींना मूक होण्याचा शाप दिला. भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोघेही अगस्त्य ऋषींशी सहमत होते पण त्यांनी ह्या वादामध्ये हस्तक्षेप केला नाही. अगस्त्य ऋषींनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना त्यांची एक वर्ष सेवा करण्याची आज्ञा दिली. अगस्त्य ऋषी इथे आले आणि त्यांनी एक वर्ष भगवान शिवांची सेवा केली. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरी भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं आणि त्यांची गेलेली वाचा त्यांना परत दिली. भगवान शिवांनी त्यांना पोडिगाई टेकडीवर जायला सांगितलं आणि तामिळ भाषेचा प्रसार करायची आज्ञा दिली.
१२. अग्निदेवांनी दक्ष यज्ञामध्ये सहभाग घेतला म्हणून वीरभद्रांनी त्यांना शिक्षा दिली. वीरभद्रांनी अग्निदेवांचे हात कापले आणि त्यांना लाथ मारली. अग्निदेवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन ३ वर्षे उपासना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे उपासना करून अग्निदेव पूर्ववत झाले.
१३. एकदा सूर्यदेवांनी नैमिषारण्यामध्ये येऊन ऋषींकडे त्यांच्या तेजाचा स्रोत कुठे आहे ह्याची चौकशी केली. ऋषींनी त्यांना व्यासमुनींकडे पाठवले. व्यासमुनींनी सूर्यदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करायला सांगितले. सूर्यदेव पहिल्यांदा काशीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. त्यानंतर त्यांनी मयीलादुथुराई येथे येऊन मयूरनाथर ह्यांची उपासना केली. त्यानंतर ते इथे आले आणि इथे त्यांनी १२ वर्षे रोज १००० फुले अर्पण करून भगवान शिवांची उपासना केली. १२ वर्षानंतर चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं कि त्यांचं तेज अबाधित राहील.
१४. पुराणानुसार बृहस्पती ऋषी जेव्हा त्यांच्या आश्रमात नव्हते तेव्हा चंद्र देवांनी बृहस्पती ऋषींची पत्नी वनतारा हिच्याशी अवैधरित्या संबंध जोडला. ह्या संबंधातून त्यांना बुध हा पुत्र झाला. बृहस्पतींनी चंद्राला क्षयरोग जडेल अशा शाप दिला. इंद्रदेव आणि इतर देवांनीं बृहस्पतींकडे चंद्रदेवांना शापापासून मुक्ती कशी होईल हि विचारणा केल्यावर बृहस्पतींनी चंद्रदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. चंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे दररोज १००० फुलांनी भगवान शिवांची उपासना केली. थै ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला त्यांची शापातून मुक्ती झाली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री पार्वती देवी, अगस्त्य ऋषी, श्री चंद्रदेव, दक्ष राजा, श्री गंगादेवी, श्री सूर्यदेव, श्री अग्निदेव, सुनीथन, कोचेंगट चोळा राजा, आदिशेष इतर सात नागांसमवेत.
वैशिष्ट्ये:
१. इथे राहू आणि केतूची एकच शरीर असलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये ते भगवान शिवांची हात जोडून पूजा करत आहेत. हे स्थळ राहू-केतू परिहार स्थळ आहे.
२. ह्या मंदिरामध्ये रविवारी आणि मंगळवारी सर्प हिंडताना दिसतात. असा समज आहे की ते भगवान शिवांची पूजा करण्यासाठी येतात.
३. असा समज आहे की ह्या मंदिराची पुढील मंदिरांबरोबर एकत्रित पवित्रता आहे - थिरुनागेश्वरम, नागोर, किळपेरूमपल्लम (केतू देवाचे मंदिर), कालहस्ती, कुंभकोणम येथील नागनाथर. म्हणून पुराणानुसार हे स्थळ सर्व-दिशा-निवारण-स्थळ आहे.
४. हे बहुतेक एकच मंदिर आहे जिथे आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे.
५. इथे गाभाऱ्यामध्ये आदिशेष भगवान शिवांची पूजा करत आहेत हे दृश्य अद्वितीय आहे.
६. इथे श्री पार्वती देवींची मूर्ती भगवान शिवांच्या डावीकडे आहे. ही विवाह मुद्रा दर्शवते.
७. इथे अनेक लोकांनी मोठ्या सर्पांना कात टाकताना बघितले आहे. ह्या दाव्याला पाठिंबा देणारी छायाचित्रे इथे आहेत. उदाहरणार्थ २१ मार्च २००२ दिवशी ७.५ फूट लांब सर्पाने श्री पार्वती देवींच्या मूर्तीवर कात टाकली. २६ मे २००२ला ८.३ फूट लांब सापाने भगवान शिवांवर कात टाकली. ह्या गावामध्ये सर्पाच्या दंशाने कोणी मृत्यू पावल्याची कुठेही नोंद नाही.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. इथे आणि राहू आणि केतूंची स्वतंत्र देवालये नाहीत. ते एकाच मूर्तीमध्ये आहेत आणि हात जोडून भगवान शिवांची प्रार्थना करत आहेत असे चित्रित केले आहे. त्यांचं एकच शरीर असल्याकारणाने हे राहूदोष आणि केतूदोष ह्या दोन्ही दोषांचे परिहार स्थळ आहे. ही मूर्ती मंदिराच्या ईशान्येला आहे. इथे एक पंचलिंग आहे जे भगवान शिवांच्या पांच मुखांचं प्रतीक आहे (ईशान, वामदेव, सद्योजात, तत्पुरुष, अघोर).
