हे मंदिर थिरुकन्नपुरम पासून ३ किलोमीटर्सवर, थिरुमारुगलपासून ३ किलोमीटर्सवर, कारैक्कल पासून २० किलोमीटर्सवर, थिरुवारुरपासून १५ किलोमीटर्सवर तर नन्नीलं पासून १५ किलोमीटर्सवर आहे. थिरुपुगलूर पासून खूप जवळ आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा साम्राज्याच्या काळामध्ये ह्या मंदिराची पुनर्निर्मिती झाली. पल्लव राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये चोळा राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्या आणि भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. सिरूथोंडर नायनार ह्या नायनमारांचे हे जन्मस्थान आहे. ते पल्लव साम्राज्याचे सेनापती होते. ह्या मंदिराचे पूर्वीचे नाव परयुर असे होते.
मूलवर: श्री गणपतीश्वरर, श्री उत्तरपतीश्वरर, श्री उत्तरपशुपतीश्वरर
देवी: श्री वैथरथिरुकुळली, श्री उमैनायकी
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, चंद्र पुष्करिणी, इथल्या विहिरीला तीर्थविहीर म्हणतात
पवित्र वृक्ष: औदुंबर, उंबर
पुराणिक नाव: गणपतीचरम, रक्तारण्य क्षेत्र
वर्तमान नाव: थिरुचेनकट्टनकुडी
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार परमज्योती नावाचे पल्लव साम्राज्याचे सेनापती होते. ते इथे राहत होते. ते भगवान शिवांचे परम भक्त होते. भगवान शिवांच्या कृपेने त्यांनी पल्लव साम्राज्याला अनेक युद्धांमध्ये विजय मिळवून दिला होता. राजाला त्याच्या शिव भक्तीची आणि तो शिव भक्तांना करीत असलेल्या मदतीची माहिती झाली. त्याला असं वाटलं की युद्ध करताना परमज्योतीचे काही बरंवाईट झालं तर तो भगवान शिवांचा खूप मोठा अपमान होईल. म्हणून राजाने परमज्योतींना फक्त शिव भक्तीवरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं. परमज्योतींनी मंगैनल्लळ नावाच्या स्त्रीशी विवाह केला. त्यांना एक पुत्र झाला ज्याचे नाव त्यांनी चिरलन असे ठेवले. हे कुटुंब रोज शिव भक्तांना अन्न देऊन मगच भोजन करायचे. त्यांच्या दारी आलेल्या कुठल्याही याचकाला ते परत पाठवायचे नाहीत. एके दिवशी त्यांच्याकडे कोणीच आले नाही. म्हणून परमज्योती शिवभक्तांच्या शोधात घराबाहेर गेले. त्यावेळी भगवान शिव शिवभक्ताचे रूप घेऊन त्यांच्या घरी गेले. परमज्योतींच्या पत्नीने आणि सेवकांनी त्यांचे स्वागत केलं आणि त्यांना अन्न ग्रहण करण्याची विनंती केली. पण शिवभक्ताच्या रूपांत असलेल्या भगवान शिवांनी परमज्योती घरात नसल्याने अन्न ग्रहण करण्यास नकार दिला. मंदिरातील क्षेत्र वृक्षाखाली ते थांबतील असं सांगून ते निघून गेले. परमज्योती जेव्हा परत आले तेव्हा त्यांना शिवभक्त मंदिरात त्यांच्यासाठी थांबले आहेत हे लक्षात आलं. परमज्योती मंदिरात गेले आणि त्यांनी शिवभक्ताला आपल्या घरी येऊन अन्न ग्रहण करण्याची विनंती केली. शिवभक्त परमज्योतींना म्हणाले कि ते परमज्योतींचा पुत्र चिरलन ह्याच्या शरीरापासून शिजवलेले अन्न ग्रहण करतील. परमज्योती घरी आले आणि त्यांनी चिरलनला मारून त्याचे अन्न शिजवले. जेव्हा शिवभक्त जेवावयास बसले त्यावेळी त्यांनी परमज्योतींना त्यांच्या पुत्राला हाक द्यायला सांगितलं जेणेकरून ते त्या पुत्रासमवेत जेवतील. परमज्योती, त्यांच्या पत्नी आणि सेवक बाहेर जाऊन चिरलनला हाक मारू लागले. चिरलन हाकेला प्रतिसाद देऊन परत आलेला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते जेव्हा घरात परत आले त्यावेळी भगवान शिवांनी श्री पार्वतीदेवींसमवेत त्यांना दर्शन दिलं. म्हणून भगवान शिवांना इथे श्री उत्तरपशुपतीश्वरर असं संबोधलं जातं. इथे क्षेत्र वृक्षाखाली पशुपतीश्वरर ह्यांची मूर्ती आहे. पुढे जाऊन परमज्योतींना नायनार पदवी मिळाली आणि ते सिरूथोंडर नायनार ह्या नावाने प्रसिद्धी पावले.
२. स्थळ पुराणानुसार इथली श्री गणपतींची मूर्ती वातापी (सध्याचे बदामी) इथून आली असावी असा समज आहे. पुलिकेसी विरुद्धच्या युद्धामध्ये परमज्योतींनी वातापी येथे श्री गणपतींची पूजा केली. ते युद्ध जिंकले आणि त्यांना श्री गणपतींची मूर्ती मिळाली. परमज्योतींनी इथे श्री गणपतींची स्थापना केली. म्हणून इथे श्री गणपतींना वातापी गणेश असे संबोधले जाते.
३. पुराणानुसार गजमुखासुराचा वध केल्यानंतर श्री गणपतींना दोष प्राप्त झाला. असा समज आहे की त्यांनी इथे येऊन शिव लिंगाची पूजा केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांचे दोष निवारण झालं. म्हणून इथे भगवान शिवांना श्री गणपतीश्वरर असे संबोधले जाते. जेव्हा गजमुखासूराचे रक्त जमिनीवर वाहिले त्यावेळी त्याचा अंत झाला. म्हणून ह्या स्थळाला रक्तारण्य क्षेत्र असे नाव प्राप्त झाले (तामिळ मध्ये थिरुचेनगट्टनकुडी). असा समज आहे देवाने रक्तबीज आणि इतर असुरांचा वध केला.
४. स्थळपुराणानुसार इथे जो राजा राज्य करत होता तो शिवभक्त असल्याकारणाने त्याने भगवान शिवांच्या कृपेने अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ केला. त्यावेळी आकाशवाणीने सांगितले कि श्री पार्वती देवी त्याची पुत्री म्हणून जन्म घेतील. एकदा राजा शिकारीला गेलेला असताना त्याला चार मुली दिसल्या. त्याने त्या मुलींना आपल्या पुत्री समजून त्यांचे संगोपन केले. त्या मुली लहान वयापासूनच भगवान शिवांच्या उत्कट भक्त होत्या. त्या जेव्हा विवाहयोग्य झाल्या त्यावेळी राजाने भगवान शिवांना त्या मुलींबरोबर विवाह करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी ती विनंती मान्य केली आणि विवाह केला. त्या मुली विवाह करून ह्या स्थळाच्या आजूबाजूला राहिल्या. यांची नावे अशी १) रामनंदीचरम येथे श्री सरीवरकुळली, २) ह्याठिकाणी श्री वैथकारूकुळली, ३) थिरुपुगलूर येथे श्री करुंधर कुळली आणि ४) थिरुमरुगल येथे श्री वरंदर कुळली. ह्या सगळ्यांना एक एकत्र नाव आहे - शूलीअंबळ.
५. स्थळ पुराणानुसार इथे एक गरीब स्त्री होती जी अंबिकादेवींची उत्कट भक्त होती. एकदा ती गर्भवती असताना तिची प्रसूतीची वेळ आली. त्या रात्री तिची आई काही कामासाठी नदीच्या पलीकडील गावामध्ये गेली होती. अचानक मुसळधार पाऊस चालू ती नदीच्या पलीकडेच अडकून पडली. त्याचवेळी ह्या स्त्रीला प्रसूतिवेदना चालू झाल्या. असा समज आहे कि अंबिका देवींनी येऊन तिची प्रसूती केली. म्हणून ह्या चार अंबिकांना शूलाम्बिका (तामिळ शूल म्हणजे गर्भ) असे संबोधले जाते. अंबिका देवी प्रसूतीसाठी मंदिराच्या बाहेर आल्याने त्या परत जाऊ शकल्या नाहीत. म्हणून ह्या चार मंदिरांमध्ये अंबिका देवींचे देवालय मंदिराच्या बाहेर आहे. ह्या मंदिरांमध्ये अर्धजाम पूजेच्या समयी मिरी, मीठ, तूप आणि जीरा मिश्रित भात नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
६. एकदा राजाला भगवान शिव ज्यांनी सिरूथोंडर नायनार ह्यांना दर्शन दिलं, त्यांची मूर्ती बनविण्याची इच्छा झाली. बऱ्याच प्रयत्नानंतरपण मूर्तिकार मूर्ती बनवू शकले नाहीत. एकदा एक शिवभक्त त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाणी मागितलं. मूर्तिकार विमनस्क अवस्थेत असल्याने त्यांनी चुकून पाण्याच्या ऐवजी वितळलेले धातू त्या शिवभक्ताला प्यायला दिले हे त्यांना लक्षात आले नाही. शिवभक्तांनी ते प्यायलाबरोबर ते मूर्तीमध्ये रूपांतरित झाले. राजाला हे कळल्यावर त्याने त्या मूर्तीची (श्री उत्तरपशुपतीश्वरर) स्थापना केली. त्या मूर्तीच्या कपाळावर वितळलेल्या धातूचा एक थेंब होता. जेव्हा मूर्तिकारांनी छिन्नीने त्या थेंबाला स्पर्श केला त्यावेळी तिथे जखम झाली आणि त्यातून रक्त वहायला लागले. त्यांनी त्या जखमेवर कापूर आणि हळद लावल्यावर तेथून रक्त येणे थांबले. अजून पण त्या मूर्तीच्या कपाळावर त्या जखमेचा व्रण बघावयास मिळतो.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
सिरूथोंडर नायनार समवेत त्यांच्या पत्नी आणि त्यांचा पुत्र, राजा, श्री गणेश आणि श्री भैरव
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
२. श्री उत्तरपशुपतीश्वरर ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या कपाळावर एक जखमेचा व्रण दिसतो.
३. इथे एका रांगेत भगवान शिवांच्या संहार मूर्ती आहेत. ह्या मूर्ती अद्वितीय आहेत आणि अशा मूर्ती कुठे दुसरीकडे बघावयास मिळत नाहीत.
४. श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नीसमवेत मोराच्या रूपांत असलेल्या असुरावर बसले आहेत.
५. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातल्या श्री सुब्रमण्यम ह्यांची स्तुती गायली आहे.
६. कोष्टामधल्या श्री दुर्गादेवी अष्टभुजा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्रे आहेत.
७. नवग्रह देवालयामध्ये श्री सूर्य थोड्या उंचावर आहेत.
८. भगवान शिवांच्या नवतांडव क्षेत्रांमधलं हे एक क्षेत्र आहे.
९. हे जरी भगवान शिवांचं मंदिर असलं तरी हे मंदिर श्री गणेशांचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या मंदिराचे आवार साधारण २ एकर वर पसरले आहे. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहेत. हे अशा स्थळांपैकी एक आहे जिथे भगवान शिवांनी थिरुविलयावल नावाचा नाट्यप्रयोग सादर केला.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराच्या तीर्थाचं नाव सत्य तीर्थ आहे. ह्या तीर्थाच्या काठावर श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री मंगल विनायक असे आहे. मुख मंडपामध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. दुसऱ्या पातळीवर तीन स्तरांचं अजून एक राजगोपुर आहे. इथे भगवान शिवांचे बैठ्या मुद्रेमधले एक स्टुक्कोचे चित्र आहे ज्यामध्ये त्यांच्या बरोबर सिरूथोंडर नायनार आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि त्याच्या वरती एक व्रण आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिङ्गोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री दुर्गादेवी.
शिव लिंगाजवळ श्री उत्तरपशुपतीश्वरर ह्या रूपांतून भगवान शिव भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ, छोटा डमरू (तामिळ मध्ये उडूक्कई) आणि भिक्षापात्र (तामिळमध्ये थिरुवोडू) आहे. ह्या रूपामध्ये ते भगवान शिवांचं भिक्षादनर रूप प्रतीत होतं. भगवान शिवांच्या देवालयासमोर क्षेत्र वृक्ष आहे आणि सिरूथोंडर नायनार ह्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या मूर्ती आहेत.
श्री दुर्गादेवी अष्टभुजा दुर्गादेवींच्या रूपांत आहेत. त्यांच्या आठ हातांमध्ये शस्त्रे आहेत. त्यातलं एक शस्त्र धनुष्य आहे.
आतल्या परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री भिक्षादनर, श्री संतन नंगै, सीरलथेवर, सिरूथोंडर नायनार आणि ६३ नायनमार. बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आहेत- श्री सिद्धिविनायक, शैव संत नालवर, नागांच्या मूर्ती संगनिधी आणि पद्मनिधी, श्री वातापी गणपती, सप्तशद महर्षी आणि त्यांनी पूजिलेलं शिव लिंग, श्री ब्रह्मदेवांनी पूजिलेलं शिव लिंग ज्याला दोन बाण आहेत, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, मनुष्याचे मुख असलेले श्री विनायक ज्यांना श्री आदि गणेश असं संबोधलं जातं.
अष्टमूर्ती मंडपामध्ये भगवान शिवांच्या आठ संहार मूर्ती एका समरेषेमध्ये आहेत. त्या मूर्ती अशा आहेत - श्री भुजलिंग मूर्ती, श्री गजसंहार मूर्ती, श्री ऊर्ध्वतांडव मूर्ती, श्री कालसंहार मूर्ती, श्री भिक्षादनर, श्री त्रिपुरसंहार मूर्ती आणि श्री भैरव.
इथे एक असे शिल्प आहे ज्यामध्ये सिरूथोंडर नायनार ह्यांना कैलासावर नेण्यात येत आहे असे दर्शविले आहे.
नवग्रह मंडपामध्ये श्री सूर्य हे उंच चौथऱ्यावर आहेत.
अष्टमूर्ती मंडपामध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री दुर्गादेवी, विराट्ट मूर्ती, नटराज सभा, नवग्रह, श्री भैरव, श्री स्तंभमूर्ती विनायक आणि श्री सूर्य.
भगवान शिवांचे नऊ तांडव असे आहेत:
१. थिरुवलंगडू येथे ऊर्ध्वतांडव
२. कैलास पर्वतावर वेदतांडव
३. थिरुवेंगाडू येथे रहस्यतांडव
४. चिदंबरम येथे आनंदतांडव
५. मदुराई येथे कालमारी तांडव (उजव्या पाया ऐवजी डावा पाय जमिनीवर. तामिळ मध्ये काल म्हणजे पाय, आणि मारी म्हणजे परिवर्तन)
६. कुंभकोणम येथे अदवल्लर तांडव
७. वल्लुवूर येथे दारूकवन तांडव
८. अटकाई येथे त्रिपुर तांडव
९. ह्या ठिकाणी उभय पांडव तांडव
इथे मरगद (पाचू) लिंग आहे जे तिजोरीमध्ये ठेवले आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे पापांचं निरसन करण्यासाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे दोष निरसन होऊन मन शांत आणि स्वच्छ व्हावं म्हणून प्रार्थना करतात.
३. गर्भवती स्त्रिया इथे सुरक्षित आणि सहज प्रसूती व्हावी म्हणून प्रार्थना करतात.
४. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
पूजा:
रोज नियमित सहा पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): भरणी नक्षत्र दिवशी इथे पिल्लैकारी नावाची विशेष पूजा केली जाते. सिरूथोंडर नायनार ह्यांच्या पुत्राच्या स्मृत्यर्थ ही पूजा केली जाते.
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): शताभिषा नक्षत्र आणि षष्ठी दिवशी विशेष पूजा केली जाते तसेच गणपती उत्सव पण साजरा होतो.
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पुष्य नक्षत्र दिवशी विशेष पूजा
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १०, संध्याकाळी ५ ते ८
मंदिराचा पत्ता:
श्री गणपतीश्वरर मंदिर
थिरुचेनकट्टनगुडी, गणपती चरम,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळ नाडू ६९०७०४
दूरध्वनी: +९१-४३६६२७०२७८, +९१-४३६६२९२३००, +९१-९४४४३११३०२
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.