प्रवेशाजवळ थोडेसे विस्कळीत झालेले ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. ध्वजस्तंभाच्या पायाशी श्री विनायकांची मूर्ती आहे जिचे नाव श्री कोडीमार विनायक असे आहे. इथे थिरुमलै (कैलास ईश्वरर) ह्यांचे देवालय आहे. भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे आणि गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहे. इथले शिव लिंग छोटे आहे पण सुंदर आहे. गाभाऱ्यामध्ये आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे ज्यामध्ये ते भगवान शिवांची पूजा करत आहेत. महामंडपामध्ये पुढील उत्सव मूर्ती आहेत - श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री मुरुगन ज्यांच्या हातामध्ये वज्र आणि भाला आहे. अर्धमंडपाच्या उत्तरेला श्री दुर्गादेवींचे देवालय आहे. गाभाऱ्याच्या तीन बाजू खंदकाने आच्छादलेल्या आहेत.
कोष्ट मूर्ती: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री दुर्गादेवी
ह्याशिवाय इथे बऱ्याच नागांच्या मूर्ती आहेत.
श्री पार्वती देवींचे देवालय पूर्वाभिमुख असून भगवान शिवांच्या डाव्या बाजूला आहे. त्या आपल्या चार हातांनी भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांच्या चार हातांमध्ये कमल, वरद मुद्रा, अभय मुद्रा आणि रुद्राक्ष माला आहे.
इतर मूर्ती आणि देवालये:
माड कोविलमध्ये जशी रचना असते त्याचप्रमाणे इथे श्री दक्षिणामूर्ती कोष्टाच्या दक्षिण भागात आहेत. माड कोविल सारखच इथे पण पायऱ्या चढून श्री सट्टाईनाथर ह्यांचे दर्शन घ्यायला लागते. हि मूर्ती स्टुक्कोची आहे. श्री स्थळ विनायकांचे देवालय पश्चिम भागात आहे. त्यांना राजराजा पिल्लैयार असे संबोधले जाते. श्री सुब्रह्मण्य ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्यासमवेत त्यांच्या दोन पत्नी आहेत. श्री चंडिकेश्वरर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती मंदिराच्या कोपऱ्यात आहेत. इथले क्षेत्र वृक्ष २५० वर्षे जुने आहे. ह्या वृक्षाखाली पांच फणे असलेले आदिशेष आहेत. तसेच ह्या वृक्षाखाली मोरावर आरूढ झालेले श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे. वृक्षाच्या बुंध्यामध्ये श्री आदिपांपुरेश्वरर ह्यांची मूर्ती आहे जिला श्री वनेश्वरर असे पण संबोधले जाते. मंदिराच्या पूर्वेला पुढील मूर्ती आहेत - श्री भैरव, श्री सूर्य, श्री विष्णू, श्री ब्रह्म, पंचलिंगे, आदिशेष, राहू आणि केतू, श्री शनीश्वरर आणि शैव संत नालवर.
१२व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंतच्या अनेक मूर्ती इथे सुरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील काही मूर्ती अशा आहेत - श्री विनायक (ज्यांना श्री कन्नी विनायक असे संबोधले जाते), भगवान शिव आणि श्री पार्वती देवी, श्री नटराज, श्री सुब्रमण्य ह्यांच्या त्यांच्या पत्नींसमवेत दोन मूर्ती, भगवान शिवांची एक भव्य मूर्ती ज्यामध्ये ते उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि असूरसंहार करत आहेत, पालीयारै (शयनगृह) चोक्कर, श्री चंडिकेश्वरर, शैव संत नालवर, श्री योगशक्ती अंबिका, श्री चोळादेवर, श्री मरी अम्मन, श्री चेल्लीअम्मन, श्री आदिपांपुरेश्वरर आणि श्री सोमस्कंदर. ह्या सगळ्या मूर्ती महामंडपामध्ये आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे पुढील दोषांच्या परिहारासाठी प्रार्थना करतात - कालसर्पदोष, राहूकेतूदोष, कलत्र दोष, पुत्रदोष, विवाहातल्या अडचणी, कळत नकळत घडलेले सर्पहत्या दोष. जेव्हा सर्प हे वारंवार स्वप्नात येतात तेव्हा संध्याकाळी पांच च्या आत विशेष पूजा करतात.
२. भाविक जन इथे पुढील काळांमध्ये पूजा करतात - राहूमहादशा (१८ वर्षे), केतूमहादशा (७ वर्षे), लग्न राशीपासून दुसऱ्या किंवा आठव्या घरात राहू आणि केतू असताना आणि राहू आणि केतूची अंतर्दशा चालू असताना.
३. शांती आणि समृद्धीसाठी भाविक जन इथे भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींची पूजा करतात.
पूजा:
दररोज चार पूजा होतात. राहू आणि केतूच्या देवालयामध्ये राहुकाळामध्ये पूजा केली जाते. राहू आणि केतू एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात असताना विशेष पूजा केली जाते. ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा, पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी पूजा केल्या जातात.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
चित्राई महिन्यापासून पंगूनी महिन्यापर्यंत सर्व उत्सव इथे साजरे होतात - मुख्यत्त्वेकरून मासी महिन्यात मासीमाघम आणि महाशिवरात्री, मारगळी महिन्यात अरुद्रदर्शन.
मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री शेषपुरीश्वरर / श्री पांपूरेश्वरर मंदिर,
थिरुपांपूरं,
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळनाडू ६१२२०३
दूरध्वनी: +९१-४३५२४६९५५५, +९१-९४४३९४३६६५, +९१-९४४३०४७३०२, +९१-९९४३८४८१०७
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment